लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झंझावाती दौऱ्यांनी गाजलेला तिसऱ्या टप्प्यातील प्रचार रविवारी संपुष्टात आला. राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये मंगळवारी मतदान होणार असून, यात महायुतीकडील सात आणि महाविकास आघाडीकडील चार जागांचा समावेश आहे. या टप्प्यात पवार कुटुंबीयांमधील बारामतीची लढत सर्वाधिक लक्षणीय ठरणार आहे.

हेही वाचा >>> महाराष्ट्र देशातील असंतोषाचा जनक ; उद्धव ठाकरे यांचा भाजप, मोदींवर हल्लाबोल

पहिल्या दोन टप्प्यांत राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारतोफा रविवारी थंडावल्या. पहिल्या दोन टप्प्यांच्या तुलनेत या टप्प्यातील प्रचार अधिक आक्रमक आणि आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापूर, सोलापूर, माढा, कराड, पुणे, धाराशिव, लातूर अशा सात ठिकाणी जाहीर सभा झाल्या. यात मोदी यांनी प्रामुख्याने शरद पवार यांना लक्ष्य केल्याचे चित्र होते. पवारांवर पुण्यातील सभेत केलेली ‘भटकती आत्मा’ ही टिप्पणी गाजली. त्यावर ‘शेतकऱ्यांसाठी आत्मा अस्वस्थ असल्याचे’ प्रत्युत्तर पवारांनी दिले. मोदी एका वेळी दोन-तीन मतदारसंघांच्या प्रचारात सभा घेतात. पण सोलापूर आणि माळशिरस अशा दोन लागोपाठ सभा त्यांनी एकाच जिल्ह्यात प्रथमच घेतल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेला नकली सेना म्हणून हिणवले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्या टीकेचा भर हा प्रामुख्याने भाजप आणि मोदींवर होता. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही या टप्प्यात सभा घेतल्या. कोल्हापूरची लढत छत्रपती शाहू महाराज यांच्याविरोधात नसून ही लढाई राहुल गांधी विरुद्ध मोदी असल्याचा रंग देण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कोकणात सभा घेतली.

तिसऱ्या टप्प्यातील रायगड, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले हे सात मतदारसंघ महायुतीकडे आहेत. तर बारामती, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, उस्मानाबाद आणि सातारा हे मतदारसंघ महाविकास आघाडीकडे आहेत. यापैकी बारामती, सांगली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग , माढा, रायगड या मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत. सांगलीमध्ये काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीसमोर पेच निर्माण झाला आहे.

हेही वाचा >>> ठाकरे गटाला प्रचारात समाजवादी पक्षाचे बळ

गुजरात आणि गोव्यातील सर्व जागांसह १२ राज्यांतील ९४ मतदारसंघांतील प्रचार रविवारी संपुष्टात आला. सुरतमध्ये भाजप उमेदवाराचा बिनविरोध विजय झाल्यामुळे ९३ जागांवर मतदान होईल. कर्नाटकातील १४, उत्तर प्रदेशात १०, मध्य प्रदेशातील नऊ, छत्तीसगडमध्ये सात तर प. बंगाल व आसाममधील प्रत्येकी चार मतदारसंघांत मंगळवारी मतदान होईल. मतदानाची तयारी पूर्ण झाली असून संवेदनशील मतदारसंघांत अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. मतदान शांततेत पार पडण्याबरोबरच उष्णतेच्या लाटेत अधिकाधिक मतदारांना बाहेर काढण्याचे आव्हान आहे.

बारामतीच्या लढतीकडे लक्ष

पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीकडे यंदा संपूर्ण देशाचे लक्ष आहे. पवार यांच्या कन्या आणि विद्यामान खासदार सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आव्हान दिले आहे. मतदारसंघात मविआची अखेरची प्रचारसभा परंपरेप्रमाणे शरद पवार यांनी घेतली. त्याच वेळी, यंदा प्रथमच अजित पवार यांनीही अखेरची सभा त्याच सुमारास घेतली. आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना आपल्या मतदारांना अधिकाधिक मतदान केंद्रांवर आणण्याचे आव्हान पार पाडावे लागेल.

उद्या कुठे मतदान?

●रायगड ●बारामती ●उस्मानाबाद ●लातूर ●सोलापूर ●माढा ●सांगली ●सातारा ●रत्नागिरी-सिंधुदुर्ग ●कोल्हापूर ●हातकणंगले

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha elections 2024 maharashtra phase 3 elections campaigning ends for 11 seats zws