नागपूर : एसटी महामंडळात चार वर्षांमध्ये ३ हजार ३३७ बसेस भंगारात निघाल्या. परंतु, राज्यात किती बसेस चांगल्या आणि किती नादुरुस्त याबाबत माहिती नसल्याचे महामंडळाने माहिती अधिकारात कळवले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

एसटी महामंडळाने राज्यभरात ३१ मार्च २०२१ अखेर ९२९ बसेस भंगारात काढल्या. ३१ मार्च २०२२ अखेर ७५२ बसेस, ३१ मार्च २०२३ अखेर ५७९ बसेस, २९ फेब्रुवारी २०२४ अखेर १ हजार ७७ बसेस भंगारात काढल्या. त्यामुळे गेल्या चार वर्षांत एसटीच्या एकूण ३ हजार ३३७ बसेस भंगारात निघाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी समोर आणली आहे. कोलारकर यांनी एसटी महामंडळाच्या मुंबई मुख्यालयाला राज्यात चांगल्या व नादुरुस्त अवस्थेतील बसेसची माहिती मागितली होती. परंतु, उत्तरात एसटी महामंडळाच्या या शाखेकडे ही माहिती उपलब्ध नसल्याचे धक्कादायक उत्तर देण्यात आले. त्यामुळे एसटीच्या मुंबईतील मुख्यालयात चांगल्या आणि नादुरुस्त स्थितीतील बसेसचा आढावा घेतला जात नाही का, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

हेही वाचा…“नाशिकमधून महायुतीतर्फे तुम्ही उभे राहा, असे मला सांगण्यात आले,” छगन भुजबळ यांची माहिती; म्हणाले, “आता उमेदवारीचा मुद्दा…

भंगारातील वाहनांची आकडेवारी

वर्ष संख्या

३१ मार्च २०२१ अखेर ९२९

३१ मार्च २०२२ अखेर. ७५२

३१ मार्च २०२३ अखेर. ५७९

२९ फेब्रु. २०२४ अखेर. १०७७

हेही वाचा…बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपुरातील कर्मचाऱ्याला फोन

महिला, वृद्धांना दिलेल्या सवलतीमुळे एसटीतील प्रवाशांची संख्या वाढली आहे. एसटीत बऱ्याच वर्षांपासून नवीन बसेस आल्या नाहीत. काही बस भंगारात निघाल्या. बसची संख्या कमी झाल्याने एसटीच्या सुविधांवर परिणाम झाला आहे. – अजय हट्टेवार, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना