ठाणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध सुरु झालं आहे. ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाची सूत्रं दोन्ही नेत्यांची हाती असून त्यांच्यातील वादाचे परिणाम राज्यातील इतर जिल्हयांमध्ये उमटण्याची भीती आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत आघाडी नकोच अशी ताठर भूमिका शिवसेनेने घेतली आहे. यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी शिवसेनेला सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. त्यांच्या या सल्ल्यावर एकनाथ शिंदेनीही उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाण्यातील विसंवादामुळे महाआघाडीत बिघाडी?; शिवसेना-राष्ट्रवादीतील वाद भाजपच्या पथ्यावर

ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना एकला चालो रेच्या भूमिकेत असेल तर नवी मुंबई, उल्हासनगर आणि जिल्ह्यातील इतर निवडणुकांसाठीदेखील आघाडी करायची नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी घेतल्याचे विश्वसनीय वृत्त असून ठाण्यात या दोन पक्षांत सुरू असलेला हा अहंवाद जिल्ह्यातील इतर शहरांमध्ये मात्र भाजपच्या पथ्यावर पडेल या विचाराने या दोन्ही पक्षांतील स्थानिक पदाधिकारी हवालदिल झाले आहेत. ठाण्यातील वाद मिटला नाही तरी आम्हाला आघाडी हवी आहे, असे आर्जव करत शिवसेनेच्या नवी मुंबईतील काही नेत्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दार ठोठावल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

एबीपी माझाशी पालिका निवडणुकांमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीसंबंधी बोलताना आव्हाड म्हणाले की, “मी पहिल्या दिवसापासून आघाडी झाली पाहिजे असं सांगत आहे. आघाडी दोघांच्याही हिताची आहे. काही ठिकाणी त्यांच्या तर काही ठिकाणी आमच्या हिताची आहे. आपण एकमेकांचं हित पाहिलं पाहिजे. उगाच अंहकारामुळे हातचं सगळं घालवून बसायचं योग्य नाही. त्यामुळे माझा हात आघाडीसाठी नेहमीच पुढे आहे”.

एकनाथ शिंदेंचं उत्तर –

“शिवसेनेने कधीच नुकसान आणि फायद्याचा विचार केलेला नाही. गेल्या २५ वर्षांपासून शिवसेना ठाण्यात एकहाती सत्तेत आहे. त्यामुळे कोणाचं नुकसान आणि कोणाचा फायदा हे प्रत्येकाने ठरवायला पाहिजे,” असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी आव्हाडांच्या सल्ल्यावर दिलं आहे.

“शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. दोन्ही पक्षाच्या लोकांनी सामंजसपणाची भूमिका घेणं आवश्यक असतं. तसंच वरिष्ठांनी चर्चा करताना किंवा भाष्य करताना महाविकास आघाडीत तसंच स्थानिक पातळीवर मन दुखावलं जाईल असं भाष्य करु नये. मी कधीही महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात भाष्य केलेलं नाही,” असंही ते म्हणाले.

ठाण्याच्या वादात इतरांची दैना

ठाण्यातील शिंदे-आव्हाडांमधील या वादाची झळ आपल्याला बसू नये यासाठी जिल्ह्यातील इतर शहरांमधील आघाडीचे नेते मात्र सावध झाले आहेत. भाजपला टक्कर द्यायची असेल तर आघाडीशिवाय पर्याय नाही, असे आर्जव या दोन्ही पक्षांचे नेते वरिष्ठांकडे करू लागले आहेत.

ठाणे महापालिकेत गेल्या पाच वर्षांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. ठाण्यापाठोपाठ कल्याण डोंबिवली महापालिकेतही शिवसेनेची मोठी ताकद असून आतापर्यंत भाजपाच्या नऊ नगरसेवकांनी शिवबंधन हाती बांधल्याने येथेही या पक्षाची ताकद पुर्वीपेक्षा वाढली आहे. ठाणे आणि कल्याण डोंबिवली ही दोन्ही शहरे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जातात. शिंदेपुत्र खासदार श्रीकांत यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडत असलेल्या कल्याण डोंबिवली, कळवा, मुंब्रा, उल्हासनगर, अंबरनाथ या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून हे करत असताना त्यांनी पालकमंत्र्यांच्या सर्वसहमतीच्या राजकारणालाही लाल बावटा दाखविल्याची चर्चा आहे. सत्तेच्या माध्यमातून डोंबिवलीत रवींद्र चव्हाण, कल्याण ग्रामीण मतदारसंघात राजू पाटील आणि कळवा-मुंब्रा भागात थेट गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडांना अंगावर घेण्याचे आक्रमक राजकारण खासदार शिंदे यांनी सुरू केल्याने गेल्या काही महिन्यांपासून या संपूर्ण पट्टय़ातील राजकारण कमालीचे तापले आहे. आव्हाड यांची ताकद असलेल्या कळवा-मुंब्रा पट्टय़ात मिशन शिवसेना मोहीम राबवून खासदार शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांनी निवडणुकीत आघाडी नाही अशी जाहीर भूमिका घेतली आहे. नव्या प्रारूप प्रभाग रचनेत मुंब्रा भागात वाढ आणि दिव्यात प्रभागांची संख्या घटल्याने या दोन पक्षांतील वाद टोकाला पोहोचला आहे. पालकमंत्री शिंदे यांनी या सर्व वादात पद्धतशीरपणे राजकीय मौन धारण केले असले तरी त्यांचे खासदार पुत्र आणि पक्षाचे इतर नेते मात्र मिळेल तिथे आव्हाडांना आव्हान देऊ लागले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena eknath shinde ncp jitendra awhad thane municipal election mahavikas aghadi maharashtra government sgy