कल्याण- ठाणे महापालिकेने हद्दीबाहेर म्हणजेच भंडर्ली येथे तात्पुरता स्वरूपात उभारलेल्या कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी कचरा घेऊन येणारी वाहने मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रविवारी रोखून धरली. पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर वाहने प्रकल्पाच्या ठिकाणी रवाना झाली. दरम्यान येत्या काही दिवसात कचरा टाकणे थांबविले नाहीतर कचराभूमीवर येणारी ठाणे पालिकेची वाहने जाळून टाकू, असा इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> शहापूर : रानातील पायवाटेवर महिलेची प्रसूती

ठाणे महापालिका क्षेत्रातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी डायघर येथे प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. हे काम पुर्ण होईपर्यंत पालिका हद्दीबाहेर म्हणजेच भंडर्ली येथे तात्पुरता प्रकल्प प्रशासनाने उभारला आहे. वर्षभरासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला होता. परंतु दिड वर्षे झाले तरी डायघर प्रकल्पाचे काम पुर्ण झाले नसल्यामुळे भंडार्ली कचरा प्रकल्प सुरुच आहे. या प्रकल्पात कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिक दुर्गंधीने हैराण झाले आहेत. यातूनच या प्रकल्पास विरोध होत आहे. हा प्रकल्प बंद करण्यासाठी  मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रविवारी पुन्हा आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी कचरा घेऊन येणारी वाहने रोखून धरण्यात आली होती. याबाबत माहिती मिळताच ठाणे महापालिका घनकचरा विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. डायघर येथील कचराभूमी प्रकल्प येत्या १० दिवसात सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. त्यानंतर भंडार्ली येथे कचरा टाकणे बंद केले जाईल. यासंदर्भात आयुक्तांसोबत एक बैठक घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी रोखून धरलेली वाहने सोडली.

हेही वाचा >>> ठाण्यात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम शिवसेनेकडून हायजॅक

शिंदे पिता-पुत्रांवर निशाणा

देशभर स्वच्छता अभियान राबविले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठिकठिकाणच्या स्वच्छता अभियानात सहभागी झाले आहेत. मग त्यांना ठाणे पालिकेचा कचरा आपण नागरी वस्ती असलेल्या भागात टाकत आहोत. तेथील लोकांना त्याचा त्रास होत असेल, याची जाणीव नाही का. ठाण्यात लोकवस्ती आहे आणि भंडार्ली परिसरात काय जनावरे राहतात का, असा प्रश्न आमदार पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. कल्याण लोकसभेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे. पण त्यांनाही या विषयी काही देणेघेणे नाही. अंबरनाथ भागात कचरा करवले गाव हद्दीत टाकतात. आगरी समाज राहत असलेल्या भागात कचराभूमी करण्याचे काय सरकारने धोरण ठरवले आहे का, त्यांना सुखासमाधानाने जगू देणार की नाही, असा प्रश्न आमदार पाटील यांनी केला. ठाण्यासह कल्याण परिसराचा कचरा प्रश्न सोडविण्यात मुख्यमंत्री, खासदार अयशस्वी झाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns mla pramod patil warn car burn to tmc if bhandarli dumping ground not close zws