नागपूर : अलीकडेच मराठी भाषेला अभिजात भाषेत दर्जा केंद्र सरकारने दिला आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत पार पडले. यामुळे मराठी भाषकांत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असताना राष्ट्रीय स्वयंसेवसक संघाचे पदाधिकारी भैयाजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाला मुंबईबद्दल नेहमीच आकस असून सातत्याने मुंबई व मराठीचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न या विचारसरणीचे लोक करत असतात. संघाचे भैय्याजी जोशी यांचे मुंबई व मराठी भाषेबद्दलचे वक्तव्य हे जाणीवपूर्वक केलेले असून मराठी भाषेचा व मुंबईचा हा अपमान आहे. मराठी भाषा व मुंबईचा अपमान करणाऱ्या भैय्याजी जोशी यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात माध्यमांना प्रतिक्रीया देताना अतुल लोंढे पुढे असे म्हटले आहे की, मुंबईसह महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, परंतु आरएसएसच्या लोकांना मुंबई व मुंबईतील मराठी भाषा, मराठी जनता यांच्याबद्दल कायमच आकस राहिला आहे. मुंबईतील महत्वाची कार्यालये व संस्था, गुंतवणूक मुंबईबाहेर घेऊन जाण्याचा उद्योग भाजपाच्या राज्यात सतत होत आहे. आता मुंबईतील मराठी भाषेलाही कमी लेखून गुजरातीसह इतर भाषा लादण्याचे षडयंत्र सुरु आहे. त्याच मानसिकतेतून भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य आहे. मुंबई व महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे व त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, जर कोणी मराठी भाषेचा अपमान करत असेल तर तो कदापी खपवून घेतला जाणार नाही.

घाटकोपर हा मुंबईचाच भाग आहे असे असताना घाटकोपरची भाषा गुजराती आहे असे म्हणण्याचे धाडस जोशी करुच कसे शकतात. घोटकोपरमध्ये लाखो लोक मराठी आहेत व ते मराठीच बोलतात. भैय्याजी जोशी यांच्या विधानाचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करत असून सरकारने यावर भूमिका जाहीर करावी. भैय्याजी जोशी यांचे विधान अजित पवार एकनाथ शिंदे यांना मान्य आहे का, त्यांनीही भूमिका जाहीर करावी असेही अतुल लोंढे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atul londhe criticism of bhaiyaji joshi statement rbt 74 amy