महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी सरकारनं नवं इलेक्ट्रिक धोरण देखील आखलं आहे. प्रदूषण आणि इंधनाचे वाढते दर पाहता इलेक्ट्रिक वाहनं घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. नुसती इलेक्ट्रिक वाहनंच नाही तर त्या दृष्टीने सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही पावलं उचलली जात आहेत. आता पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई इव्ही सेलचं उद्घाटन केलं. या संदर्भातलं ट्वीट त्यांनी आपल्या अधिकृत खात्यावरून केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करताना लिहिलं आहे की, “ही तर केवळ सुरूवात आहे. क्लायमेट इमर्जन्सीच्या या काळात आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आमच्या प्रयत्नांना पाठिंबा दिल्याबद्दल मी @WRICitiesIndia चा आभारी आहे. @mybmc, @myBESTBusव शाश्वत विकासाच्या दिशेने जाताना आमच्या प्रयत्नांत सहभागी होणाऱ्या मुंबईकरांचेही मी आभार मानतो. मला सांगताना अभिमान वाटतो, इव्ही धोरण जाहीर केल्यापासून, महाराष्ट्रातील EV नोंदणीमध्ये १५७% नी वाढ झाली आहे. आम्ही बेस्टचा ताफा पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या, ३८६ बेस्ट बस इलेक्ट्रिक आहेत. २०२३ पर्यंत ५०% व २०२७ पूर्वी १००% बसेस इलेक्ट्रिक झालेल्या असतील. मुंबई शहरात इव्हीचा वापर वाढावा यासाठी आज आम्ही मुंबई इव्ही सेलचे उद्घाटन केले. या सेलमध्ये शाश्वत वाहतूक व्यवस्थेतील तज्ज्ञांचा समावेश असेल. हे तज्ज्ञ चार्जिंग स्टेशन्सचे नेटवर्क उभारणे, बॅटरी डेव्हलपमेंटला पाठबळ देणे आणि मार्केटमध्ये प्रवेश करणे यासाठी मदत करतील.”

महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीवरील अनुदान

इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणाऱ्या पहिल्या १ लाख ग्राहकांना प्रति kWh बॅटरी क्षमतेच्या ५ हजार रुपयांच्या प्रोत्साहनासह अनुदान देण्याची राज्याची योजना आहे. ३१ मार्चपूर्वी ३ kWh बॅटरी असलेली इलेक्ट्रिक दुचाकी घेणार्‍या व्यक्तींसाठी महाराष्ट्र १५ हजार रुपयांपर्यंत अर्ली बर्ड बोनस देत आहे. यापूर्वीची मुदत गेल्या वर्षी ३१ डिसेंबर होती ती वाढवण्यात आली आहे. सुधारित धोरण लागू झाल्यानंतर इव्ही उत्पादक Ather Energy चे सीईओ तरुण मेहता यांनी जाहीर केले की ,Ather 450 आणि Ather 450X ची किंमत महाराष्ट्रात सर्वात कमी असेल. दुसरीकडे, ई-टू-व्हीलरचे उत्पादक देखील १२ हजार रुपयांपर्यंतच्या बोनससाठी पात्र असतील. मात्र किमान पाच वर्षांची बॅटरी हमी आणि खात्रीशीर बायबॅक योजना असायला हवी.

महाराष्ट्रात इलेक्ट्रिक चारचाकी खरेदीवरील अनुदान

महाराष्ट्राच्या इव्ही धोरण २०२१ नुसार, इलेक्ट्रिक कार आणि एसयूव्हीसाठी आधारभूत प्रोत्साहन दुचाकीसारखंच आहे. बॅटरी क्षमतेच्या प्रति kWh प्रमाणे ५ हजार रुपये आहे. ३० kWh पर्यंत बॅटरी क्षमता सवलतीसाठी पात्र आहेत, एकूण रु. १.५ लाख इतके प्रोत्साहन मिळते. ३१ मार्चपूर्वी खरेदी करणार्‍यांना १ लाख रुपयांच्या अतिरिक्त प्रोत्साहनासह अनुदान मिळत आहे. टाटा टिगोर ईव्ही झिप्टट्रॉन आणि टाटा नेक्सॉनच्या दोन व्हेरिंयट खरेदी करण्याऱ्यांना या अनुदानाचा फायदा होईल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government launch ev cell in mumbai rmt