मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गाने प्रवास करताना प्रवाशांना चक्कर येणे, डोके दुखणे व इतर अत्यावश्यक वैद्यकीय सेवेची आवश्यकता भासते. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा अपघातांना सामोरे जाणाऱ्या प्रवाशांना मदत करण्यासाठी प्रमुख रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय केंद्रे सुरू करण्यात आली होती. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून अनेक प्रमुख स्थानकांतील ही केंद्रे बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचाराची आवश्यकता भासणाऱ्या प्रवाशांना धोका निर्माण होऊ शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेल्वेतून प्रवास करताना अचानक प्रकृती खालाविल्यास किंवा रेल्वे दुर्घटनेत जखमी झाल्यास संबंधितांवर त्वरित उपचार करता यावेत यासाठी रेल्वे स्थानकाजवळ आपत्कालीन वैद्यकीय केंद्रे सुरू करण्यात आली होती. मात्र बहुतांश वेळा या केंद्रात वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर नसल्याचे; तसेच महत्त्वाची वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत होत्या. दरम्यान, मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांतील आपत्कालीन वैद्यकीय केंद्रे बंद असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी माहिती अधिकारातून मागविलेल्या माहितीतून उघड झाले आहे.

मध्य रेल्वेवरील कर्जत, कल्याण, कुर्ला, उल्हासनगर, चेंबूर, कळवा, दादर, वाशी, घाटकोपर आणि भांडूप येथे २०२३ साली आपत्कालीन वैद्यकीय केंद्रे सुरू करण्यात आली होती. मात्र कुर्ला येथील आपत्कालीन वैद्यकीय केंद्र बंद करण्यात आले. त्यानंतर १ डिसेंबर २०२३ रोजी उल्हासनगर, १५ डिसेंबर २०२३ रोजी कर्जत, १९ नोव्हेंबर २०२३ रोजी चेंबूर, २० नोव्हेंबर २०२३ रोजी कळवा, २९ नोव्हेंबर २०२३ रोजी भांडुप, जानेवारी २०२४ रोजी गोवंडी, २० जून २०२४ रोजी ठाणे, १८ जून २०२४ रोजी टिटवाळा, मानखुर्द, पनवेल आणि २ डिसेंबर २०२४ रोजी विक्रोळी येथील आपत्कालीन वैद्यकीय केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे प्रवासी वैद्यकीय सेवेपासून वंचित झाले. तसेच रेल्वे प्रवाशांना प्राथमिक उपचार अथवा तातडीच्या उपचारांसाठी रेल्वे परिसरातून बाहेर जावे लागत आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कल्याण, वाशी, भायखळा, विक्रोळी आणि घाटकोपर या पाच स्थानकांमधील आपत्कालीन वैद्यकीय केंद्र सुरू आहे. याशिवाय, मध्य रेल्वेवरून प्रवास करताना अनेकदा लोकलमधून पडून, रेल्वे रूळ ओलांडताना प्रवासी गंभीर जखमी होतात. मात्र प्रवाशाला योग्य वेळात प्रथमोपचार मिळाला नाहीत. त्यामुळे प्रवासी दगावू शकतात. रेल्वे अपघातातील जखमी प्रवाशांना लवकरात लवकर उपचार मिळावे, चांगल्या प्रकारची सेवा मिळावी यासाठी मध्य रेल्वेवरील स्थानकांजवळील खासगी रुग्णालयांशी मध्य रेल्वे प्रशासनाने करार केला आहे. जास्तीत जास्त स्थानकांजवळील रुग्णालयांशी करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emergency medical centers at railway stations closed mumbai print news amy