मुंबईसह राज्यात एकीकडे काँग्रेस आंदोलन करत असताना दुसरीकडे राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आशिष शेलार, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंग, मंगलप्रसाद लोढा उपस्थित होते. फडणवीसांच्या सागर निवासस्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनासाठी पोहोचले असताना काही भाजपा कार्यकर्तेही त्यांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी या कार्यकर्त्यांनी फडणवीसांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. दरम्यान फडणवीसांनी या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोठं विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फडणवीसांच्या घराबाहेरील आंदोलन नाना पटोलेंनी केलं स्थगित; म्हणाले “भाजपाने महाराष्ट्र बर्बाद झाला तरी…”

‘हमसे जो टकरायेगा, मिट्टीमे मिल जायेगा’ अशा घोषणा यावेळी फडणवीसांसमोर देण्यात आल्या. काँग्रेसचा मोर्चा सागर निवासस्थानी आल्यास त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपाचे हे कार्यकर्ते जमले होते. यावेळी फडणवीसांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितलं की, नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही. माफी मागायची असेल तर देशाचं वाट्टोळं केल्याबद्दल काँग्रेसने मागावी.

फडणवीस नेमकं काय म्हणाले?

“कोणाची हिंमत नाही ते इथे येऊन निदर्शनं करतील. मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. माफी मागायची असेल तर ती काँग्रेसने या देशाचं वाट्टोळं केल्याबद्दल मागावी. त्यामुळे हे नाना पटोले वैगैरे नौटंकीबाज आहेत. यांनी कितीही नौटंकी केली तरी काही परिणाम होत नाही,” असं फडणवीस यावेळी म्हणाले. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांकडून ‘हमारा नेता कैसा हो, फडणवीस जैसा हो’ अशा घोषणा देण्यात आल्या.

काँग्रेसकडून आंदोलन स्थगित

दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तात्पुरतं आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. “महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, शिवरायांचा, विचारांचा अपमान नरेंद्र मोदींनी केला असून भाजपाने त्यांना पाठिंबा दिला असून आम्ही त्याचा निषेध करतो. भाजपानेच लोकांना रस्त्यावर आणले असून भाडोत्री लोकं उतरवली आहेत. त्यांनीच रस्ता जाम केला. ही महाराष्ट्रद्रोही भाजपा असल्याचं यानिमित्ताने स्पष्ट झालं आहे. त्यांच्यामुळे मुंबईकरांना आज त्रास सहन करावा लागत आहे. आजचं आंदोलन आम्ही तात्पुरतं मागे घेत आहोत. पण हे आंदोलन सर्व खासदारांच्या घरासमोर सुरु ठेवण्याची भूमिका स्पष्ट आहे,” असं नाना पटोले म्हणाले. आंदोलनाची पुढील तारीख आम्ही सांगू असंही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “आमचं आंदोलन झालं आहे. आमच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. पण भाजपाच्या लोकांनी आज मुंबईकरांना अडवलं. आम्हालाही गुंडगिरी करता येते, पण ही आमची संस्कृती नाही”.

“भाजपाने आपला खरा चेहरा मुंबई आणि महाऱाष्ट्राला दाखवला आहे. मोदींच्या माध्यमातून महाराष्ट्र बर्बाद झाला तरी चालेल, राज्यातील सर्व संपत्ती विकून गुजरातला नेली तरी चालेल पण आम्ही मोदींचं समर्थन करुन अशी भाजपाची वृत्ती आहे,” अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. आम्ही आंदोलन मागे घेतलं नसून लोकांची गैरसोय म्हणून ते तात्पुरतं स्थगित केलं आहे असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp devendra fadanvis on congress protest mumbai maharashtra pm narendra modi sgy