भाजप विधानसभा निवडणुकीत २४० जागा लढणार,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

उमाकांत देशपांडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आगामी विधानसभा निवडणुकीत २४० जागा लढविण्याचा भाजपचा विचार करीत असून त्याच्या तयारीला लागावे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पक्षाच्या प्रवक्त्यांपुढे केले. भाजप २४० जागा लढविण्याची तयारी करीत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वाट्याला केवळ ४८ जागा येणार आहेत.

हेही वाचा >>>शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात समिती गठीत, आंदोलन मागे घ्यावे; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

भाजप समाजमाध्यमे प्रमुख व प्रवक्त्यांची कार्यशाळा मुंबई प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. तिचा समारोप करताना बावनकुळे यांनी सर्वांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. भाजपने २८८ पैकी २४० जागा लढविण्याचे नियोजन केले असून शिंदे गटाला केवळ ४८ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. शिंदे गटाकडे ५० हून अधिक जागांसाठी चांगले उमेदवार नाहीत, असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले. भाजप शिंदे गटाव्यतिरिक्त असलेले मित्रपक्ष आणि अपक्षांनाही काही जागा सोडणार आहे. शिंदे गटाचे सध्या ४० आमदार असून काही अपक्ष आमदारही त्यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे विद्यमान आमदारांच्या जागा वगळता भाजप शिंदे गटासाठी जादा जागा सोडणार नाही, असे बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरुन दिसून येत आहे.

हेही वाचा >>>Mumbai Crime : मुलीने आईची हत्या करून तुकडे घरात ठेवल्याचं प्रकरण, उत्तर प्रदेशातून एक तरूण ताब्यात

निवडणूक तयारीबाबतचे विश्लेषण करताना बावनकुळे म्हणाले, भाजपचे विधानसभेत सध्या १०५ सदस्य असून आठ अपक्ष आपल्याबरोबर असल्याने आपले ११३ आमदार आहेत. भाजप ६० मतदारसंघात काही वेळ हरला आहे किंवा जिंकला आहे. या जागांची संख्या १७३ होते. त्यापैकी शिंदे गटाकडे असलेले १२ मतदारसंघ सोडले तरी अन्य मतदारसंघात भाजपला जिंकण्यासाठी आणखी ८ टक्के मते हवी आहेत. भाजपकडे ४३ टक्के मते असून आपल्याला ५१ टक्के मते मिळवायची आहेत. रात्रंदिवस काम करून निवडणुकीच्या तयारीला लागावे.

ऊठसूठ बोलू नका

भाजपचे नेते व प्रवक्त्यांनी ऊठसूठ कोणत्याही विषयांवर बोलू नका. प्रवक्त्यांना बोलण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असले तरी त्यांनी वाद निर्माण होईल, अशी वक्तव्ये करू नये. प्रत्येकाने आपल्या कार्यक्षेत्राबाबतच बोलावे. प्र‌वक्ते, आमदार, खासदार यांनी आपल्या अधिकार क्षेत्राबाबतच बोलावे, अशा सूचना बावनकुळे यांनी दिल्या. आधी कोणीही कशावरही बोलत होता, पण आता त्याला लगाम लावलेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>उत्तर प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रही उत्पादन शुल्कातून ६० हजार कोटी उत्पन्न मिळवू शकतो; सत्यजीत तांबेंचा दावा

नकारात्मक लिखाण गाडावे
निवडणुकीची तयारी करताना केंद्र व राज्य सरकारने मांडलेला अर्थसंकल्प, योजना जनतेपर्यंत पोचविण्यासाठी अथक परिश्रम करावेत. पंतप्रधान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार व खासदारांबद्दल प्रसिध्दीमाध्यमांमध्ये काय छापून येत आहे, याचा अभ्यास करावा. जे सकारात्मक लिखाण आहे, ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवावे आणि नकारात्मक लिखाण आहे, ते जमिनीत गाडावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना फसविण्याचा किंवा ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. त्यातून बोध घेऊन आपण फसवणूक होणार नाही, याची काळजी व्हावी. कोणाही बरोबर जेवायला बसताना किंवा पेय पितानाही कोणी षडयंत्र करुन छायाचित्रण करीत नाही ना, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना बावनकुळे यांनी प्रवक्त्यांना दिल्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrasekhar bawankule asserted that bjp will contest 240 seats in the assembly elections mumbai amy