दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीमधील कोणता पक्ष उमेदवार देणार यावर अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही. भाजपा की शिवसेना शिंदे गट, यापैकी कोण ही जागा लढविणार याचा निर्णय जाहीर झालेला नाही. तत्पूर्वी शिवसेना शिंदे गटाकडून याठिकाणी उद्धव ठाकरे यांचे सचिव आणि शिवसेना उबाठा गटाचे उपनेते मिलिंद नार्वेकर यांना निवडणुकीत उतरविण्याची तयारी सुरू असल्याची बातमी समोर येत आहे. कालपासून राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली. त्यानंतर आज दुपारी शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली असताना त्यांना याबाबत थेट प्रश्न विचारण्यात आला. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे अतिशय निकटवर्तीय समजले जातात, त्यामुळे जर ते शिंदे गटात गेले तर उबाठा गटाला हा सर्वात मोठा धक्का मानला जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाकरे गटाच्या गाण्यातील ‘या’ शब्दांवर आयोगाचा आक्षेप; उद्धव ठाकरे म्हणतात, “…तोपर्यंत आमच्यावर कारवाई करता येणार नाही!”

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

शिवसेना उबाठा गटाला निवडणूक आयोगाकडून नोटीस देण्यात आली आहे. शिवसेनेने काही दिवसांपूर्वी आपले प्रचारगीत प्रसिद्ध केले होते. या गीतामध्ये ‘जय भवानी, जय शिवाजी’, असा नारा एकेठिकाणी देण्यात आला आहे. यातील ‘जय भवानी’ शब्दावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला असून हा शब्दा काढून टाकण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाची ही नोटीस फेटाळून लावताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही यापूर्वी देव-धर्माचा उल्लेख करून मतांचा जोगवा मागितला आहे. त्यामुळे आयोगाने आधी त्यांच्यावर कारवाई करावी, मगच आम्हाला नोटीस पाठवावी.

दरम्यान हा विषय मांडून उद्धव ठाकरे पत्रकार परिषद संपवत असताना पत्रकारांनी विविध राजकीय विषयांबाबत त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र उद्धव ठाकरे यांनी इतर प्रश्नांना फाटा देत हाच आजचा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे सांगितले. तसेच पत्रकार परिषदेतून ते उठून जात असताना पत्रकारांनी मिलिंद नार्वेकर यांना दक्षिण मुंबईचा प्रस्ताव मिळाला आहे का? याबाबत प्रश्न विचारला. मात्र यावर दुर्लक्ष करत निवडणूक आयोगाची नोटीस महत्त्वाचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे जाता जाता म्हणाले.

“मोदींची जागा घेण्याचे फडणवीसांचे स्वप्न, म्हणूनच त्यांचा…”, संजय राऊतांची खोचक टीका

हिंदुस्तान टाइम्सला शिंदे गटाच्या एका आमदाराने प्रतिक्रिया देताना म्हटले की, सेनेच्या मतदारांमध्ये मिलिंद नार्वेकर प्रसिद्ध आहेत. जर ते शिंदे गटात आले तर उबाठा गटाला तो सर्वात मोठा धक्का असेल. शिवसेना संघटनेची खोलवर माहिती नार्वेकरांना आहे. तसेच त्यांच्याकडील आतल्या माहितीच्या आधारावर शिंदे गटाला उबाठा गटावर मात करता येईल.

या आमदाराने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना पुढे सांगितले की, भाजपाने दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईसाठी विविध उमेदवारांची चाचपणी केली आहे. त्यात नार्वेकर यांच्याही नावाची चर्चा झाली. मिलिंद नार्वेकर यांच्या लोकप्रियतेमुळे दक्षिण मुंबईतील परळ ते भायखळा मधील शिवसेनेच्या मतदारांचा मोठा पाठिंबा मिळू शकतो, असा अंदाज आहे. तसेच उत्तर पश्चिम मतदारसंघातही शिवसेनेला माननारा एक मोठा वर्ग आहे. उबाठा गटाने गेल्या वर्षी अंधेरी पूर्व विधानसभेतील पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. हा मतदारसंघ उत्तर पश्चिम लोकसभेतच येतो.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena ubt leader uddhav thackeray reaction on milind narvekar question about south mumbai lok sabha election 2024 kvg