माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटं प्रतिज्ञापत्र देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे अनिल देशमुख यांच्या रेकॉर्डिंग असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनीही भाष्य करत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. “विरोधकांना वाटतं की आम्ही सुडाचं राजकारण करतो, पण जर हेच करायचं असंत तर आज अनिल देशमुख जेलमध्ये असते”, असं विधान संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी बोलताना केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय शिरसाट काय म्हणाले?

मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “दोन्ही समाजात भांडण लावून आपली राजकीय पोळी भाजण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. एकीकडे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला फूस लावायची आणि दुसरीकडे लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला फूस लावायची. दोघांच्या मागण्या काय आहेत? यावर कधी तोडगा काढायचा नाही. दोन्ही समाजामध्ये तोडगा निघाला तर विरोधकांचं राजकारण संपेल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात विरोधकांची भूमिका काय? हे कधीही त्यांनी स्पष्ट केलं नाही”, असा हल्लाबोल संजय शिरसाट यांनी केला.

हेही वाचा : “दम असेल तर…”, नाना पटोले यांचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान

शिरसाट पुढे म्हणाले, “आम्ही तरी कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, त्या देण्याचा प्रयत्न केला. तसेच मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. ओबीसींनाही विश्वास देण्याच काम आम्ही केलं. हे सर्व असताना विरोधकांना वाटतं की या सर्व गोष्टींचं क्रेडीट सत्ताधाऱ्यांना जाईल. त्यामुळे ते क्रेडीट आम्हाला जाऊ नये, यासाठी दोन्ही समाजात कसं भांडण लावता येईल, हा आघाडीचा प्रयत्न आहे. आंदोलनाबाबत सरकार काही करत नाही, असा आरोप ते करतात. पण विरोधकांना कावीळ झाल्यामुळे दिसत नाही. त्यामुळे सराकार जे काही प्रयत्न करतं आहे, त्याकडे डोळेझाक करून दोन्ही समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न ते करत आहेत”, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

अनिल देशमुखांवर टीका

“अनिल देशमुखांना ज्यावेळी अटक झाली ती कायदेशीर प्रक्रिया होती. त्यामध्ये कुठेही सरकारचा आक्षेप नव्हता. न्यायालयीन कामजामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. सरकार सरकारचं काम करतं आणि न्यायालय न्यायालयाचं काम करतं. ज्या काही बाजू सरकारतर्फे मांडायच्या होत्या त्या मांडल्या. अनिल देशमुखांना जो काही जामीन मिळाला त्याचा अर्थ असा होतो की न्यायव्यवस्थेचा जो काही निर्णय आहे, तो सरकारने मान्य केला. तसं त्यांना वाटतं की सर्वच यंत्रणांवर सरकारचा दबाव आहे, आणि त्या दबावापोटी हे सुडाचं राजकारण करत आहेत. जर हेच करायचं असंत तर आज अनिल देशमुख जेलमध्ये असते. त्यामुळे कायदा वेगळा आणि राजकारण वेगळं. पण याची सरमिसळ करण्याचं काम अनिल देशमुख करत आहेत. जेलमधून बाहेर आल्यानंतर आणि एवढा वेळ गेल्यानंतर त्यांना आता ते आठवत आहे. त्यामुळे हा सर्व ढोगींपणा आहे”, असं संजय शिरसाट म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena shinde group leader sanjay shirsat on ncp mla anil deshmukh vs devendra fadnavis politics gkt