सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून सुरू असणारी तयारी पाहता मराठवाड्यात काँग्रेस अद्याप मागच्या बाकावरच असल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांत भाजप, तीन शिवसेना आणि एमआयएम असे बलाबल असून काँग्रेस पक्षाचा खासदार मराठवाड्यातून निवडून आला नाही. या वेळी लोकसभा मतदारसंघाची बांधणी करण्यातही काँग्रेसचे नेते फारसे सक्रिय असल्याचे दिसून येत नाहीत. काँग्रेसचा अभ्यास मागच्या बाकावर असल्याचे दिसून येत आहे. जे घडेल ते ‘महाविकास आघाडी’च्या माध्यमातूनच होईल, असे गृहीत धरून भारत जोडो यात्रेनंतरही सारे काही आस्ते कदम असेच चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा >>> सरकारपुढे लाल वादळ थोपविण्याचे आव्हान

मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची ताकद तशी अधिक. अशोक चव्हाण आणि अमित देशमुख यांची ताकद अधिक असली तरी लोकसभा मतदारसंघात या नेत्यांना २०१९ मध्ये प्रभाव दाखविता आला नव्हता. शिवराज पाटील हे सक्रिय राजकारणात असेपर्यंत लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व होते. हा लोकसभा मतदारसंघ जेव्हापासून अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव झाला तेव्हापासून जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांऐवजी जिल्ह्याबाहेरील नेत्यास उमेदवारी देण्यात आली. विलासराव देशमुख यांच्या हाती नेतृत्व असल्याने जयवंत आवळे लातूरचे खासदार म्हणून निवडून आले होते. २०१४ पासून हा मतदार भाजपच्या वर्चस्वाचा. आधी सुनील गायकवाड हे अडीच लाख मतांनी निवडून आले होते, तर २०१९ मध्ये सुधाकर शृंगारे यांनी विजयाची परंपरा कायम राखली. आता या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कोण, हे अद्यापि गुलदस्त्यात आहे. अमित देशमुख यांचे वर्चस्व असणाऱ्या जिल्ह्यातील हे चित्र भारत जोडो यात्रेतील उत्साहानंतरही कायम आहे.

हेही वाचा >>> कर्नाटक, महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी BRS चं प्लॅनिंग काय? के कवितांनी सांगितलं; म्हणाल्या “अनेक नेते…”

नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण यांचा पराभव झाल्यानंतर भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर हे खासदार झाले. सध्या भाजपचे वर्चस्व असणाऱ्या नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचा उमेदवार कोण असू शकेल हे ठरलेले नाही किंवा उमेदवारीबाबत कोणतेच संकेत दिले जात नाहीत. मराठवाड्यातील जालना लोकसभा मतदारसंघही काँग्रेसच्या ताब्यात असला तरी या मतदारसंघात काँग्रेसला यश मिळालेले नाही. उमेदवारच नसल्याने औरंगाबादहून विलास औताडे यांना अचानक उमेदवारी देण्यात आली. जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांनी सहा लाख ९८ हजार १९ मते घेत दणदणीत विजय मिळविला. काँग्रेसच्या औताडे आणि दानवे यांच्यातील मतांमधील फरक तीन लाख ३२ हजार ८१५ एवढा होता. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जालना जिल्ह्यात काँग्रेसचा कोणी बांधणी करणारा नेता दिसून येत नाही.

हेही वाचा >>> भाजपाला बिहारमध्ये हवे आहेत नवे सहकारी; केंद्रीय सुरक्षा व्यवस्था देऊन नवे सहकारी जोडण्याचा प्रयत्न

ठाकरे गटाशी संघर्ष छत्रपती संभाजीनगर, धाराशिव हे नाव बदलण्यात आलेले पूर्वीचे औरंगाबाद उस्मानाबाद हे लोकसभा मतदारसंघ. या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद वापरलीच गेली नाही. या मतदारसंघात भाजप आणि ठाकरे गट अशी लढत होईल असे चित्र दिसून येत आहे. हिंगोली मतदारसंघातील काँग्रेसची ताकद राजीव सातव यांच्या निधनानंतर गटातटात विखुरलेली आहे. २०१४ मध्ये मोदी लाटेत राज्यातील काँग्रेसचे दोन खासदार मराठवाड्यातून निवडून आले होते. राजीव सातव आणि अशोक चव्हाण यांनी राज्याचे लोकसभेत नेतृत्व केले. पुढे सातव यांच्या निधनानंतर हिंगोलीतून उमेदवार कोण, या प्रश्नाला उत्तर मिळत नसल्याने या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून जयप्रकाश दांडेगावकर यांनी निवडणूक लढवावी, अशा पद्धतीने राजकीय कार्यक्रम आखले जात असल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्यात लोकसभा बांधणीत अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासमवेत दिसल्या होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ते पुरेसे नसल्याचे सांगण्यात येते. लोकसभेच्या बांधणीत मतदारयादीतील प्रत्येक पानावरील मतदारांना आपलेसे करून घेण्यासाठी भाजपने आतापासून प्रयत्न सुरू केले असताना काँग्रेस मात्र मागच्या बाकावर असल्याचे दिसून येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress not yet start preparation for upcoming lok sabha election in marathwada print politics news zws
First published on: 15-03-2023 at 19:32 IST