पुणे : कृषिपंपांना दिवसा बारा तास अखंड वीज पुरवठा करण्यासाठी राज्यातील सर्व रोहित्रांना सौरऊर्जा पुरविली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व कृषीपंपांना दिवसा वीज मिळू शकेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
‘पानी फाउंडेशन’च्या वतीने आयोजित ‘फार्मर कप’ वितरण कार्यक्रामात फडणवीस बोलत होते. पानी फाउंडेशनचे प्रमुख अभिनेते अमीर खान, किरण राव, सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, कृषी सचिव एकनाथ डवले या वेळी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, की पानी फाउंडेशनने वॉटर कपच्या माध्यमातून गावेच्या गावे समृद्ध केली आहेत. राज्यात आणि देशात कर्करोग वाढत असताना नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे. राज्यात सुमारे २५ लाख हेक्टरवर नैसर्गिक शेती करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी तीन हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करण्य्ग टशेतीला पर्याय नाही. भविष्यात गट शेतीला प्रोसाहन देण्यासाठी विविध योजना लागू करणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. पानी फाउंडेशनने आपल्या कामाची व्याप्ती वाढवावी. त्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व मदत करायला तयार आहे, असेही ते म्हणाले.
अमीर खान म्हणाले, कोणत्याही अडचणीमुळे खचून जाऊ नका. निराश होऊ नका. गट शेती लगेच फायद्यात येणार नाही, पण, योग्य प्रकारे काम केल्यास, उत्पादन खर्च कमी केल्यास गट शेती नक्की फायद्यात येईल. किरण राव यांनी खणखणीत मराठीत भाषण केले. राव म्हणाल्या, की महिला शेतकरी गट स्थापन झाल्यामुळे महिलांना सन्मान मिळाला. या स्पर्धेत ४५ महिला गट स्थापन झाल्याचेही त्या म्हणाल्या.
परिवर्तन शेतकरी गटाला पारितोषिक
पानी फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलेला यंदाचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा फार्मर कप वाठोडा (ता. वरुड. जि. अमरावती) येथील परिवर्तन शेतकरी गटाने जिंकला. दुसरा क्रमांक गोळेगाव (ता. खुलताबाद. जि. औरंगाबाद) येथील चित्रा नक्षत्र महिला शेतकरी गटाने पटकाविला. तृतीय पुरस्कार डांगर बुद्रुक (ता. अमळनेर. जि. जळगाव) येथील जय योगेश्वर शेतकरी गट आणि वारंगा तर्फे नांदापूर (ता. कळमनुरी. जि. हिंगोली) येथील उन्नती शेतकरी गटाला विभागून देण्यात आला. शेतकरी गटांना प्रशिक्षण देणारे कृषी विभागाचे कर्मचारी, कृषी विज्ञान केंद्राचे संशोधक, डिजिटल शाळेसाठी मदत करणाऱ्या तंत्रज्ञांचाही सन्मान करण्यात आला.