यवतमाळ: बोगस बियाण्यांमुळे होणारी फसवणूक, उत्पादनावर झालेला परिणाम, शेतीचा वाढलेला खर्च आदी कारणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. अशा शेतकऱ्यांना गळाला लावून अनेक बियाणे कंपन्या व दलाल त्यांचा वापर आता बोगस बियाणे विक्रीच्या साखळीत करत असल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यात उघडकीस आला आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड होणार्या कापसासाठी प्रतिबंधित एचटीबीटी (तणनाशक सहनशील) बियाण्यांची विक्री शेतकऱ्यांच्या माध्यमातून होत असल्याचे वास्तव कृषी विभागाच्या कारवाईतून समोर आले आहे. राळेगाव आणि नेर तालुक्यात या घटना उजेडात आल्या. राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथे एका शेतकर्याच्या घरात तर नेर तालुक्यातील माणिकवाडा येथे एका शेतकऱ्याच्या शेतात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून लाखो रुपयांचा बोगस बियाण्यांचा साठा जप्त केला आहे.
जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र वाढल्याने, ही संधी साधून काही कृषी केंद्र चालक आणि कंपन्यांचे एजंट संगनमताने शेतकर्यांच्या माथी बोगस आणि प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे मारण्याचा घाट घालत असल्याची तक्रार आहे. ही प्रतिबंधित बियाण्यांची पाकिटे अनेकदा विश्वासातील शेतकर्यांच्या घरी, शेतात साठवली जातात आणि तेथूनच कंपनी एजंटामार्फत त्यांची थेट गावात विक्री केली जाते. कंपन्यांचे एजंट थेट शेतकर्यांशी संपर्क साधून, त्यांना तणनाशक सहनशीलतेचे आमिष दाखवून या बियाण्यांची विक्री करतात. हा गोरखधंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फोफावला असल्याची शेतकर्यांची तक्रार आहे.
राळेगाव पंचायत समितीच्या कृषी अधिकारी मनीषा पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर, त्यांच्या पथकाने तालुक्यातील अंतरगाव येथील शेतकरी कैलास डोमाजी चंदनखेडे याच्या घरावर धाड टाकली. या कारवाईत चंदनखेडे याच्या घरातून ‘आर कॉटन बीजी फोर’, ‘हायब्रीड सीड्स’, ‘आर कॉटन ७०२ फोरजी’ अशा विविध कंपन्यांच्या एचटीबीटी कापूस वाणांची एकूण ४८ पाकिटे जप्त केली. या बियाण्यांची किंमत सुमारे ४३ हजार २४८ रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. कैलास चंदनखेडे यांच्या विरोधात बियाणे अधिनियमानुसार विनापरवाना प्रतिबंधित बियाण्यांची साठवणूक आणि विक्री करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेर तालुक्यातील माणिकवाडा येथे रोशन उर्फ राजू शेलोकर या शेतकऱ्याने शेतात अवैध बियाणे लपवून ठेवल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्या आधारे धाड टाकून शेतकऱ्याच्या शेतातून ‘कॉट५५’ व ‘राजाराम ७’ नावाची बियाण्याची लपवून ठेवलेली ६२ पाकिटे जप्त करण्यात आली. यात एचटीबीटी प्रकाराचे अनधिकृत व मान्यता नसलेले कापूस बियाणे असल्याचे निष्पन्न झाले. जप्त केलेल्या बियाण्याची एकूण किंमत ७७ हजार ५०० रुपये असून, यावेळी ५५ हजार रुपये किमतीची मोटार सायकल मिळून एकूण एक लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात रोशन उर्फ राजू शेलोकर (रा.माणिकवाडा) याच्या विरोधात पोलीस ठाणे नेर येथे मोहीम अधिकारी प्रवीण जाधव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एचटीबीटी बियाणे हे तणनाशक सहनशील असल्याचा प्रचार करून कंपनी एजंट शेतकर्यांकडून आगाऊ नोंदणी करून घेत असल्याचीही माहिती आहे. या प्रकारामुळे शेतकर्यांची फसवणूक होत असून, त्यांच्या पिकांचेही नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने अशा बोगस बियाणे विक्रेत्यांचा आणि त्यांना मदत करणार्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
तक्रार करण्याचे आवाहन
शेतकरी बांधवांनी अनधिकृत बियाणे विकत घेऊ नयेत. अधिकृत कृषी सेवा केंद्रातून पक्के बिल घेऊनच बियाण्याची खरेदी करावी. अशा अनधिकृत विक्रीचा कुठे संशय आल्यास कृषी विभागात तत्काळ तक्रार करावी, असे आवाहन नेर येथील कृषी अधिकारी संजय पवार यांनी केले आहे.