जायकवाडीत ३.८ टीएमसी उपयुक्त साठा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

औरंगाबादसह जायकवाडीच्या परिसरातील ३०० गावांची तहान भागावी, म्हणून जायकवाडी जलाशयात नगर व नाशिक जिल्ह्य़ांतून सोडलेल्या पाण्याचा प्रवास आता विनाअडथळा सुरू आहे. आतापर्यंत निळवंडे धरणातून १.७४ टीएमसी, दारणामधून १.५५ टीएमसी, तर मुळा धरणातून २.४१ टीएमसी पाणी गोदावरीच्या पात्रात सोडण्यात आले. त्यामुळे जायकवाडी जलाशयात सोमवारी सायंकाळी ५ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार पाणीसाठय़ात २.९४ टक्के वाढ झाली आहे. सध्या जायकवाडीत ३.८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. नाशिक व नगर जिल्ह्य़ांतून पाणी सोडण्यास राजकीय विरोध होता. तथापि, मराठवाडय़ातील आमदारांनी व मंत्र्यांनी हा विषय लावून धरल्याने मराठवाडय़ासाठी पाणी देण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला. मुळा धरणातून पाणी सोडल्यानंतर मोठा विरोध झाला. तथापि, गेल्या दोन दिवसांपासून आंदोलने निष्प्रभ ठरल्याने पाण्याचा प्रवाह विनाअडथळा सुरू आहे. सोमवारी निळवंडे धरणातून ३ हजार ४५७ क्युसेक्स वेगाने पाणी सुरू होते, तर दारणामधील वेग ६ हजार ८६ क्युसेक्स होता. पुढचे दोन दिवस जायकवाडीत पाणी येत राहील, असे कडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत जायकवाडीत २ ते सव्वादोन टीएमसी पाणी वरच्या धरणातून आले, तर आणखी तेवढेच पाणी येत्या दोन-तीन दिवसांत येणे सुरू राहील. साडेचार टीएमसी पाणी जायकवाडी जलाशयात आल्याने पाणीटंचाईची तीव्रता फारशी जाणवणार नाही.
याचिकेवर दोन आठवडय़ांनी सुनावणी
नगर व नाशिक जिल्ह्य़ांतील धरणांमधील पाणीसाठा व गोदावरीवरील अन्य धरणांमधील पाणीसाठा समान पातळीवर असावा, अशी मागणी वारंवार होत आहे. या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली. त्यामुळे गोदावरी खोरे महामंडळातील अधिकारी नगर व नाशिकमधील पिण्याचे पाण्याचे आरक्षण अस्तित्वात असणारे पाणी याची आकडेवारी गोळा करण्यात मश्गुल आहेत. सोमवारी या अनुषंगाने सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे पाण्याच्या अनुषंगाने माहिती सादर करण्यासाठी सहा आठवडय़ांचा वेळ मागण्यात आला होता. दोन आठवडय़ांनंतर पुढील सुनावणी होणार आहे.

मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water way without any disturbance