लातूर : अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याच्या सत्तेत सहभागी झाल्यावर भाजपचे राजकीय गणित बदलत असून त्याचे परिणाम लातूर जिल्ह्यात दिसत आहेत. अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील व उदगीरचे आमदार संजय बनसोडे या दोघांनी अजित पवार यांना साथ दिल्याने दोन्ही ठिकाणी भाजपअंतर्गत अस्वस्थता निर्माण झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमुळे अहमदपूरचे माजी आमदार विनायकराव पाटील सर्वाधिक अस्वस्थ आहेत. यापूर्वी विनायकराव पाटील अपक्ष निवडून आले होते. त्यांनी पुढे भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर भाजपामधील इच्छुक मंडळी नाराज झाली. पक्ष श्रेष्ठींकडे विनायकराव पाटील सोडून कोणालाही विधानसभेची उमेदवारी द्या सर्वजण आम्ही एकमुखी त्यांच्या पाठीशी राहू असे सांगितले होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी विनायकराव पाटील यांना तिकीट दिले त्यानंतर अहमदपूरमधील दिलीपराव देशमुख व आयोध्या केंद्रे या दोघांनी बंडखोरी केली. परिणामी विनायकराव पाटील यांचा पराभव झाला व राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील आमदार झाले. त्यानंतर पक्ष एकजूट ठेवायचा म्हणून आयोध्या केंद्रे व दिलीपराव देशमुख या दोघांनाही पुन्हा भाजपात प्रवेश देण्यात आला. दिलीपराव देशमुख यांना तर भाजपने ग्रामीण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष केले आहे. आमदार बाबासाहेब पाटील हे अजित दादासोबत आल्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी नक्की मानली जाते. त्यामुळे अस्वस्थांच्या यादीत माजी आमदार विनायकराव पाटील हे अग्रेसर. त्यामुळे पुढील निवडणुकीत कोणता पक्ष निवडायचा याचा विचार ते करत आहेत.

हेही वाचा – महिला आरक्षण विधेयकाचा विजयोत्सव भाजपा खासदाराच्या अश्लाघ्य विधानामुळे काळवंडला

माजी मंत्री व निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी १९ तारखेपासून जिल्ह्यात जलजागर यात्रा सुरू केली आहे. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे व प्रत्येक जिल्ह्याला वेगळा वाटा मिळावा ही भूमिका घेऊन ते सर्व तालुक्यांत यात्रा काढत आहेत. त्या यात्रेला पाठिंबा मिळतो आहे. उदगीर तालुक्यातील नळगीर येथे माजी मंत्री व अजितदादा गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सक्रिय कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी जलयात्रेला पाठिंबा दिला. संभाजीराव निलंगेकर हे महत्त्वाचे काम करत असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले. बाळासाहेब जाधव निलंगेकरांच्या व्यासपीठावर गेल्यानंतर अहमदपूरमध्ये विनायकराव पाटील मित्र मंडळात अस्वस्थता अधिक वाढली. यात्रा हाडोळती या गावी आल्यानंतर यात्रेला काळे झेंडे दाखवण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणताही राजकीय विषय चर्चेला जाऊ नये, म्हणून या यात्रेला विरोध असल्याचे निदर्शकाचे म्हणणे होते. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपली ही यात्रा राजकीय नाही, पाण्याच्या प्रश्नासाठी आहे. या यात्रेत कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा नाही. पांढरा झेंडा हा शांतीचे प्रतीक तर निळा झेंडा हा पाण्याचे प्रतीक आहे, असे सांगत आपला पाठिंबा मराठा आरक्षणाला आहे. मात्र यासाठी लोकांनी राजकारण करू नये असे म्हटले.

हेही वाचा – महिला आरक्षण विधेयक : मोदींना लोकसभेत ओबीसी-मुस्लीम महिला नको आहेत का? मुस्लीम खासदाराचा प्रश्न

जलयात्रेचे निमित्त करत विनायकराव पाटील गटाने आपली अस्वस्थता जाहीरपणे व्यक्त केली आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपला सोडचिठ्ठी देणार व त्याची तयारी त्यांचे समर्थक करत असल्याचेच सांगण्यात येत आहे. आगामी काळात यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यातील अस्वस्थता वाढत राहील, असेच सध्याचे चित्र आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uneasiness within the bjp increased in latur district print politics news ssb