पर्यटनस्थळी चवीचा महोत्सव; दररोज ५० ते ६० टन आवक
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात संततधार पाऊस सुरू असून पुणे जिल्ह्य़ातील कणसांना (स्वीटकॉर्न) राज्यातून तसेच परराज्यातून मागणी वाढली आहे. सध्या गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात दररोज ५० ते ६० टन कणसांची आवक होत आहे.
कणसांचे मोठय़ा प्रमाणावर पुणे जिल्ह्य़ात उत्पादन घेतले जाते. मुंबई, ठाणे, तसेच वेगवेगळ्या शहरातून कणसांना मागणी वाढली आहे. गेल्या दहा दिवसांपासून राज्यात संततधार पाऊस सुरू असून कणसांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. महाबळेश्वर, लोणावळा,खंडाळा, लवासा, खडकवासला या पर्यटनस्थळांवरून मागणी वाढली असल्याची माहिती मार्केटयार्डातील कणसांचे व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी दिली.
घाऊक बाजारात कणसांना प्रतिकिलो १५ ते १८ रुपये असा भाव मिळत आहे. गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्यानंतर कणसांच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. त्यामुळे यंदाच्या हंगामात कणसांची आवक एकूण आवके च्या तुलनेत पन्नास टक्के एवढी होत आहे. गेल्या वर्षी कणसांचे प्रतिकिलोचे भाव १० ते १२ रुपये किलो होते. अहमदाबाद, बडोदा तसेच हैदराबाद परिसरातून कणसांना मागणी आहे. पुणे जिल्ह्य़ातील खेड, मंचर, नारायणगाव तसेच नाशिक भागातून घाऊक बाजारात कणीस विक्रीसाठी पाठविली जात आहेत.
शहरातील पुलांवर कणीस विक्रेते
खडकवासला धरणसाखळीत संततधार पाऊस सुरू असून मुठा नदीत मोठय़ा प्रमाणावर पाणी सोडले जात आहे. शहरातील विविध पुलांवर मुठेतील पूर पाहण्यासाठी नागरिक सहकुटुंब येत असून कणीस भाजून देणाऱ्या विक्रेत्यांनी पुलांच्या कडेला गाडय़ा लावल्या आहेत. भाजलेल्या एका कणसाची विक्री २० ते २५ रुपये दराने केली जात आहे.