ज्युलिओ रिबेरो

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांना आपल्यानंतर आपल्या मुलाने – उद्धव ठाकरे यांनी प्रमुखपद सांभाळावे आणि प्रसंगी मुख्यमंत्रीपदही घ्यावे असे वाटले, तसेच उद्धव ठाकरे यांनाही वाटले असावे असा माझा तर्क आहे. त्यावरून हा विद्रोह घडला, असे मानण्यास जागा आहे, पण माझ्या मते, तो विचारी आणि योग्य प्रवृत्ती असलेला तरुण आहे….

‘माझ्या उद्धवला सांभाळा, माझ्या आदित्यची काळजी घ्या… ’ शेवटचा श्वास घेण्यापूर्वी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी दादरच्या शिवाजी पार्कवरल्या विशाल सभेत अनुयायांना केलेले हे आवाहन होते. महाराष्ट्रानेही हे भावनिक आवाहन चित्रवाणी वाहिन्यांवरून पाहिले- ऐकले आणि स्मृतींत साठवले आहे.

ते आवाहन ऐकणाऱ्या कोणाच्याही मनात शंका नव्हती की, सर्वोच्च नेत्याला उद्धव यांच्यानंतर उत्तराधिकारी म्हणून आदित्य उत्तराधिकारी हवा होता. आता उद्धव म्हणजे काही बाळासाहेब नव्हे. दुर्दैवाने आरोग्यही उद्धव यांना अनेकदा साथ देत नाही. सल्ला आणि अंमलबजावणीसाठी जवळच्या विश्वासूंच्या समूहावर अवलंबून राहण्याची त्यांची कार्यशैली आहे. पण एका मूलभूत मुद्द्यावर मात्र ते त्यांच्या वडिलांप्रमाणेच आहेत – त्यांनी आपल्यानंतर आपला मुलगा आदित्य याला सेनेचा सर्वोच्च नेता आणि अर्थातच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची आकांक्षा फारशी लपवलेली नाही!

आणि हेच जणू, शिवसेनेतील दुखण्याचे मूळ ठरले. सुरुवात झाली ती अडीच वर्षांपूर्वी. त्या वेळी शिवसेनेने भाजपशी आपला जुना संसार मोडला. महाराष्ट्रात सरकारच्या नेतृत्वाचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि उद्धव यांना मुख्यमंत्री बनवण्याची परवानगी त्यांची जुनी वैरी म्हणवणाऱ्या काँग्रेसने दिली! मला असे वाटते की, उद्धव यांना स्वत:पेक्षा आपल्या २८ वर्षांच्या मुलाला मुख्यमंत्री बनवण्याचा आनंद अधिक झाला असता. परंतु त्याच्या नव्या मित्रांचा आग्रह आणि सल्लागार यांच्यामुळे त्यांनी विचार बदलला असावा असेही मला वाटते. अर्थात हा माझा तर्क आहे.

मला मान्यच आहे की, आदित्यकडे क्षमता आहे. तो विचारी आणि योग्य प्रवृत्ती असलेला तरुण आहे. जर त्याने शिडीच्या तळाशी कुठूनतरी सुरुवात केली असती आणि त्याच्या मार्गावर काम केले असते तर तो लवकरात लवकर शिखरावर चढला असता. असे करण्याची धमक त्याच्या आहेसुद्धा! पण त्यांनी पक्षात अक्षरशः ‘क्रमांक दोन’ म्हणून सुरुवात केली. त्यामुळे, ‘गढी’साठी इच्छुक असलेले नेते- विशेषतः एकनाथ शिंदे – नाराज होऊन योग्य संधीची वाट पाहू लागले. तशी संधी अखेर मिळाली कारण त्यासाठीची शिंदे यांची जुळवाजुळव, भाजपचे राज्यातील प्रमुख रणनीतीकार आणि ‘आपला हक्क लुटला गेला’ अशाच भावनेत वावरणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योजनांशी जुळली! त्यांच्या पक्षाने शिवसेनेसोबत एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. युती जिंकली, फक्त शरद पवार यांच्या ‘जाणते’पणामुळे फसली. फडणवीस अक्षरश: पहिल्या दिवसापासून बदला घेण्यासाठी पछाडत होते पण त्यांचे प्रयत्न गेली अडीच वर्षे अयशस्वी झाले. त्यातून कदाचित संयम शिकता आला असेल. मग असे दिसते की, त्यांनी पक्षाचे ज्येष्ठ रणनीतीकार अमित शहा यांची मदत घेतली.

आता ‘ईडी’ (सक्तवसुली संचालनालय) हे सेनेच्या सैनिकांना रांगेत आणण्याचे मुख्य साधन बनले. वास्तविक महान छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणारे हे २१ व्या शतकातील सैनिक, पण मनात भीती निर्माण करण्यासाठी ईडीचे नाव पुरेसे ठरले. ईडीच्या नजरेपासून लपवण्यासारखे काही ना काही यापैकी अनेकांकडे (किंवा बहुतेकांकडे) होते, हे यामागील प्रमुख कारण. त्यांनी त्यांच्या नेत्याला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध तोडण्याची विनंती केली आणि केंद्रीय तपास यंत्रणांची वक्रदृष्टी टाळण्यासाठी भाजपशी पुन्हा जुळवून घ्या, असा सूर लावला. नेमके हेच त्या पक्षाच्या सध्याच्या पडझडीचे कारण असल्याचे जाणकारांना वाटते. ते शक्य आहे, संभाव्य आहे!

