फिल्म आणि टीव्ही क्षेत्रात लिलिपुट यांची प्रतिमा ही जरी विनोदी आणि सर्वांच्या चेहऱ्यावर खळखळून हास्य फुलवणारी बनली असली तरी ते त्यांच्या खऱ्या आयुष्यात खूपच गंभीर प्रकारचे व्यक्ती आहेत. एकेकाळी बॉलिवूडचे कॉमेडी किंग बनून फिल्म इंडस्ट्रीवर राज्य कारणारे लिलिपुट मधल्या काही काळात बॉलिवूडपासून दूर राहिले होते. हातात काम नसल्यामुळे ते इतके मजबूर झाले होते की अक्षरशः मुलीच्या घरी आसरा घ्यायची वेळ त्यांच्यावर आली होती. मधल्या काळात त्यांच्या करियरमध्ये झालेल्या चढ-उतारावर नुकतंच ते खुल्या मनाने व्यक्त झाले.
लिलिपुट यांचं खरं नाव एम एम फारुखी असं आहे. यावेळी बोलताना लिलिपुट म्हणाले, “जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा असं वाटतं फिल्म इंडस्ट्री मला खूप काही देण्यासाठी तयार होती, पण माझ्याच काही कारणांमुळे मी ते गमावून बसलो. माझ्या मनातच हीन भावना होती, त्या भावनेला मी कधीच मनातून काढू शकलो नाही. पण एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली, मी इंडस्ट्रीत कुणाच्या पार्ट्यांना जात नाही म्हणून लोक माझी अजुनही इज्जत करतात. जरी मी पैसे कमवू शकलो नाही, पण इज्जत तेव्हढी मी कमावली. जे यश मला मिळालं असतं ते मी मिळवू शकलो नाही. माझ्या शरीराच्या बांध्यावरून मला अनेक फिल्मसच्या ऑफर येत होत्या, पण मी त्या नाकारत गेलो. मला फिल्म्समध्ये अशा पद्धतीने काम करायचं नव्हतं. त्यातली एखादी फिल्म मी केली सुद्धा, पण ती चालली नाही. कित्येक फिल्ममध्ये माझे सीन कट केले जात होते. मी माझ्या फिल्मी प्रवासाबाबत समाधानी नाही.”
यापुढे बोलताना लिलिपुट म्हणाले, “जेव्हा मी लिखाण सुरू ठेवलं, त्यावेळी जावेद अख्तर यांनी स्वतः मला बोलावून घेतलं आणि माझं कौतूक देखील केलं. त्यावेळी माझ्या लाजण्याच्या स्वभावामुळे त्यावर व्यवस्थित व्यक्त होऊ शकलो नाही. एकदा ‘अलीशान’ नावाच्या फिल्मची ऑफर आली होती…यात मला बॉलिवूडचे ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांच्या बरोबरीने भूमिका करण्याची संधी मिळाली होती…पहिल्या दिवशी सेटवर जेव्हा त्यांच्याशी भेट झाली त्यावेळी मी एक संकुचित व्यक्ती असल्यामुळे थोडा घाबरलो होतो. आम्ही जवळजवळ १० ते १२ दिवस एकत्र शूटिंग केली, पण आमचं काही खास ट्यूनिंग जुळली नाही. इथे पण मी एक चूक केली.”
माझ्यातल्या असुरक्षिततेच्या भावनेनं माझं करियर उध्वस्त केलं
यापुढे ऋषी कपूर यांच्यासोबतचा किस्सा सांगताना लिलिपुट यांनी सांगितलं, “एकदा देव आनंद यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात माझी भेट ऋषी कपूर यांच्यासोबत झाली होती. त्यावेळी ऋषी कपूर माझ्या रागावले होते. अरे लिली, तू काम बीम नाही करत… दिसतंच नाही तु ..त्यांनी सुद्धा खडेबोल सुनावले. ऋषीजींचं एक वैशिष्ट्य आहे की ते ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यावरच ते रागवतात सुद्धा…कमल हसन यांनी देखील मला काम करण्यासाठी खूप प्रोत्साहित केलं होतं…पण माझ्यातल्या असुरक्षिततेच्या भावनेनं माझं करियर उध्वस्त केलं.
गेल्या ऑक्टोंबरमध्ये रिलीज झालेल्या ‘मिर्झापूर २’ वेब सीरिजमध्ये लिलिपुट यांनी दद्दा त्यागीची भूमिका साकारली. यापुर्वी दूरदर्शनवरची लोकप्रिय मालिका ‘विक्रम’ आणि ‘बेताल’ मध्ये अनेक भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. याशिवाय त्या मालिकेचे लेखक सुद्धा होते. तसंच आणखी एक मालिका ‘इंद्रधनुष’चे लेखक राहिले आहेत. ‘देख भाई देख’, ‘मिस्टर फनटूस’ सारख्या अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलंय.