बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातील कोकणवासीयांच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे सत्यजीत चव्हाण यांनी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीबाबत स्वतः शरद पवार यांनी रविवारी (३० एप्रिल) ट्वीट करत माहिती दिली. या भेटीवेळी सत्यजीत चव्हाण यांच्या शिष्टमंडळाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही होते.
शरद पवार म्हणाले, “बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे सत्यजीत चव्हाण आणि त्यांच्या शिष्टमंडळाने आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.”
“दडपशाही थांबवली तरच राज्य सरकारशी चर्चा”
दरम्यान, बारसू प्रकल्पाचे सुरू असलेले सर्वेक्षण थांबवून, पोलिसांचा फौजफाटा मागे घेऊन दडपशाही थांबवली तरच राज्य सरकारसोबत चर्चा करू, असा इशारा प्रकल्पविरोधी लढ्याचे नेते सत्यजित चव्हाण यांनी दिला. तसेच आमच्या विकासाचे मॉडेल आमच्याच म्हणण्यानुसार चर्चेत मांडले जाईल, अशीही भूमिका चव्हाण यांनी शुक्रवारी (२८ एप्रिल) मुंबईतील प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मांडली होती. यावेळी रिफायनरीविरोधी संघटनेचे (बारसू-सोलगाव पंचक्रोशी) सरचिटणीस नरेंद्र जोशी आणि अध्यक्ष वैभव कोळवणकर उपस्थित होते.
“मानवासह निसर्गाला हानी करणारे प्रकल्प नकोत”
सत्यजीत चव्हाण म्हणाले होते, “कोकण विकासाचे मॉडेल हे आमच्याच म्हणण्याप्रमाणे अपेक्षित आहे. कोकणामध्ये विकास करताना पेट्रोकेमिकल झोन तयार करणारे, मानवासह निसर्गाला हानी करणारे प्रकल्प नकोत. यासंदर्भात राज्य सरकारला वारंवार निवेदने दिली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, शिंदे यांनी अद्याप भेट दिलेली नाही. एक रिफायनरी प्रकल्प झाल्यास भविष्यात इतर धोकादायक प्रकल्प उभे राहतील. त्यामुळे प्रदूषणात वाढ होईल.”
हेही वाचा : शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण, हे बदलाचे संकेत? अजित पवार म्हणाले…
“बारसू रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध कायम”
“रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध कायम असून तेथील पाच गावांतील ग्रामपंचायतीने घेतलेल्या ग्रामसभेचे ठराव या प्रकल्पाविरोधात आहेत. सोमवारपासून सुरू झालेल्या माती परीक्षणाला विरोध करण्यासाठी चार हजारांहून अधिक ग्रामस्थ बारसू सोलगावच्या सड्यावर उपस्थित आहेत. हे ग्रामस्थ बाहेरून आलेले नसून आजूबाजूच्या गावातील स्थानिक आहेत. रिफायनरीमुळे त्यांच्या गावावर परिणाम होणार असल्याने त्यांनीही विरोध केला आहे,” असे चव्हाण यांनी सांगितले होते.