-
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या मुंबईतील काळाचौकीतील अभ्युदय नगर येथील शिवसेना शाखेचे उद्घाटन २४ जुलैला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
-
यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेना खासदार अरविंद सावंत, सुभाष देसाई, सचिन अहिर, किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक शिवसेना नेते उपस्थित होते.
-
यावेळी शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. याप्रसंगी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधून अवाहन केले.
-
“गेले बरेच दिवस अरविंद सावंत मला कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी बोलवत होते; पण मी दुर्लक्ष करत होतो. पण आता दुर्लक्ष करून चालणार नाही. आमदार-खासदार म्हणतात ते ऐकावे लागते असे हल्ली दिवस आहेत”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.
-
पुढे ते म्हणाले, “शिवसैनिक सामान्य असला तरी त्याची ताकद असामान्य आहे. शिवसेनेने ज्यांना शेंदूर लावून मोठे केले ते आज शिवसेना गिळायला निघाले आहेत. त्यांना भाजपाची साथ आहे.”
-
“मुंबई व महाराष्ट्रावर वर्चस्व गाजवण्यासाठी मराठी माणूस व शिवसेनेला संपवण्याचा हा डाव असून ठाकरे-शिवसेना व मराठी माणूस हे नाते त्यांना संपवायचे आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
न्यायालयीन लढाईसाठी गटप्रमुखापासून ते सर्व पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे मला हवी आहेत. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ती शपथपत्रे आणि नवीन सदस्य नोंदणीचे अर्ज हीच भेट द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
-
त्याचबरोबर पुढच्या महिन्यापासून महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
-
तसेच शिवसेनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी खासगी संस्था नेमून पैसा खर्च करून अर्ज भरून घेतले जात आहेत. आता सत्ता, पैसा आणि निष्ठा यांची लढाई आपल्याला लढायची आहे, असेही ठाकरे म्हणाले.
-
शिवसेना शाखेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी हजारो शिवसैनिकांनी उपस्थिती दर्शविली.
-
(सर्व फोटो : शिवसेना/ ट्विटर)

IND vs ENG: याला म्हणतात खेळभावना! वोक्सची दुखापत पाहताच करूण-सुंदरने…; दोघांनीही जिंकली सर्वांची मनं; VIDEO व्हायरल