काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दबावापुढे झुकत राहुल गांधी यांनी शुक्रवारी रायबरेलीतून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या मतदारसंघात गांधी कुटुंबातील सदस्याने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची परंपरा कायम राहिली. गेली दोन दशके सोनिया गांधी रायबरेलीतून विजयी होत होत्या. त्यांनी लोकसभा निवडणुकीतून निवृत्ती घेतल्याने ही जागा रिक्त झाली होती. प्रियंका गांधी-वाड्रा यांनी नकार दिल्याने राहुल गांधी यांनी अखेरच्या क्षणी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१९ मध्ये उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी रायबरेलीतून सोनिया गांधी विजयी झाल्याने काँग्रेसला एक तरी जागा जिंकता आली. अमेठीतून राहुल गांधी यांना भाजपच्या नेत्या स्मृती इराणींनी पराभूत केले होते. यावेळीही राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र, राहुल गांधींनी जिंकण्यासाठी तुलनेत सोपा असलेला रायबरेलीचा मतदारसंघ निवडला. त्यामुळे अमेठीवासी गांधी कुटुंबाविना लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. शिवाय, २०१९ मध्ये अमेठीवर इराणींनी कब्जा केल्यामुळे ही जागा गांधी कुटुंबाची राहिली नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

हेही वाचा : अमेठीतले काँग्रेस उमेदवार केएल शर्मा कोण आहेत? राजीव गांधींशी काय आहे कनेक्शन?

उत्तर प्रदेशात रायबरेली व अमेठी हे दोन्ही मतदारसंघ गांधी कुटुंबाचे बालेकिल्ले मानले जात. पण, रायबरेलीने आणीबाणीनंतर १९७७ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पराभूत करून गांधी कुटुंबाला जबरदस्त दणका दिला होता. १९७१ मध्ये इंदिरा गांधी रायबरेलीतून विजयी झाल्या होत्या पण, अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांची निवडून रद्द केली व इंदिरा गांधींवर निवडणूक लढवण्यास सहा वर्षांची बंदी घातली. त्यानंतर इंदिरा गांधींनी जून १९७५ मध्ये आणीबाणी लागू केली. आणीबाणीच्या पश्चात १९७७ मध्ये रायबरेलीमधून जनता पक्षाचे राज नारायण यांनी इंदिरा गांधींचा पराभव केला होता. तरीही १९८० मध्ये इंदिरा गांधींनी रायबरेलीची निवड केली. त्यावेळी त्यांनी आंध्र प्रदेशमधील मेडकमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. रायबरेलीच्या मतदारांनी इंदिरा गांधींना माफ करत पुन्हा निवडून दिले. त्यानंतर १९९६ व १९९८ मध्ये रायबरेलीतून काँग्रेसचा पराभव झाला होता.

राजकारणात प्रवेश केल्यानंतर सोनिया गांधींनी १९९९मध्ये अमेठीतून पहिली लोकसभा निवडणूक लढवली होती. २००४ मध्ये राहुल गांधींनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर अमेठीतून निवडणूक लढवली व सोनिया गांधींनी रायबरेली मतदारसंघ निवडला. २००४ ते २०२४ अशी २० वर्षे सोनिया गांधी रायबरेलीचे संसदेत प्रतिनिधीत्व केले. यावेळी सोनिया गांधींनी अमेठीप्रमाणे रायबरेलीही आपल्या मुलाला आंदण देऊन टाकली आहे. २०१९ मध्ये अमेठी विरोधकांच्या हाती लागली पण रायबरेलीचा गड अजून शाबूत असल्याने राहुल गांधींनी रायबरेलीची निवड केल्याचे सांगितले जाते. काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेक्षणामध्ये अमेठीमध्ये राहुल गांधींना जिंकण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागली असती, त्या तुलनेत रायबरेलीची लढाई अवघड नसल्याचे मानले जाते. तरीही रायबरेलीतील लढाई एकतर्फी होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जाते. पूर्वाश्रमीचे काँग्रेसनेते दिनेश प्रताप सिंह यांनी २०१४ व २०१९ मध्ये सोनिया गांधींविरोधात भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. २०१९ मध्ये सोनिया गांधींचे मताधिक्य ३.५२ लाखांवरून १.६९ लाखांपर्यंत खाली आले होते.

हेही वाचा : लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेल्या ब्रिजभूषण सिंहांऐवजी मुलाला तिकीट; कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा परिणाम?

देशातील पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून म्हणजे १९५२ पासून रायबरेली गांधी कुटुंबाचा गड राहिला आहे. राहुल गांधी यांचे आजोबा फिरोज गांधी यांनी १९५२ व १९५७ अशा सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये रायबरेलीतून विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांच्या पत्नी इंदिरा गांधी यांनी १९७१, १९७७ व १९८० अशा सलग तीनवेळा रायबरेलीतून विजय मिळवला होता. रायबरेलीतून उमेदवारी अर्ज भरून आजोबा, आजी आणि आईची परंपरा राहुल गांधींनी चालू ठेवली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi files lok sabha nomination from raebareli sonia gandhi print politics news css