अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावर रेपोलीजवळ ट्रक आणि इको कार यांच्यात टक्कर होऊन गुरुवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात दहा जणांचा मृत्यू झाला. त्यात तीन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे.
मुंबईहून एक कुटुंब इको कारने रत्नागिरी जिल्ह्यातील हेदवी येथे जात होते, तर ट्रक लोटे परशुराम ‘एमआयडीसी’तून मुंबईच्या दिशेने निघाला होता. गोरेगावजवळ रेपोली येथे ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रकने समोरून येणाऱ्या इको कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात इको कारमधील नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण उपचारादरम्यान दगावला. हे सर्वजण मूळचे गुहागरचे असून, सध्या मुंबई आणि नवी मुंबई परिसरात वास्तव्याला होते. उत्तरकार्यासाठी ते गावी निघाले होते.
अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस आणि स्थानिक बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी दुर्घटनाग्रस्त वाहनात अडकलेल्या सर्वाना बाहेर काढले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दुर्घटनाग्रस्त वाहने बाजूला करून पोलिसांनी वाहतूक पूर्ववत केली.
या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक दुर्घटनेनंतर फरार झाला होता. पोलिसांनी शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.
बालकाची मृत्यूशी झुंज अर्ध्या वाटेतच संपली..
या अपघातात भव्य पंडित हा चार वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी झाला होता. जिवाच्या आकांताने रडणाऱ्या भव्यला पोलीस आणि बचाव पथकाने मोठय़ा प्रयत्नांनी वाहनाबाहेर काढले. त्याला तातडीने मागणाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमोपचार देऊन डॉक्टरांनी त्याला मुंबईतील रुग्णालयात हलविण्यास सांगितले. त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, रुग्णवाहिकेतून मुंबईला नेत असताना त्याने प्राण सोडला.
कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी ठिकठिकाणी रस्त्यांना बाह्यवळणे देण्यात आली आहेत. मात्र, या ठिकाणी वाहन चालकांना सूचना देणारे फलक ठळकपणे लावलेले नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी गाडय़ा चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. या गोंधळामुळे अपघात होतात. या दुर्घटनेतील ट्रकही चुकीच्या मार्गिकेतून येऊन इको गाडीवर आदळला. त्या ठिकाणीही वाहन चालकांना सतर्क करणारे फलक लावण्यात आले नव्हते.
मृतांची नावे :
अमोल रामचंद्र पाटील (४०), नीलेश चंद्रकांत पंडित (४५), दिनेश रघुनाथ जाधव (३०), निशांत शशिकांत जाधव (२३), स्नेहा संतोष सावंत (४५), कांचन काशिनाथ शिर्के (५८), दीपक लाड (६०), नंदिनी नीलेश पंडित (४०), मुद्रा नीलेश पंडित (१२), भव्य पंडित (४)
कणकवलीजवळ बस उलटून दोघांचा मृत्यू
सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली शहरालगत हळवल फाटय़ावर गुरुवारी पहाटे आरामबस उलटून दोघांचा मृत्यू झाला. शैलजा मांझी (५६) आणि अण्णा नाले (५२) अशी त्यांची नावे आहेत.