कुंदन शाह दिग्दर्शित ‘जाने भी दो यारों’ या चित्रपटाला आज कल्ट क्लासिकचा दर्जा प्राप्त झाला आहे, पण १९८३ मध्ये जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनी याला एवढा भरभरून प्रतिसाद दिला नव्हता. केवळ विनोदच नव्हे तर तेव्हाचं समाजातील वास्तव आणि राजकारण या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न कुंदन शाह यांनी केला होता. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह या चित्रपटाच्या सीक्वलबद्दल भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिग्दर्शक कुंदन शाह यांनी या चित्रपटाच्या सीक्वलची कथा लिहून ठेवली असल्याचं नसीरुद्दीन शाह यांनी स्पष्ट केलं आहे. एका माध्यमाशी संवाद साधताना त्यांनी या चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे. १९८३ मध्ये जेव्हा नसीर यांना या चित्रपटासाठी विचारण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी या कथेची खिल्ली उडवली होती, ही कथा त्यांना अजिबात पटली नव्हती, पण आज त्या चित्रपटाने टाकलेला प्रभाव पाहता असा चित्रपट पुन्हा होणार नाही हेसुद्धा त्यांनी मान्य केलं.

आणखी वाचा : झीनत अमान यांची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत; अभिनेत्रींना मिळणाऱ्या मानधनाच्या समस्येवर केलं भाष्य

नसीरुद्दीन शाह याबद्दल म्हणाले, “कुंदन यांनी याचा सीक्वल लिहिला आणि रवी बासवानी यांचं निधन झालं. हा सीक्वल रवीशिवाय बनूच शकत नाही या मतावर मी ठाम होतो, पण कुंदन मात्र यासाठी खूप उत्सुक होता. त्याने यासाठी मनोज बाजपेयी, विजय राज, इरफान यांची नावंसुद्धा सुचवली. त्यानंतर ओम पुरी यांचं निधन झालं आणि पाठोपाठ स्वतः कुंदन यांचंही निधन झालं आणि मग तो सीक्वल मागे राहिला तो कायमचाच.”

‘जाने भी दो यारों’ या चित्रपटातून यंत्रणा आणि त्यातील भ्रष्टाचार यावर विनोदी अंगाने भाष्य करण्यात आलं होतं. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, रवी बासवानी, सतीश शाह, ओम पुरी, पंकज कपूर, सतीश कौशिक, भक्ती बर्वे, नीना गुप्ता यांच्यासारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये होते. हा चित्रपट आणि त्याचा धमाल क्लायमॅक्स पाहताना प्रेक्षक आजही प्रचंड हसतात आणि तितकाच त्यांना खेदही वाटतो.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor naseeruddin shah says sequel of jaane bhi do yaaron was already written by kundan avn