नाशिक – शरद पवार हे २००४ मध्ये भाजपासोबत न गेल्याचे दुःख कुणाला असेल तर त्याला नाईलाज आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना लक्ष्य केले. अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची २००४ मध्ये भाजपाशी युती होणार असल्याचे म्हटले होते. त्यांचे म्हणणे खोडून काढताना पाटील यांनी प्रत्यक्षात काय घडले, यावर सर्वांनी विश्वास ठेवायला हवा. तेव्हा आपण लहान होतो. तपशील माहिती नाही. पण, राष्ट्रवादी भाजपासोबत गेली का, असा प्रश्न त्यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर असणाऱ्या पाटील यांनी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पाच राज्यातील मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षावर त्यांनी त्या फारशा विश्वासार्ह नसल्याचे नमूद केले. इंडिया आघाडी बळकट होत आहे. महागाई, बेरोजगारी, भाजपा सरकारचे अपयश लोकांसमोर आहे. नैसर्गिक संकटाने नाशिकमध्ये झालेल्या नुकसानीकडे सरकारने वेगळ्या दृष्टीने पहायला हवे. द्राक्ष बागायतदारांना कर्जाच्या परत फेडीसाठी दोन ते तीन वर्षांचे हप्ते बांधून देणे आणि कमी व्याज दराने नवीन पीक कर्ज उपलब्धता करण्याची गरज त्यांनी मांडली.

हेही वाचा – सातव्या वेतन आयोगाच्या फरकासाठी वनविकास कर्मचाऱ्यांचे आंदोलन

कांदा उत्पादकांना त्याच धर्तीवर मदतीची आवश्यकता आहे. यापूर्वी सरकारने कांद्याला ३५० रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केले होते. अधिकतम २०० क्विंटलपर्यंत ते दिले जाणार होते. ही रक्कम ७० हजार रुपयांच्या आसपास होते. आजवर शेतकऱ्यांना यातील केवळ १० ते २० हजार रुपये मिळाले. नव्या शासकीय निर्णयानुसार अनुदानाची रक्कम २४ हजारांच्या पलीकडे जाणार नाही. जाहीर केल्यानुसार अनुदान दिले नसल्याने महायुती सरकार आपल्या शब्दाला जागत नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाल्याचे पाटील यांनी नमूद केले.

राज्यात दुष्काळाची दाहकता वाढत असून अनेक भागांत पिण्याचे पाणी नाही. शेतीसमोर तोच प्रश्न आहे. जुलैपर्यंत कसे रहायचे. याची सर्वत्र चिंता आहे. काही भागात टँकर सुरू झाले. परंतु, अनेक भाग त्यापासून वंचित आहे. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यासाठी निर्णय घेतला गेलेला नाही. सरकारने दुष्काळाच्या प्रश्नांकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा – जळगाव : पारोळा तालुक्यात तीन वाहनांच्या अपघातात तीन महिलांचा मृत्यू, २० जण जखमी

हे चांगल्या मुलाचे लक्षण नाही – अजित पवार यांच्यावर टीका

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्हाला अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची, ज्याच्यावर अन्याय झाला, त्यामागे जाण्याची शिकवण दिली. पण काहीजण सत्तेत गेले अन ते पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठका घेत आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या वेदना त्यांना भेटून जाणून घेत आहोत. आर्थिक तिजोरी तुमच्याकडे, कृषिमंत्रीपद तुमच्याकडे, मग शेतकऱ्यासाठी तिजोरी मोकळी का करत नाही, असे टिकास्त्र जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख न करता दिंडोरीतील आक्रोश मोर्चात सोडले. कुटुंबातील काही गोष्टी, चर्चा कुटुंबात ठेवायच्या असतात, त्या चर्चा बाहेर सांगायच्या नसतात. हे चांगल्या मुलाचे लक्षण नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil targeted praful patel inspected damage caused by unseasonal rains in nashik ssb