Mumbai News Updates : अलीकडच्या काही दिवसांपासून विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आमदारांसह भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. त्यात दोन दिवसांपूर्वी एक वृत्तपत्राने अजित पवारांनी गृहमंत्री अमित शाहांची ८ एप्रिलला भेट घेतली असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे राज्यात विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यासह देश-विदेश, मनोरंजन, क्रीडा, क्राइम, राजकीय घडामोडी जाणून घेणार आहोत.
Mumbai Pune News Update : देश-विदेशातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर…
बडनेरा मतदार संघातील भाजपच्या माजी नगरसेवकांनी मंजूर केलेली कामे सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या मतदार संघात भाजपच्या नगरसेवकांची संख्या जास्त असल्याने भाजपला याचे श्रेय मिळेल, या भीतीपोटी आमदार रवी राणा यांनी त्या ठिकाणी फलके लावण्याचा मुर्खपणा सुरू केला आहे. याचा विरोध करणे आवश्यक आहे.
एलएल. बी. आणि एलएल. एम. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दोन विषयांच्या फेरतपासणीसाठी (रिड्रेसल) २५ एप्रिलपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपासून विधी अभ्यासक्रमाच्या (एलएल. बी. द्वितीय सत्र व एलएल. एम.) निकालात त्रुटी असून, पुन्हा तपासणी करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी निवेदनाद्वारे केली होती.
“अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आहेत. त्यामुळे ४० नाहीतर सर्वच आमदार त्यांच्याबरोबर आहेत. पण, त्यांनी सुस्पष्ट करत सांगितलं की, बाहेर जाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. अजित पवार 'वज्रमूठ' सभेतही होते. नंतर ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर रुग्णालयात गेले होते. सोमवारी त्यांनी भूमिका मांडली आहे. म्हणून अजित पवारांवर शंका घेणं चुकीचं ठरेल,” असं मत विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं आहे.
पारधी-फासेपारधी समाजाच्या इयत्ता पहिली व दुसरीच्या मुलांना प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून देण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात येईल. मुलांना प्राथमिक शिक्षण सहज व सोप्या भाषेत आत्मसात होण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे व चित्रफीतींचाही अध्यापनात प्रभावी वापर करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी आज केले.
बुटीबोरी येथे वर्धा पोलिसांनी क्रिकेट सट्टा अर्थात बेटिंग खेळणाऱ्या सहा आरोपींना अटक केली होती.त्यापूर्वी वर्धा व हिंगणघाट येथे हा प्रकार उघडकीस आला होता.वर्धा व लगतच्या जिल्ह्यात खेळल्या जाणाऱ्या बेटिंगची पाळेमुळे खणून काढण्याची तयारीच पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी केली.
पुणे: गळ्याभोवती मांजाचा फास आणि जणू बेड्या घालाव्यात असे जखडलेले पाय अशा मरणासन्न अवस्थेतून ‘राखी सातभाई’ पक्ष्याने मंगळवारी सकाळी आकाशात भरारी घेतली. शाळेतही न जाणाऱ्या चार ते पाच वर्षे वयाच्या चार चिमुकल्यांनी सुंदराबाई मराठे विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय सोमवंशी यांच्या मदतीने या पक्ष्याला जीवनदान दिले.
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चित्रित करण्यात आलेल्या रॅप गाण्यावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आक्षेप नोंदवला होता. मात्र,आता या गाण्याला आणि रॅप गाणे केलेल्या तरुणाला राष्ट्रवादी काँग्रेसनेच पाठिंबा दिला आहे.
एका महिलेशी अश्लील ‘चँटिंग’ करीत शारीरिक सुखाची मागणी करीत विनयभंग करणारे नागपूर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांना अटक करण्यात आली आहे. छत्तीसगड येथील राजनांदगाव कोतवाली ठाण्याच्या पथकाने त्यांना अटक केली असून या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
इर्विन चौकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव महापालिकेने २००६ मध्येच मंजूर केला असताना खासदार नवनीत राणांची आता या मुद्यावरही खोटे श्रेय घेण्याची केविलवाणी धडपड सुरू असल्याची टीका काँग्रेस प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर यांनी केली आहे.
पुणे: मजा म्हणून परवानाधारक पिस्तुलातून खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गोळीबार करणे तरुणांच्या अंगलट आले. सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करून दहशत माजविल्या प्रकरणी तिघांच्या विरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘प्रेयसी वारंवार पार्टी मागते तसेच नवीन कपड्याची तिची हौस पूर्ण करता यावी, यासाठी प्रियकराने चोरी करण्याचा मार्ग पत्करला. त्या युवकाने मित्राच्या मदतीने बेलतरोडीतील धनाढ्य असलेल्या एका वृद्धेला घरात जाऊन लुटमार केली होती. या दोन्ही चोरट्यांना पोलीस उपायुक्तांच्या सायबर झोन पथकाच्या मदतीने अटक करण्यात आली.
