मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करताना जलवाहतुकीचा चांगला पर्याय मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राला आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांना विस्तीर्ण असा समुद्र व खाडीकिनारा लाभला आहे. त्याचा उपयोग जलवाहतुकीसाठी करण्याच्या दृष्टीने मार्चपर्यंत कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिडको, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून मुंबई ते नवी मुंबई जलवाहतुकीसाठी ११ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेली नेरुळ येथील जेट्टी धूळ खात पडली आहे. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राची लोकसंख्या झपाटयाने वाढत आहे. याचबरोबर वाहनांची संख्या वाढली आहे. मुंबईत अनेक उड्डाणपूल, खाडीमार्ग बांधल्यानंतरही वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी जलवाहतूकीला प्राधान्य देण्याचे आदेश परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले. मुंबईत वॉटर टॅक्सी, रोप वे, पॉड टॅक्सी सुरू करण्याबाबत एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

गर्दीच्या ठिकाणी ‘रोप वे’चा पर्याय

● मुंबईपासून वसईपर्यंत लोकसहभागातून जलवाहतूक सुरु करता येऊ शकते. जलवाहतुकीचा हा मार्ग नवी मुंबईपर्यंत पुढे नेता येईल. कल्याण डोंबिवली, मिरा भाईंदर, नवी मुंबई भागात ठाणे खाडीचे विस्तीर्ण पात्र आहे. या क्षेत्रात जलवाहतूक सुरू करण्यासाठी कृती आराखडा मार्च पर्यंत तयार करण्याचे निर्देश सरनाईक यांनी दिले.

● गर्दीच्या ठिकाणी ‘रोप वे’चा पर्याय तयार करता येऊ शकेल असे मत परिवहन अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. लंडनच्या हिथ्रो विमानतळावरील पॉड टॅक्सी प्रयोग वांद्रे येथील बीकेसी संकुलात केला जाणार आहे. ऑक्टोबरपासून या सेवेचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. वांद्रे ते कुर्ला या मागार्वर ही सेवा सुरू केली जाणार आहे. दोन महिन्यात रॅपिडो बाईक सेवेसारखी बाईक सेवा सुरू करण्याचे आश्वासन सरनाईक यांनी दिले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action plan for water transport in mumbai news amy