लोकसभा निवडणुकीत कोकण आणि ठाणे पट्टयात महायुती आणि महाविकास आघाडीला संमीश्र कौल मिळत असल्याचा अंदाज प्रमुख मतदानोत्तर चाचण्यांमध्ये वर्तविण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरलेली ठाण्याच्या जागेवर उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे आघाडीवर असल्याचा कौल टीव्ही-९ या वृत्तवाहिनीनेनी दिला असून ठाकरे गटासाठी भावनिकदृष्टया महत्वाची मानली जाणारी रत्नागिरी-सिंधूदुर्ग या कोकणातील लक्षवेधी मतदारसंघात नारायण राणे यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशाचा कौल भाजपला अनुकूल दिसत असताना महाराष्ट्रात मात्र महायुती आणि महा विकास आघाडीत जोरदार संघर्ष असल्याचे पहायला मिळत आहे. कोकण ठाणे पट्टयात भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव सेना, राष्ट्रवादीच्या शरद पवार पवार गटात थेट सामना होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाणे जिल्ह्यातील तिन्ही जागा महत्वाच्या होत्या. त्यापैकी ठाण्याच्या जागेवर शिंदे आणि उद्धव यांच्या शिवसेनेत जोरदार संघर्ष झाल्याचे चित्र असून टिव्ही ९ या वृत्तवाहिन्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार येथून उद्धव सेनेचे राजन विचारे आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कल्याणची जागा शिंदे पुत्र डाॅ.श्रीकांत राखतील असा अंदाज असून भिवंडी लोकसभेत झालेल्या तिरंगी लढतीत भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील आघाडीवर असल्याचा अंदाज आहे. कुणबी मतदारांच्या ध्रुवीकरणाच्या चर्चेमुळे भिवंडीची जागा पाटील यांच्यासाठी अवघड मानली जात आहे.

हेही वाचा >>>Exit Poll: २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये एक्झिट पोलचा अंदाज किती अचूक होता?

तळ कोकणात भाजप, तर रायगडात उद्धव सेना ?

ठाणे जिल्ह्यासह कोकणातील रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदूर्ग या दोन्ही मतदारसंघात महायुती आणि उद्धव सेनेत टोरदार संघर्ष झाल्याचे पहायला मिळाले होते. यापैकी रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे विद्यमान खासदार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या मतदारसंघात उद्धव सेनेचे माजी खासदार अनंत गिते यांनी आघाडी घेतल्याचा अंदाज टीव्ही ९ वृत्तवाहिनेने वर्तविला असून अजित पवार गटासाठी ही चिंतेची बाब ठरणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गाची जागा उद्धव सेनेसाठी भावनिकदृष्ट्या महत्वाची मानली जाते. येथे मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्यासाठी ही जागा मागितली होती. मात्र भाजपने नारायण राणे यांच्यासाठी हट्टाने ही जागा मागून घेतल्याने यंदा कोकणात पहिल्यांदाच शिवसेनेचे धनुष्यबाण गायब झाले होते. येथून नारायण राणे आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून राणे कुटुंबियांसाठी ही बाब दिलासादायक ठरु शकते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is estimated that mahayuti and mahavikas aghadi are getting mixed votes in konkan and thane areas in the lok sabha elections print politics news amy