पण शिवसेना आमदारांच्या बंडाचे आणखी एक कारण पुढे आले आहे. त्यांना वाटते की मंत्रिमंडळातील सर्व ‘मलईदार’ खाती राष्ट्रवादी तसेच काँग्रेसला मिळाली आहेत, मुख्यमंत्री खुर्चीवर बसण्यासाठी उद्धव यांनी ही तडजोड केल्याचे त्यांचे म्हणणे आहे! त्यांची अशीही तक्रार आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना आपापला आमदारनिधी तातडीने उपलब्ध होतो, तसेच मुख्यमंत्र्यांच्या दालनात स्वपक्षीय (शिवसेना) आमदारांपेक्षा लवकर प्रवेश मिळतो,आणि त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील त्यांच्या स्थानावर परिणाम होतो. म्हणजेच शिवसेना आमदार विधानसभेच्या पुढील निवडणुकांचा विचार करत आहेत आणि काँग्रेस वा राष्ट्रवादी त्यांच्यापुढे जाईल असे त्यांना वाटते आहे. अशा ठसठशीतून हे बंड झाले असावे, हेही शक्य आहे.

भाजपकडे शिवसेनेपेक्षा चतुर लोक आहेत. मुळात या पक्षाने अक्षरशः सेनेच्या पाठीवर स्वार होऊन महाराष्ट्रात पहिल्यांदा बस्तान बसवले आणि नंतर सेनेवर वर्चस्व मिळवले. आमदारसंख्येत सेनेला मागे टाकल्यावर मुख्यमंत्रिपद भाजपकडे गेले. महाराष्ट्राला फडणवीस यांच्या रूपाने (इतिहासात दुसऱ्यांदा) ब्राह्मण मुख्यमंत्री मिळाल्याचा आनंद अनेक भाजपसमर्थकांना झाला. शिवसेनेचे संस्थापक कुटुंब कायस्थ या पुढारलेल्या जातीचे आहे, परंतु त्याचे बहुतेक अनुयायी ओबीसी आहेत. तेही मुख्यत्वे कोकण विभागातील. राष्ट्रीयीकृत बँका, रेल्वे, एअर इंडिया, विमानतळ प्राधिकरण इत्यादी केंद्र सरकारच्या संस्थांना शिवसेनेच्या ‘लढाऊ’ (हिंसक) बाण्यामुळे अधिकाधिक महाराष्ट्रीय कामगारांना नोकऱ्या देणे भाग पडले, यात शंका नाही. मुख्यतः मुंबई शहरात शिवसेनेच्या उदयाचे तेच रहस्य होते.

शिंदेंच्या बंडानंतरही शिवसेनेचे पायदळ ठाकरेंसोबत आहेत. तूर्तास ते या धक्क्यातून सावरत आहेत. ‘ठाकरेंविना सेना’ हा विचार या शिवसैनिकांना पटतो की नाही, ते काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागेल! शक्यता अशी की, विघटनाची प्रक्रिया सुरू होईल. रस्त्यावरचे विक्रेते, खाद्यगृहे वा अन्य धंदे चालवणारे , गाड्या धुणारी मुले आणि असे सारेजण ठाकरेंच्या आशीर्वादाला मानणारे आहेत. मार्क्सवादी ज्याला ‘सर्वहारा’ म्हणतात, तसा हा वर्ग. विघटनामुळे त्याला नवा आसरा शोधणे भाग पडेल.

पण यातून खरी ठरणारी शक्यता अशी की, एकनाथ शिंदे हे सेनेचे प्रमुख म्हणून फार काळ टिकणार नाहीत. समान महत्त्वाकांक्षा आणि समान प्रतिभा असलेले इतर दावेदार असतील. नारायण राणे, उदाहरणार्थ, जे भाजपमध्ये सामील झाले आहेत, ते निश्चितपणे वैयक्तिक ओळखीसाठी इच्छुक असतील. थोडक्यात, शिवसेनेचा अंतर्गत संघर्ष टोकदार आणि हरघडी बदलू शकणारा असेल.

सेनेचे अनेक कार्यकर्ते – विशेषतः जर त्यांना ईडीची भीती असेल तर – भाजपमध्ये सामील होतील. आणखी अनेकजण राष्ट्रवादीतसुद्धा जाऊ शकतात. कारण अनेक कार्यकर्त्यांना, हल्ली एकनाथ शिंदे ज्याचा प्रचार करत आहेत त्या हिंदुत्वापेक्षा आपापले रोजचे जगणे, उपजीविका हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. हे कार्यकर्तेच समतोल राखतील आणि त्यांच्यासाठी सर्वोत्तम काय ते ठरवतील. पण बाळासाहेबांच्या शिवसेनेने कनिष्ठ मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयांच्या आकांक्षांना बळ देणारी संघटना म्हणून सुरुवात केली होती, ही या संघटनेची ओळख जर ठाकरे घराणे नेतृत्वात नसेल तर कदाचित पुसलीच जाईल.

आदित्य ठाकरे यांच्याबद्दल मला दु:ख आहे! माझ्या मते, हा सगळा विद्रोह होण्यामागे बहुधा तोच (त्याच्या नकळत) कारणीभूत आहे. सामान्य सैनिकांवर त्यांचा चांगला प्रभाव पडला असता कारण त्यांची विचारसरणी आधुनिक होती, माझ्यासारख्या अनेकांना आदित्यची ही विचारसरणी जवळची वाटते आहे, अशी कबुलीसुद्धा जाता जाता द्याायला हरकत नाही!

(लेखक मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत)

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is aditya thackeray fault in this amy
First published on: 26-06-2022 at 08:35 IST