बदलापूर : भिवंडी मतदारसंघात लोकसभा आणि मुरबाडमध्ये विधानसभा निवडणुकीत ज्या आगरी विरुद्ध कुणबी अशा समीकरणांची चर्चा रंगली आणि ज्यामुळे निकालावर परिणाम झाला त्या समीकरणांची पुन्हा जुळवाजुळव सुरू झाल्याची चर्चा बदलापुरात रंगू लागली आहे. बदलापुरात नुकत्याच पार पडलेल्या आगरी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजक वामन म्हात्रे यांनी ‘ आगरी तितुका मेळवावा ‘ या भूमिकेतून आजी, माजी खासदार, माजी नगरसेवक यांना एका मंचावर आणून अनेक अप्रत्यक्ष संदेश दिले आहेत. त्याचे परिणाम येत्या पालिका निवडणूकीत दिसण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात आगरी टक्का मोठा आहे. या भागातून लोकसभा, विधानसभा, स्थानिक नगरपालिका यांमध्ये आगरी प्रतिनिधीत्वही मोठ्या संख्येने आहे. या समीकरणांची आखणी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी निवडणुकीत केल्यास यश नक्की हेही गेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे. लोकसभा निवडणुकीत आगरी विरुद्ध कुणबी समीकरणांमुळे भिवंडी लोकसभेचे खासदार आणि मंत्री कपिल यांना फटका बसल्याचे बोलले जाते. तर विधानसभा निवडणुकीत मुरबाड मतदारसंघात कुणबी विरुद्ध कुणबी लढतीतही सत्ताधारी उमेदवाराविरुद्ध आगरी ताकद उभी करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा रंगली होती. यात लोकसभेत प्रभाव चाखलेल्यांनीही पुढाकार घेतला होता. मात्र तरीही मुरबाड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार किसन कथोरे यांनीच विजय मिळवला. मात्र त्यानंतर या समीकरणांची फाटाफूट होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात असल्याचे चित्र नुकत्याच झालेल्या एका सोहळ्याच्या निमित्ताने दिसून आले. बदलापुरात शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी आगरी महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी “आगरी तितुका मेळवावा” धोरण अवलंबल्याची चर्चा रंगली. कारण या महोत्सवाच्या निमित्ताने भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील या दोघांनी हजेरी लावली. तसेच त्यांनी वामन म्हात्रे यांचे खुल्या दिलाने कौतुक केले. त्याचवेळी विविध पक्षातील आगरी समाजाचे प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी हजेरी लावत म्हात्रे यांचे हात बळकट करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा…संगीताला मुंबईसारखे प्रदूषित करू नका! ज्येष्ठ संगीतकार इलिया राजा यांचा सल्ला

या निमित्ताने आगरी समीकरणे जुळवण्यात म्हात्रे यशस्वी ठरल्याचे बोलले जाते. आगामी पालिका निवडणुकीत म्हात्रे हे नगराध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार आहेत. २०१५ मध्येही ते नगराध्यक्ष होते. सध्या संपूर्ण शहरभर त्यांनी जनसंपर्क मोहीम राबवली असून गेल्या पाच वर्षात प्रशासकीय काळातही त्यांनी यात सातत्य राखले आहे. त्यामुळे या पुढे म्हात्रे काय समीकरणे आखतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapurs agri festival organizer vaman mhatre conveyed indirect messages through diverse stage participants sud 02