राज्यात मान्सून दाखल होऊन १० दिवस झाले असले, तरी अनेक भागात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी पावसाची आतुरतेने वाट बघत आहेत. अशातच आता हवामान विभागाकडून महत्त्वाची बातमी पुढे आली आहे. राज्यातील काही भागात पुढे तीन ते चार दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान तज्ज्ञ एस के होसाळीकर यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील काही भागात पुढचे तीन ते चार दिवस पावसाचा येलो अर्लट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ एस. के. होसाळीकर यांनी दिली आहे. तसेच महाराष्ट्रात मान्सून सध्या जळगाव आणि विदर्भातल्या अमरावतीपर्यंत पोहोचला असून मान्सूनने अद्याप महाराष्ट्र व्यापलेला नाही. नंदूरबार किंवा पूर्वी विदर्भात अद्याप मान्सून दाखल झालेला नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – राज्यात ४८३ गावांना दरडींचा धोका; रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील ठिकाणे निश्चित

राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाकडून काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यानुसार राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात मेघगर्जनेसह तर इतर काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे, बऱ्याच ठिकाणी ४० ते ५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली, असंही त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना त्यांनी शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी कृषीविभागाच्या अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असं आवाहनही केलं आहे. शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. मान्सूनच्या सुरुवातीला जो पाऊस पडतो, तेव्हा जमीन उष्ण असते, त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन होते. महत्त्वाचे म्हणजे पेरणी झाल्यानंतर पुढे पाऊस कधीपर्यंत येईल, याबाबत माहिती असणंही महत्त्वाचे आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभागाची आकडेवारी आणि कृषी विभागाच्या सल्ला हे बघून पेरणीची कामे करावी, असे ते म्हणाले.

हेही वाचा – बाजारात रेनकोट, छत्र्या खरेदीसाठी गर्दी; छत्र्या – रेनकोटच्या दरात वाढ

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणात सरासरीपेक्षा २५ टक्के कमी, तर विदर्भात सरासरीपेक्षा ३० टक्के कमी पाऊस झाल आहे. तसेच मराठावाड्यात सरासरीपेक्षा ६३ टक्के जास्त तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ३१ टक्के जास्त पाऊस पडला आहे. राज्यात या आतापर्यंत सरासरी १०२.३ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात १०५.८ मिमी पाऊस पडला आहे. याशिवाय किनारपट्टीवर मुंबई शहर ४६, मुंबई उपनगरे ४९, पालघर ३०, रायगड ३३, रत्नागिरी ३०, सिंधुदुर्ग १६ आणि ठाणे येथे सरासरीपेक्षा ३९ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra monsoon update yellow alert for konkan vidarbha for 3 to 4 days spb