प्रवाशांना भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांना समज देणाऱ्या पोलिसालाच मारहाण करण्यात आल्याची घटना सांताक्रुझ पूर्व येथे सोमवारी घडली. याप्रकरणी पोलिसाच्या तक्रारीवरून वकोला पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासावर आणि खटल्यावर देखरेख कायम ठेवायची आवश्यकता नाही, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. तसेच देखरेख कायम ठेवण्याची दाभोलकर कुटुंबीयांची मागणी अमान्य केली.
मुंबई: म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४६५४ घरांच्या (१४ भूखंडांसह) सोडतीतील विरार – बोळींजमधील २०४८ घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. अनामत रक्कमेसह अर्ज जमा करण्यासाठी आता अवघे चार दिवस शिल्लक असून या घरांसाठी सोमवारी रात्री ९ वाजेपर्यंत अनामत रक्कमेसह केवळ ३२६ अर्ज जमा झाले आहेत.
“तुमच्या मनात असलेल्या चर्चा आमच्या कोणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्व नाही. काहीतरी बातम्या करण्याचं कोणतरी करत आहे, यापेक्षा काही अर्थ नाही. राष्ट्रवादीतील सर्व सहकारी एका विचाराने पक्षाला शक्तीशाली कसं करायचं या भूमिकेत आहेत. त्यामुळे दुसरा कोणताही विचार कोणाच्याही मनात नाही. आमदारांची बैठक कोणीही बोलावली नाही,”असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं आहे.
“अजित पवारांनी वज्रमूठ सभेत भाषण केलं नाही, याचा खुलासा त्यांनी स्वत:च केला आहे. विधानसभा अधिवेशनात अजित पवारांनी आपली भूमिका जोरदारपणे मांडली आहे. तसेच, राष्ट्रवादीत सर्वकाही अलबेल आहे,” अशी भूमिका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.
“अजित पवारांनी काय निर्णय घ्यावा, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण, अजित पवार सरकारबरोबर येत असतील, तर चांगली गोष्ट आहे. विरोधी पक्षात बसून टीका-टीप्पणी करण्यापेक्षा तेच सरकारमध्ये येत असतील, अजून गोड बातमी काय पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर काही अवलंबून नाही,” असं मतं कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्लीत बोलताना व्यक्त केलं आहे.
डोंबिवली: मुंबई, ठाणे परिसरात घरफोड्या, लुटमार करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना रामनगर पोलिसांनी डोंबिवलीतील चार लाखांच्या मोबाईल चोरी प्रकरणात मंगळवारी अटक केली. हे सराईत चोरटे डोंबिवली पूर्व भागातील देसलेपाडा भागात वास्तव्याला होते.
खारघर येथे झालेला १३ श्री सेवकांचा मृत्यू सरकारी बेफिकिरी व राजकीय लोभामुळे झाला. त्याचे प्रायश्चित्त कोणी घ्यायचे? आप्पासाहेबांना दिलेल्या ‘महाराष्ट्रभूषण’मुळे जो आनंद झाला, त्यास गालबोट लावण्याचे काम मुख्यमंत्री व त्यांच्या अति फाजील टोळीने केले. १३ श्री सेवकांचा बळी घेणे हे सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात बसते. मुख्यमंत्री अयोध्येत जाऊन आले. तेथून संयम शिकले नाहीत व आप्पासाहेबांकडून मानवता शिकले नाहीत, अशी टीका शिवसेनेने ( ठाकरे गट ) ‘सामना’ अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
आज भारतामध्ये Apple चे पहिले रिटेल स्टोअर उभे राहणार आहे. अॅपलचे भारतातील पहिले स्टोअर जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉल मुंबईत सुरू होणार आहे. Apple चे CEO टिम कुक यांच्या हस्ते Apple च्या देशातील पहिल्या रिटेल स्टोअरचे उद्घाटन आज सकाळी ११ वाजता होणार आहे. वाचा सविस्तर बातमी
विधान परिषद निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळे सत्यजीत तांबे यांच्यावर काँग्रेस पक्षातून ६ वर्षे निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर अपक्ष निवडणूक लढवत सत्यजीत तांबे यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील यांचा पराभव केला होता. पण, काँग्रेस निलंबनाची कारवाई केल्याने अद्यापही नाराज आहात का? यावर आमदार सत्यजीत तांबेंनी भाष्य केलं आहे.
“आम्ही सर्वजण मिळून शरद पवार यांच्याबरोबर आहोत. आणि मिळून राहू. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात वडिल, मुलाचं नात आहे. सुप्रिया सुळे, जयंत पाटील जितेंद्र आव्हाड हा आमचा परिवार आहे. त्यामुळे अजित पवार जातील असं वाटत नाही. भाजपा अजित पवारांना गळाला लावत आहे, असं वाटत नाही. लोकांच्या मागण्या, जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न यासाठी अजित पवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत असतात,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा यांनी दिली आहे.
आपल्या सैनिकांचे रक्षण करता येत नसेल, तर अशा सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केंद्र सरकारवर तोफ डागली. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत केलेल्या दाव्याच्या संदर्भात पवारांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.