ठाणे : मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे कुपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहचून पाणी गळती होत असल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात लागू करण्यात आली असून हि कपात दुरुस्ती काम होईपर्यंत म्हणजेच किमान महिनाभर कायम राहणार आहे. यामुळे ठाणे शहरातील काही भागातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या संकटाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्यातील धरणांमधून मुंबई शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो. या जलवाहीन्या ठाणे शहरातून जात असून त्या फुटण्याचे प्रकार सातत्याने घडत होते. काही वर्षांपुर्वी किसननगर भागात जलवाहीनी फुटून परिसर जलमय झाला होता. त्यात परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून घरातील साहित्यांचे नुकसान झाले होते. अशा घटना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेेने जलबोगदा तयार केला असून हा बोगदा ठाणे परिसरातून जातो. त्यातून भांडुप येथील जल शुद्धीकरण प्रकल्पात नेण्यात येते. ठाण्यातील किसननगर भागातून जाणाऱ्या जलबोगद्याच्या वरील भागात बोरवेलसाठी नोव्हेंबर महिन्यात खोदकाम करण्यात आले होते. या बेकायदा खोदकामामुळे जलबोगद्याला हानी पोहचून त्यातून पाणी गळती होत होती. मागील पाच महिन्यांपासून या ठिकाणी दररोज अंदाजे तीन ते चार दशलक्ष लिटर पाणी वाया जात आहे. ही बाब काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी उघडकीस आणून हा बोगदा दुरुस्त करण्याची मागणी केली होती. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रश्नाकडे लक्ष वेधून जलबोगद्या तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली होती. दरम्यान, मुंबई महापालिकेने अखेर जलबोगद्याच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ३१ मार्चपासून जलबोगद्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम पुढील ३० दिवस सुरु राहणार असून या कालावधीत मुंबईसह ठाणे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात येणार आहे, असे मुंबई महापालिकेने जाहीर केले आहे. यामुळे ठाण्यातील काही भागातील नागरिकांपुढे ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यापैकी मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. या पाण्याचा पुरवठा होणाऱ्या भागांमध्ये १५ टक्के पाणी कपात लागू होणार आहे. दरम्यान, पाणी कपात कालावधीत नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा आणि ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

हेही वाचा… उल्हासनगरः नियम डावलून करप्रणाली लागू केली, नगरविकास विभागाचा उल्हासनगर महापालिकेच्या कर विभागावर ठपका

हेही वाचा… दुरुस्ती कामामुळे मुंब्रा बायपास रस्त्यावरून एक एप्रिलपासून वाहनांना बंदी; वाहतूक मार्गात बदल

पाणी कपात लागू झालेले परिसर

गावदेवी जलकुंभावरुन पाणीपुरवठा होणाऱ्या परिसरात पाणी कपात लागू होणार आहे. त्यामध्ये नौपाडा, गोखले रोड, स्थानक परिसर, बी केबीन, राम मारुती मार्गाजवळी परिसर, महागिरी, खारकर आळी, चेंदणी, खारटन रोड, मार्केट परिसर या भागांचा समावेश आहे. टेकडी बंगला जलकुंभावरुन पाणीपुरवठा होणाऱ्या परिसरात पाणी कपात लागू होणार आहे. त्यात टेकडी बंगला, वीर सावरकर पथ, संत गजानन महाराज मंदिरपर्यत, पाचपाखाडी, नामदेववाडी, भक्ती मंदिर रस्ता, सर्व्हिस रस्ता परिसर या भागांचा समावेश आहे. कोपरी कन्हैयानगर व धोबीघाट जलकुंभावरुन पाणीपुरवठा होणाऱ्या परिसरात पाणी कपात लागू होणार आहे. त्यामध्ये कोपरी गाव, ठाणेकरवाडी, सिंधी कॉलनी, साईनाथनगर, साईनगर, कोळीवाडा, सिडको संपूर्ण कोपरी (पूर्व), आनंदनगर, गांधीनगर, कान्हेवाडी, केदारेश्वर, संपूर्ण ठाणे पूर्व परिसरांचा समावेश आहे. हाजुरी येथील जलवाहीनीवरून थेट होणाऱ्या पाणी पुरवठ्यातही कपात होणार आहे. त्यामध्ये लुईसवाडी, काजुवाडी, हाजूरी गाव, रघुनाथनगर, जिजामाता नगर, साईनाथ नगर या परिसरांचा समावेश आहे. किसननगर येथील जलवाहीनीवरून थेट होणाऱ्या पाणी पुरवठ्यातही कपात होणार आहे. त्यामध्ये किसननगर १, किसननगर २, किसननगर ३, शिवाजीनगर, पडवळनगर, डिसोझावाडी या परिसरांचा समावेश आहे. अंबिकानगर येथे जलवाहीनीवरून थेट होणाऱ्या पाणी पुरवठ्यातही कपात होणार आहे. त्यामध्ये अंबिकानगर २, ज्ञानेश्वरनगर, जयभवानी नगर, राजीव गांधी नगर या परिसरांचा समावेश आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to water tunnel repair work 15 percent water supply cut thane by mumbai municipal corporation asj
First published on: 29-03-2023 at 18:39 IST