-
देशभरात चर्चेत असलेल्या पुण्यातील पोर्श कार प्रकरणात रोज नव्या गोष्टी घडत आहेत.
-
जेव्हापासून हे प्रकरण घडले तेव्हापासून या प्रकरणावर विविध स्तरातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
-
या प्रकरणाची सुरवात झाली १९ मे रोजी. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्या पोर्श या लक्झरी कारने दुचाकी चालवत असलेल्या दोघांना जोरदार धडक दिली, त्यात दोघांचाही मृत्यू झाला.
-
त्यानंतर आरोपीला अटक झाली परंतु फक्त १५ तासात त्याला जामीन मंजूर करण्यात आला. दोन निरपराधांचा बळी घेण्यास कारणीभूत ठरलेल्या आरोपीला निव्वळ अल्पवयीन असल्याच्या कारणास्तव ३०० शब्दांचा निबंध लिहून जामीन कसा काय दिला जाऊ शकतो, अशी चर्चा समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर सुरू होती. त्यानंतर राजकीय नेते आणि पुढारी, सामाजिक कार्यकर्ते सगळे या प्रकरणावर बोलू लागले. यामध्ये आतापर्यंत कोण काय बोलले, कोणाच्या प्रतिक्रिया काय? याबाबत आपण जाणून घेऊ.
-
“राजकीय दबावाला बळी पडू नका, कारवाईमध्ये कोणतीही कमी ठेवू नका आणि कोणालाही पाठीशी घालू नका.” असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी फोनवरून पोलिस आयुक्तांना दिल्याची माहिती आहे.
-
विरोधी नेत्यांमध्ये संजय राऊत यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना असे म्हटले कि पुण्याच्या आयुक्तांना बडतर्फ करायला हवं, त्यांनी आरोपीला वाचवायचा प्रयत्न केला असल्याचा आरोप राऊतांनी केला. “भीषण अपघातात दोन निष्पापांचा बळी गेल्यानंतर फक्त दोन तासात आरोपीला जामीन मंजूर केला.”, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.
-
काँग्रेसनेते विजय वडेट्टीवार म्हणाले “पुणे अपघातातील अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह आली आहे, त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित होतो आहे.अल्पवयीन तरुणाला मद्य कसे काय उपलब्ध झाले? रजिस्टर नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यांवरून कशी काय चालू शकते? नियम डावलून पब आणि बार सुरु होते का?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
-
काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले “पुणेकरांच्या दबावापुढे पोलिसांना झुकावे लागले आहे, त्यांना विशाल अगरवाल यांना अटक करावी लागली. परंतु याने काही होणार नाही. येरवडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि तपास अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. मोठा आर्थिक व्यवहार झाल्यानंतर तपासात दिरंगाई करून आरोपीला मदत होईल अशा पद्धतीचा तपास सुरु आहे”, असा गंभीर आरोप धंगेकर यांनी केला आहे.
-
धंगेकरांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी उत्तर दिले ते म्हणाले, “धंगेकरांनी केलेले आरोप मी माध्यमांमध्ये वाचले. याविषयी मी पोलीस आयुक्तांशी चर्चाही केली. मुळात अशाप्रकारे आरोप केले असतील त्यांनी याचे पुरावे सादर करणेही आवश्यक आहे. अशाप्रकारे बिनबुडाचे आरोप करून काहीही साध्य होणार नाही, उचलली जीभ अन् लावली टाळ्याला असं करू नये.” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
-
ते पुढे म्हणाले,“पुण्यातील घटनेवर मी लक्ष ठेऊन आहे. माझं यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यांनी याप्रकरणात जातीने लक्ष घातलं आहे. खरं तर कारण नसताना असा प्रकाराच गैरसमज केला जातो की यात पालकमंत्र्यांचं याकडे लक्ष नाही. मुळात मी माझं काम करत असतो, मला माध्यमांच्या पुढे यायला आवडत नाही. २१ तारखेला ही घटना घडली त्यादिवशी मंत्रालयात होतो की नाही, हे कोणीही जाऊन बघू शकता”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
-
उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी कडक कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं.
-
पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय म्हणाले?
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले “पोर्श कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या रक्तचाचणीचा अहवाल महत्त्वाचा नाही. रक्त चाचणी अहवाल असो किंवा नसो हे प्रकरण असे आहे की अल्पवयीन मुलाला हे माहीत होतं की दारु पिणे आणि अरुंद रस्त्यावर भरधाव वेगाने कार चालवणं यामुळे लोकांचा मृत्यू होऊ शकतो. आम्ही या प्रकरणात कसून तपास करतो आहोत तसंच ठोस पुरावे गोळा करत आहोत. तांत्रिक पुराव्यांवर आम्ही लक्ष केंद्रीत करत आहोत.” -
वसंत मोरे यांनी या अपघात प्रकरणावर एक पोस्ट समाजमाध्यमावर शेअर केली आहे. वसंत मोरे पोस्टमध्ये म्हणाले “कोरेगाव पार्कमध्ये जो अपघात झाला तो दुर्दैवीच होता. पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते. नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का? ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या त्या कोथरूडमधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील नाईटलाईफ विषयी लक्ष द्यावे, सोबतच भुगाव, पिरंगुट या भागाकडे म्हणजेच मुळशीकडेही लक्ष द्यावे. तसेच ज्यांनी निवेदन दिली त्यांनी सुद्धा एनआयबीएम कोंढवा भागाकडे सुद्धा लक्ष द्यावे. नाहीतर असं म्हणावं लागेल कोरेगाव पार्कमध्ये जाणारी तरुण पिढी दारू पिण्यासाठी जाते आणि वरील भागांमध्ये नाईट लाईफसाठी जाणारी तरुण पिढी नारळाचे पाणी पिण्यासाठी जाते का?, कोणकोणत्या नेत्याचे कुठे कुठे नाईट लाईफमध्ये लागेबांधे आहेत, भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर जागेवर जाऊन लाईव्ह केले जातील. पोलीस यंत्रणेने फक्त कोरेगाव पार्क टार्गेट न करता संपूर्ण पुणे शहर सुद्धा टार्गेट करावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडी म्हणून जर कुठे हिंसक आंदोलन झाली तर त्याला संपूर्णपणे जबाबदार ही भ्रष्ट यंत्रणा असेल.” असा इशाराच मोरेंनी या माध्यमातून दिला.

मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल