अलीकडील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा हे दोन पक्ष या राजकीय घडामोडींचे केंद्र ठरत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे काही आमदारांचा गट घेऊन भाजपाबरोबर जातील, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुतांश आमदारही यंदा अजित पवारांच्या बाजूनं असल्याची कुजबूज सुरू आहे. यावर आता प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
‘टिव्ही ९ मराठी’शी बच्चू कडू संवाद साधताना म्हणाले, “अजित पवार शिवसेना, भाजपात जाणार किंवा राष्ट्रवादीत राहणार, याबद्दल माझा कोणताही अभ्यास नाही. कोण, कधी, कुठं जाणार हे याबाबत सध्या काहीच सांगता येऊ शकत नाही. गेले तरी त्यात काही वावगे नाही. ज्याच्या त्याच्या सोयीने लोक फेरबदल करत राहतात.”
हेही वाचा : अजित पवारांबाबतच्या दाव्यांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टीकरण देताना म्हणाले, “ही चर्चा…!”
‘कोणालाही मनापासून सोडून जायचं नाही, पण, कुटुंबाला टार्गेट केलं जात आहे,’ असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. याबद्दल प्रश्न विचारल्यावर बच्चू कडूंनी म्हटलं, “अजित पवारांवर दबाव येऊ शकतो, असं वाटत नाही. ते ‘दादा’ असून, त्यांच्यावर कसा दबाव येऊ शकतो. अजित पवारांवर दबाव असेल, तर राज्यातील जनतेची मोठी अडचण होईल. एवढ्या मोठ्या नेत्यावर दबाव असेल, तर त्यांनी राजकारण सोडून द्यावं.”
हेही वाचा : “मला चर्चेला बोलावलं तर पक्षावरची नाराजी दूर होईल, पण…”, सत्यजीत तांबे यांचं सूचक वक्तव्य
“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वकाही अलबेल”
“अजित पवारांनी वज्रमूठ सभेत भाषण केलं नाही, याचा खुलासा त्यांनी स्वत:च केला आहे. विधानसभा अधिवेशनात अजित पवारांनी आपली भूमिका जोरदारपणे मांडली आहे. तसेच, राष्ट्रवादीत सर्वकाही अलबेल आहे,” अशी भूमिका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.