मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसनंतर काँग्रेसमध्येही फूट पडणार, अशी अफवा भाजप जाणीवपूर्वक पसरवत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी केली. काँग्रेस पक्ष एकसंध आणि मजबूत असून, भाजपच्या हुकुमशाही प्रवृत्तीला संपविण्याचा निर्धार पक्षाने केला आहे, असे त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रदेश काँग्रेसच्या गाभा समितीची बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, नसीम खान, बस्वराज पाटील, प्रणिती शिंदे, सतेज पाटील आदी नेते उपस्थित होते. राज्यातील सध्याच्या राजकीय घडमोडींचा बैठकीत आढावा घेण्यात आला.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, पंतप्रधान मोदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे जाहीरपणे आरोप करतात आणि त्यांनाच सन्मानाने सरकारमध्ये सामावून घेत मंत्रीपदे देतात. भाजपचा हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काही लोक गेले असले तरी त्याचा आमच्या आघाडीवर काहीही परिणाम झालेला नाही. उलट आघाडी आणखी बळकट झाली आहे. राज्यात जे राजकारण सुरु आहे ते मात्र महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेले नाही. जनता भाजपच्या या राजकारणाला आगामी निवडणुकीत धडा शिकवेल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp spread rumor about split in congress says nana patole zws