लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झालेल्या अजित पवारांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मतदारांशी जनसंपर्क सुरू केला असून मतदारसंघांचीही चाचपणी सुरू झाली आहे. यादरम्यान महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. महायुतीत मोठा भाऊ कोण? कोणाला सर्वाधिक जागा मिळणार? कोणाकडे महत्त्वाचे मतदारसंघ राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यादरम्यान, महायुतीत जागवाटप कसं होणार? यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“विधानसभा निवडणुकीच्या आधी आम्ही तिघे एकत्र बसू. महाविकास आघाडी त्यांचं ते बघतील. महायुतीतील घटकपक्ष एकत्र बसून निर्णय घेतील”, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार गटाकडून सर्वेक्षण
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्व जागांचे सर्वेक्षण केले जाईल. त्यात पक्षाची ताकद कुठे चांगली आहे याचा अंदाज येईल. काही जागा सध्या आमच्या ताब्यात नसल्या तरी तेथे निवडून येऊ शकतो. सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर राज्यातील राजकीय परिस्थितीचा अंदाज येईल. त्यानंतरच महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेत राष्ट्रवादीच्या वतीने जागांवर दावा केला जाईल. महायुतीत भाजप हा मोठा भाऊ आहे. भाजप नेत्यांशी चर्चा केली जाईल. महायुतीला पुन्हा सत्ता मिळाल्यास मुख्यमंत्री कोण असेल, यावर विधानसभा निवडणूक आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविणार आहोत. भविष्यातील निर्णय हा भाजपचे नेते घेतील, असे पवार यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं.
हेही वाचा >> २८८ मतदारसंघांचे सर्वेक्षण केल्यानंतरच जागांवर दावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान
लोकसभा निवडणुकीत माढा आणि नगर या दोन्ही जागा आम्ही मागितल्या होत्या. या जागा आम्हाला मिळाल्या असत्या तर दोन्ही मतदारसंघांत महायुतीचे खासदार निवडून आले असते, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजप आणि राष्ट्रवादीत मते परस्परांमध्ये हस्तांतरित होत नाहीत हा आरोप चुकीचा आहे. रायगड मतदारसंघात भाजपची मते आम्हाला मिळाल्याचे पवार यांनी स्पष्ट केले होते.
अजित पवार गटाला मोठा धक्का
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बालेकिल्ला पिंपरी-चिंचवड शहरात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष राहुल भोसले, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष यश साने, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर यांनी राजीनामे दिले आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना राजीनामा पाठविला आहे. अपरिहार्य कारणास्तव राजीनामा दिल्याचे पत्रात म्हटले आहे. या नेत्यांनी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे पवार गटासाठी हा सर्वांत मोठा धक्का मानला जातोय.
© IE Online Media Services (P) Ltd