डोंबिवली- येथील मोठागाव माणकोली पुलाजवळील पोहच रस्त्याने कल्याण डोंबिवली पालिकेचा विकास आराखड्यातील बाह्य वळण रस्त्याचा काही भाग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चुकीमुळे बाधित झाला आहे. ही गंभीर चूक झाली कशी. याप्रकरणाची सविस्तर चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आ. प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी केली आहे. याप्रकरणी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त यांच्याकडे तक्रार करणार आहोत, असे आ. पाटील यांनी सांगितले.
मोठागाव रेतीबंदर खाडीवरील उड्डाण पुलाचा बांधकाम आराखडा तयार करताना भिवंडी, डोंबिवली बाजुकडील पोहच रस्त्यांचे आराखडे तयार करण्यात आले होते. हे आराखडे तयार करताना कल्याण डोंबिवली पालिकेचा बाह्य वळण रस्ता बाधित होत आहे, हे ‘एमएमआरडीए’च्या अधिकारी, सल्लागारांनी यापूर्वी कल्याण डोंबिवली पालिका अधिकारी किंवा मख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर वेळोवेळी झालेल्या विकास कामांच्या बैठकीत का स्पष्ट केले नाही, असा प्रश्न आ. पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा >>>साथीचे आजार नियंत्रणासाठी कल्याण-डोंबिवलीत तीन लाख घरांचे सर्वेक्षण, १२ लाख रहिवाशांची आरोग्य तपासणी
टिटवाळा, कल्याण, डोंबिवली ते हेदुटणे वळण रस्त्यासाठी शासन ७५० कोटीचा निधी खर्च करत आहे. या रस्ते मार्गातील महत्वाचा टप्पा ‘एमएमआरडीए’च्या चुकीमुळे बाधित होत असेल तर ते गंभीर आहे. मोठागाव बाजुकडील पुलाचा उतार टप्पा गाठण्याची सीमारेषा योग्यरितीने जुळत नसल्याने एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी वळण रस्त्याच्या मध्यभागी पुलाचा उताराचा टप्पा उतरविल्याचे आता उघडकीला आले आहे. एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी आपली चूक झाकण्यासाठी पुलावरुन येणाऱ्या पोहच रस्त्याच्या उताराच्या ठिकाणी आम्ही ‘टी’ आकाराचे वळण देणार आहोत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी भूमिका घेतल्याचे समजते. एक रस्ता बाधित करुन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या भागातील कोंडीला आमंत्रण दिले आहे. खाडीकडून रेतीबंदर रेल्वे फाटकाकडे येणारा रस्ता टी वळण रस्त्यामुळे बंद होणार आहे. हा जुना रस्ता बंद करुन नागरिकांची गैरसोय प्राधिकरणाच्या चुकीच्या आराखड्यामुळे झाली आहे. ही चूक कोणाच्या हितासाठी मुद्दाम केली गेली आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी आपण शासनाकडे करणार आहोत, असे आ. पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा >>>घोडबंदर भागात वाहन बंद पडल्याने गायमुख ते नवघर पर्यंत वाहतूक कोंडी
मागण्या
वळण रस्ता बाधित केल्याचा विषय जिल्हा विकास नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित करणार.
काही हितसंबंधीच्या विकासासाठी आराखडा चुकविला का याची चौकशी गरजेची.
उलटसुलट वाहन फेऱ्यांमुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण.