-
आज प्रत्येकाच्या घरी एक किंवा त्यापेक्षा जास्त दुचाकी नक्कीच असतील. मात्र, सायकल आहे का? असा प्रश्न विचारल्यास नक्कीच लगेच उत्तर देता येणार नाही. पण पिंपरी-चिंचवड शहरातील एक ५१ वर्षीय अवलिया गेल्या पंधरा वर्षांपासून घर ते नोकरी आणि इतर दैनंदिन कामकाजासाठी दुचाकी न वापरता सायकल वापरतात. यामुळे ते पंचवीशीतील तरुणांप्रमाणे अगदी तंदरुस्त आहेत. ते दररोज ३५ ते ४० किलोमीटर सायकल चालवतात. सायकल चालवल्याने माझा व्यायाम होतो आणि मी तंदुरुस्त राहतो, असं ते सांगतात. मुरलीधर अंबुसकर असं या अवलीयाचे नाव आहे.
-
मुरलीधर दररोज सायकलवरुनच आपल्या ऑफिसला जातात. ते एका खासगी कंपनीत नोकरीला असून त्यांना जेमतेम १० ते १२ हजार पगार मिळतो. मात्र, त्याच पैश्यांमध्ये त्यांना कुटुंब चालवावं लागतं. त्यामुळेच सायकलवरुन प्रवास केल्याने पैसेही वाचतात. सध्या पेट्रोल चे भाव गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्या बाहेर गेल्याने खिशाला झळ बसत आहे. त्यामुळे नागरिकांनी सायकलचा वापर करावा असं आवाहन मुरलीधर यांनी केलं आहे.
-
पैश्यांची बचत होईल शिवाय फिटनेसवर देखील सायकल चालवण्याचा परिणाम दिसेल असं मुरलीधर यांनी स्वत:च्या अनुभवावरुन सांगितलं आहे. शहरात सायकल चालविल्याने वेगवेगळ्या ठिकाणी असणारी कामं लवकर होतात. ट्रॅफिकमध्ये अडकण्याची भीती नसते. तसेच, बसची तासंतास वाट पहावी लागत नाही, असंही मुरलीधर यांनी सांगितलं आहे.
-
मुरलीधर यांच्या घरात दोन दुचाकी असून मुलगी, मुलगा आणि पत्नी त्यांचा वापर करतात. सायकल खूप वर्षांपासून वापरत असल्याने त्याची सवय झाली आहे. महिन्याला सायकलला तीनशे रुपये खर्च येतो. हेच दुचाकी किंवा इतर वाहनांना म्हटलं तर हजारोच्या घरात खर्च जातो. सायकल चालविल्याने वायू प्रदूषण होत नाही असं देखील मुरलीधर सायकलची कॉस्ट इफेक्टीव्हनेस सांगताना म्हणतात.
-
अनेक नागरिक स्वतःच्या प्रतिष्ठेमुळे सायकल वापरत नाहीत. परदेशात ज्याप्रमाणे सायकलस्वारांना प्राधान्य दिलं जातं तसं आपल्याकडे होतं नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या सायकस्वारला फारसे महत्व दिलं जात नाही. त्यामुळेच मुरलीधर यांच्यासारखे लोकं आज विशेष वाटतात.
-
सर्वांनाच मुरलीधर यांचा आदर्श घेणं गरजेचं आहे. शहरात वाहनांची गर्दी वाढली आहे तसेच पेट्रोल चे भाव देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आठवड्यातून दोन दिवस का होईना मोटार, दुचाकी न चालवता सायकल चालवली तर त्यात वावग काय. यामुळे वायू प्रदूषण होणार नाही, इंधनाची बचत होईल, शहरातील हवा शुद्ध राहील असे अनेक फायदे नागरिकांना होतील हे वेगळं सांगण्याची गरज नाही. नाही का?

‘कांटा लगा गर्ल’ अभिनेत्री शेफाली जरीवालाचं ४२ व्या वर्षी निधन, पतीचा रुग्णालयाबाहेरचा व्हिडीओ Viral, नेमकं काय घडलं?