Mumbai Breaking News Today : ‘राष्ट्रवादी’ कुणाची याबाबत आज ( ६ ऑक्टोबर ) केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडं सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. तर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर रूग्णालयातील मृत्यूप्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. यासह विविध घडामोडी जाणून घेणार आहोत…
Live News in Marathi : राजकीय, क्राइम आणि महाराष्ट्रातील अन्य घडामोडी वाचा…
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात पुढचा आमदार भाजपाचाच असेल असा निर्वाळा देत आगामी निवडणुकीसाठी आमदार म्हणून माजी नगराध्यक्ष निशीकांत पाटील यांनाच लोकांची पसंती असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी जाहीर सभेत बोलताना सांगितले.
सरकारच्या सीबीआय चौकशीची मागणी करण्यापेक्षा उध्दव ठाकरे यांनी करोना काळातील उपचार केंद्र, शव पेटी यातील भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशीची मागणी करावी. ठाकरेंच्या काळात मृतांच्या टाळू वरचे लोणी खाल्ले अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी इस्लामपुरात केली.
वस्त्रनगरीतील यंत्रमागधारक, उद्योजक, व्यापारी, कामगार, किरकोळ विक्रेते अशा सर्व घटकांना भाजपाशी सामावून घेण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केले. महाराष्ट्राच्या मँचेस्टर नगरीत बावनकुळे यांचे जल्लोषी स्वागत झाले.
एमडी या अंमली पदार्थाची तस्करी प्रकरणातील बहुचर्चित फरार ललित पाटीलचा शिंदे गाव औद्योगिक वसाहतीत असलेला अंमली पदार्थांचा कारखाना साकीनाका पोलिसांनी उदध्वस्त करुन कोट्यवधी रुपयांच्या साठ्यासह एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
कल्याण: येथील पूर्व भागातील विजयनगर आमराई भागात शुक्रवारी सकाळी एका तरुणाने प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन धारदार शस्त्राने तिची हत्या केली.
“मृत व्यक्तींची कागदपत्रे अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आली. खोटी कागदपत्रे सादर करून अजित पवार गटाकडून पक्षावर दावा करण्यात येत आहे. आम्ही आमची बाजू निवडणूक आयोगासमोर मांडली आहे. राष्ट्रवादी पक्षाचा चेहरा शरद पवारच आहेत,” असं वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितलं.
निवडणूक आयोगासमोरील आजची सुनावणी संपली. सोमवारी चार वाजता पुन्हा सुनावणी पार पडणार आहे.
अकोला : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर रेल्वे विभागांतर्गत राजनांदगाव ते कळमनादरम्यान तिसऱ्या मार्गाला आमगाव रेल्वेस्थानक जोडण्यात येणार आहे. त्यासाठी ११ ते १४ ऑक्टोबरदरम्यान ‘नॉन इंटरलॉकिंग’चे काम केले जाणार असल्याने ३५ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागणार आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर, दोन्ही गटाला बाजू मांडण्याची संधी मिळणार – निवडणूक आयोग
शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात – अजित पवार गटाचा निवडणूक आयोसमोर दावा
अजित पवार यांच्यासह ९ जणांवर कारवाईसाठी विधानसभा अध्यक्षांकडे पत्र – शरद पवार गटाचा दावा
जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती बेकायदेशीर आहे. जयंत पाटलांची नियुक्ती राष्ट्रीय कार्यकारणीच्या आधीच झालीय. असा आक्षेप अजित पवार गटाकडून घेण्यात आला आहे.
निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत कागदपत्रे सादर केल्यानंतर सुनावणीला सुरूवात झाली आहे. वकील अभिषेक मनू सिंघवी शरद पवार गटाची बाजू मांडत आहेत. यावेळी सुनावणीदम्यान शरद पवार गटानं पक्ष घटनेचा दाखल दिल्याची माहिती मिळत आहे.
शरद पवार आणि अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर कागदपत्रे सादर करण्यास सुरूवात झाली आहे. तसेच, लाखोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्रही दोन्ही गटाकडून सादर करण्यात येणार आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांच्या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी ऑगस्टमध्ये उरण खारकोपर रेल्वे मार्ग उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते केले जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.
सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या आणि इंडिया आघाडीला घाबरलेल्या भाजपने नैराश्यातून हे कृत्य केले आहे, अशी टीका काँग्रेसने केली.
देशात आणि राज्यात भाजप सत्तेत आल्यापासून अनेक मंत्री आणि पदाधिकारी भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती स्थळाला भेट देतात. सध्या मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा राज्यात गाजत आहे.
तांब्याची तार विकण्याच्या बहाण्याने बोलावून मारहाण करत तिघांकडील तीन भ्रमणध्वनीसह ३८ हजाराचा ऐवज लुटणाऱ्या टोळीच्या दोन म्होरक्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चोवीस तासात पकडले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रवादी कुणाची याबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणीला सुरूवात होणार आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणूक आयोगात दाखल झाले आहे. त्यांच्यासह आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार वंदना चव्हाण हेही शरद पवार यांच्यासह उपस्थित आहेत. वकील अभिषेक मनू सिंघवी शरद पवार गटाची बाजू मांडणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रयत्नशील असून या अनुषंगाने वेगवेगळ्या संकल्पना राबवण्यात येत आहेत. परीक्षांचा निकाल त्वरीत लावणे, आभासी शिक्षण यासह वेगवेगळ्या उपक्रमांना चालना मिळत आहे.
नागपूर: प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई ते नागपूर विशेष शुल्कावर दोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदेडसह राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. तसेच नांदेडमध्ये रुग्णांच्या मृत्यूनंतर डीनला संडास साफ करायला लावल्याच्या घटनेवरून शिंदे गटाच्या खासदारावर शाब्दिक हल्ला चढवला. ते शुक्रवारी (६ ऑक्टोबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिवसेनेत बंडखोरी होऊन राज्यातील महाविकासआघाडी सरकार कोसळलं. या घटनेचे पडसाद एवढ्यावरच थांबले नाही, तर पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाचं यावरून मोठा वाद झाला आणि निवडणूक आयोगाने पक्ष व पक्षचिन्ह शिंदे गटाला दिलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली आणि बंडखोर अजित पवार गट पक्ष व पक्षचिन्हावर दावा करत निवडणूक आयोगात गेला. आज त्या प्रकरणावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (६ ऑक्टोबर) दिल्लीत बोलत होते.
मुंबईतील गोरेगावमध्ये जय भवानी या इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली. यात आतापर्यंत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी शिंदेंनी आगीमागील कारण सांगत मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार करेल, असंही जाहीर केलं. ते शुक्रवारी (६ ऑक्टोबर) दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने राज्यातील शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. “यमाच्या रेड्यावर एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री बसून मौजा मारीत आहेत. लोकांनी जगावे किंवा मरावे, यापेक्षा आमचेच राजकारण चालावे असे त्या रेड्यावरील स्वारांना वाटते,” अशी टीका ठाकरे गटाने केली. शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनातून हा शाब्दिक हल्ला करण्यात आला.
मुंबईतील गोरेगावमध्ये एका इमारतीच्या पार्किंगला भीषण आग लागली. यात आतापर्यंत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच ४० जण जखमी झाल्याचा अंदाज आहे. अग्निशामक दलाने तातडीने मदतकार्य सुरू करत जवळपास ३० जणांना सुखरुप वाचवलं आहे. आगीचं स्वरुप गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
देशातील पहिले कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञान समूह विकास (क्लस्टर) केंद्र राज्यात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबतचे धोरण महिनाभरात जाहीर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक विकास महामंडळातीलप्रदूषित पाण्यावर नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रक्रिया करणारे प्रकल्प डोंबिवली, तळोजा आणि तारापूर येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी दिली.लंडन दौऱ्यावरून परतल्यानंतर सामंत यांनी सांगितले की, दौऱ्यात राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी विविध कंपन्या आणि शिष्टमंडळांसमवेत १३ बैठका झाल्या.