लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक- गणेश विसर्जनावेळी वेगवेगळ्या घटनांमध्ये गोदावरी व वालदेवी नदीपात्रात सात जण बुडाले. यातील चार युवक गोदावरी तर तीन जण वालदेवी नदीपात्रात बुडाले. आतापर्यंत सहा जणांचे मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध अद्याप सुरू आहे.
नुकत्याच झालेल्या पावसामुळे गोदावरी व वालदेवी नदीत पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे. शहरातून मार्गस्थ होणाऱ्या गोदावरीत अनेक ठिकाणी गणेश विसर्जन केले जाते. गोदावरीतील रामकुंड व सभोवताच्या कुंडात पाण्याचा जोर अधिक असतो. धोकादायक ठिकाणी कुणी जाऊ नये म्हणून अग्निशमन दलाने दोरखंड बांधले होते. गणेश विसर्जनासाठी आलेली माय-लेक पाय घसरून प्रवाहात वाहून गेली. जीवरक्षकांनी तातडीने त्यांना वाचवले. दिवसभरात गोदा पात्रात बुडणाऱ्या पाच जणांना वाचविण्यात आल्याचे अग्निशमन दलाचे विभागीय प्रमुख संजय कानडे यांनी सांगितले.
आणखी वाचा-जळगावात विसर्जन मिरवणुकांना जल्लोषात प्रारंभ, रांगेतील वादातून हाणामारी
चार युवक बुडाल्याची घटना सायंकाळी साडेसात वाजता म्हणजे अंधारात घडली. त्यांना प्रवाहाच्या वेगाचा अंदाज आला नाही. बुडाल्यानंतर सिमेंट कॉक्रिटच्या सांडव्यांचे फटके बसल्याचा अंदाज कानडे यांनी व्यक्त केला. रात्रीच्या वेळी शोधकार्यास मर्यादा आली होती. शुक्रवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात आली. गाडगे महाराज पूल परिसरात तीन युवकांचे मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
गणेश विसर्जन करताना म्हसोबानगर येथील संगमेश्वरच्या वालदेवी नदीपात्रात रोहित नागरगोजे (२२) आणि प्रसाद दराडे (१८) या दोघांचा बुडून मृत्यू झाला. तर याच नदीवर वडनेर येथे हेमंत सातपुते (३५) या व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. या तिघांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.