Manoj Tiwary’s statement on Shivam Dube : आयपीएल २०२४च्या समाप्तीनंतर आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडताना खेळाडूंची आयपीएलमधील कामगिरी विचारात घेतली जाणार आहे. त्यामुळे माजी भारतीय फलंदाज मनोज तिवारीने मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि सीएसकेच्या शिवम दुबे या दोन अष्टपैलू खेळाडूंबद्दल आपले मत मांडले आहे. तिवारीने आयपीएलच्या या हंगामातील हार्दिकच्या गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित केला आहे. कारण मागील तीन सामन्यांमध्ये एमआयच्या कर्णधाराने फक्त एकच षटक टाकले आहे. त्यामुळे तिवारीला वाटते, की जर हार्दिकला टी-२० विश्वचषकासाठी संघात आपले स्थान निश्चित करायचे असेल, तर त्याला आपली गोलंदाजी सिद्ध करावी लागेल.

हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्ससाठी महागडा ठरला –

मनोज तिवारीने असेही निदर्शनास आणून दिले की, गोलंदाजीमध्ये हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघासाठी थोडा महागडा ठरला आहे, त्याने प्रति षटकात ११ पेक्षा जास्त धावा दिल्या आहे. क्रिकबझच्या एका कार्यक्रमात बोलताना मनोज तिवारी म्हणाला, “जर हार्दिक पंड्याला भारतीय टी-२० विश्वचषक संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळायचे असेल, तर त्याला गोलंदाजी करावी लागेल. त्याचा इकॉनॉमी रेट पहा, जो सुमारे ११ च्या जवळपास आहे. या हंगामात त्याची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही.”

‘दुबेची टी-२० विश्वचषकात निवड झाली नाही, तर सीएसके जबाबदार’-

यासोबतच मनोज तिवारीने असाही दावा केला आहे की, जर दुबे टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळवू शकला नाही, तर त्याची फ्रँचायझी सीएसके जबाबदार असेल. तो पुढे म्हणाला, “या फॉर्ममुळे हार्दिकची टी-२० विश्वचषकासाठी निवड होणार नाही. आगरकर हे एक कणखर व्यक्तिमत्व आहे आणि म्हणूनच ते असे धाडसी निर्णय घेऊ शकतात. जर शिवम दुबेची टी-२० विश्वचषकात निवड झाली नाही, तर त्याला सीएसके जबाबदार असेल. कारण ते त्याला गोलंदाजी करू देत नाहीत. मी खूप दिवसांपासून म्हणतोय, तुम्ही हार्दिकच्या जागी शिवम दुबेला तयार करा.”

हेही वाचा – Punjab Kings : राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर पंजाबला दुसरा धक्का, शिखर धवन पुढील काही सामन्यांना मुकणार

‘दुबे हा चतुर गोलंदाज ‘-

अष्टपैलू शिवम दुबेचे चतुर गोलंदाज असे वर्णन करताना मनोज तिवारी म्हणाला, “एकेकाळी आपल्यकडे व्यंकटेश अय्यरही होता. अचानक दोघांनी गोलंदाजी करणे बंद केले. आपण मोठे ध्येय ठेवले पाहिजे. आपण येथे विश्वचषक स्पर्धेबद्दल बोलत आहोत आणि भारताला ती ट्रॉफी खूप दिवसांपासून जिंकता आलेली नाही. त्यामुळे त्यासाठी वेळेआधीच नियोजन करावे लागेल. आता हार्दिक फॉर्ममध्ये नाही आणि दुबेची संघात निवड केल्यास तो गोलंदाज म्हणून कितपत चांगली कामगिरी करू शकेल, हे माहीत नाही. पण माझ्या माहितीनुसार दुबे हा चतुर गोलंदाज आहे. घरच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध खेळली गेलेली टी-२० मालिका आठवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल.”