-
गंभीर प्रकृतीच्या किंवा कृत्रिम श्वसनयंत्रणेवरील करोनाबाधित रुग्णांना रक्तद्रव (प्लाझ्मा थेरपी) उपचार विशेष फायदेशीर नाही. योग्य रुग्णावर योग्य वेळी याचा वापर केल्यास निश्चित फायदा आहे, अन्यथा त्याचे दुष्परिणाम होण्याचा धोका असल्याचं समोर आलं आहे. तज्ज्ञ डॉक्टरांनी प्लाझ्मा थेरपीविषयी ही मतं व्यक्त केली आहेत. (छायाचित्रं संग्रहित/इंडियन एक्स्प्रेस)
-
मृत्युदर कमी होणे किंवा रुग्णांची प्रकृती सुधारण्यास रक्तद्रव उपचाराने (प्लाझ्मा थेरपी) मदत होत नसल्याचे भारतीय संशोधन परिषदेने नुकतेच स्पष्ट केलं आहे. तरीही रक्तद्रवाची मागणी वाढली असून, समाजमाध्यमांवर याबाबत अनेक संदेश फिरत आहेत. विशेष म्हणजे मुंबईपेक्षा महानगर आणि बाहेरील जिल्ह्यांतून अधिक मागणी असल्याचं दिसून आलं आहे.
-
अनेक ठिकाणी गंभीर रुग्णांना किंवा कोणत्याही औषधोपचारांना प्रतिसाद न देणाऱ्या किंवा कृत्रिम श्वसनयंत्रणेवरील रुग्णांवर खासगी रुग्णालयांत रक्तद्रव उपचार (प्लाझ्मा थेरपी) पद्धतीचा जास्त वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेही मागणी वाढल्याचे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांचं म्हणणं आहे.
-
गंभीर प्रकृतीच्या रुग्णांच्या शरीरावर संसर्गामुळे आधीच परिणाम झालेला असतो. अशा रुग्णांसाठी रक्तद्रव उपचार (प्लाझ्मा थेरपी) उपयुक्त नाहीत. (छायाचित्र/रॉयटर्स)
-
प्रकृती गंभीर होण्याआधीच म्हणजे पाचव्या किंवा सातव्या दिवशी रक्तद्रव देणे आवश्यक आहे. योग्य रुग्णाला योग्य वेळी हे उपचार दिल्यास फायदा होत असल्याचा अनुभव संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ आणि राज्याच्या करोना विशेष कृती दलाचे डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितला.
-
मध्यम प्रकृतीच्या रुग्णांना मार्गदर्शक सूचीनुसार ‘स्टिरॉईड’सह औषधोपचार देऊनही बाहेरील ऑक्सिजनची आवश्यकता भासत असल्यास रक्तद्रव उपचार (प्लाझ्मा थेरपी) द्यावेत.
-
गरोदर किंवा स्तनपान करत असलेल्या महिलेला रक्तद्रव उपचार (प्लाझ्मा थेरपी) देऊ नयेत. अतिगंभीर रुग्णाला आणि रक्ताशी संबंधित अलर्जी असल्यास किंवा गेल्या ३० दिवसांत रुग्णाला ‘इम्युनोग्लोब्युलिन्स’ दिले असल्यास हे उपचार देऊ नये, असे निकष ठरविण्यात आल्याचे पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. (AP Photo/Arnulfo Franco, FILE)
-
फायदा कोणास? : रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण आणि बाहेरून द्यावा लागणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण २०० ते १५० च्या खाली असेल, अशाच रुग्णांना रक्तद्रव उपचार (प्लाझ्मा थेरपी) फायदेशीर असल्याचे आढळत आहे.
-
रुग्ण कृत्रिम श्वसनयंत्रणेवर जाऊ नये यासाठी रक्तद्रव हा पर्यायी उपचार नाही, असे विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. केदार तोरस्कर यांनी अधोरेखित केलं आहे.
-
मुंबई पालिकेनं नियमावली निर्देशित केली असली, तरी समोरील डॉक्टरनं दिलेल्या चिठ्ठीवर विश्वास ठेवून रक्तद्रव द्यावा लागतो. परंतु त्या डॉक्टरने योग्य रुग्णाची निवड केली आहे, याची पडताळणी करणे शक्य नाही. मागणी मोठय़ा प्रमाणात निर्माण झाल्याने पालिकेतील साठा लगेचच संपू शकतो. राज्याच्या विशेष कृती दलाला प्रत्येक मागणीवर देखरेख करणे शक्य नाही. याचा वापर योग्य रुग्णांवर करणे आवश्यक आहे, ही बाब खासगी रुग्णालये आणि नातेवाईकांनी लक्षात घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या डॉक्टरांनी केले. (छायाचित्रं संग्रहित/इंडियन एक्स्प्रेस)

पावसाच्या अतिवेगाने शास्त्रज्ञही अवाक्