-
हिंदी चित्रपटसृष्टीत सत्तरच्या दशकात उत्तम नायिकांच्या गर्दीत बोलके डोळे आणि अवखळ अभिनयशैलीच्या जोरावर आपली दखल घ्यायला लावणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे एप्रिल महिन्यात निधन झाले.
-
लोकप्रिय गुजराती अभिनेता अमित मिस्त्रीचे निधन झाले. २३ एप्रिल रोजी अमितने अखेरचा श्वास घेतला. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाल्याचे समोर आले. अमितची ‘बंदिश बँडिट्स’ ही वेब सीरिज काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली होती. या सीरिजमधील त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती.
-
‘स्पेशल ऑप्स’ या ‘डिस्ने हॉटस्टार’वरील लोकप्रिय वेबमालिकेसह अनेक चांगल्या चित्रपट आणि मालिकांचा भाग असलेले अभिनेते मेजर विक्रमजीत कंवरपाल यांचे करोनामुळे निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांत आपल्या छोटेखानी चरित्र भूमिकांमधून त्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.
-
प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक राज कौशल यांचे ३० जून रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते. प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
-
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे ७ जुलै रोजी निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. दिलीप कुमार यांनी ‘ज्वार भाटा’ या सिनेमातून १९४४ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. पाच दशकांहून अधिक बॉलिवूड करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी ‘मुगल-ए-आजम’, ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘राम और श्याम’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
-
नव्वदच्या दशकात आपल्या सुमधूर संगीताने एका पिढीला प्रभावित करणाऱ्या संगीतकार नदीम-श्रवण जोडगोळीतील संगीतकार श्रवण राठोड यांचे करोनामुळे निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.
-
अभिनेते राजीव कपूर यांचे ९ फेब्रवारी रोजी निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. राजीव कपूर यांनी राज कपूर दिग्दर्शिक ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी ‘प्रेम ग्रंथ’ या चित्रपटाचं दिग्दर्शनदेखील केले होते.
-
भारतीय आणि पाश्चात्य संगीताचा मिलाफ घडवत अभिजात संगीत निर्मितीची कास धरणारे संगीतकार वनराज भाटिया यांचे दक्षिण मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. गेली काही वर्षे ते वृद्धापकाळामुळे उद्भवणाऱ्या आजारांशी झगडत होते. राष्ट्रीय पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्माश्री पुरस्कारांसारख्या सर्वोच्च पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
-
दूरदर्शनवरील गाजलेली पौराणिक मालिका ‘रामायण’ मधील ‘आर्य सुमंत’ची भूमिका साकारणारे आणि लोकप्रियता मिळवणारे अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. चंद्रशेखर यांनी सुरवातीला त्यांनी एक ज्यूनिअर आर्टिस्ट म्हणून करिअरला सुरवात केली. त्यानंतर ५० ते ९० च्या दशकात ‘गेटवे ऑफ इंडिया’, ‘बरसात की रात’, ‘कटी पतंग’, ‘द बर्निंग ट्रेन’, ‘नमक हलाल’, ‘डिस्को डान्सर’, ‘शराबी’, ‘त्रिदेव’ सारख्या चित्रपटात काम केले आहे.
-
अभिनेत्री फारुख जफर यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अभिनयाचे कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण त्यांच्याजवळ नव्हते की अनुभवही नव्हता; मात्र आवाजावर आणि उर्दू भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते. कलाविश्वात पदार्पण करण्यापूर्वी फारुख या रेडिओ उद्घोषक होत्या.
-
दूरचित्रवाणीवर दीर्घकाळ चाललेल्या ‘बालिका वधू’ या यशस्वी मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. १९८० साली मुंबईत जन्मलेल्या सिद्धार्थने मॉडेलिंग आणि जाहिरात क्षेत्रातून आपल्या कारकीर्दीला प्रारंभ केला होता. २००८ मध्ये ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या मालिके पासून छोट्या पडद्यावर त्याचे पदार्पण झाले. त्यानंतर ‘जाने पेहचाने से ये अजनबी’, ‘आहट’ आणि ‘सीआयडी’ मालिकेचे काही भाग तसेच ‘लव्ह यू जिंदगी’सारख्या मालिकांमधून त्याने काम केले.
-
करारी व्यक्तिमत्त्व आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर एखाद्या लहान भूमिकेतही लक्षात राहाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सुरेखा सिक्री यांनी रंगभूमी, दूरचित्रवाणी आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांत आदराचे स्थान निर्माण केले होते.
-
अनेक चित्रपटांबरोबरच टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अनुपम श्याम यांचे निधन झाले. अनुपम यांनी ‘दस्तक’, ‘हजार चौरासी की मां’, ‘दुश्मन’, ‘सत्या’, ‘दिल से’, ‘जख्म’, ‘संघर्ष’, ‘लगान’, ‘नायक’, ‘शक्ति’, ‘पाप’, ‘जिज्ञासा’, ‘राज, वेलडन’, ‘अब्बा’, ‘वॉन्टेड’, ‘कजरारे और मुन्ना माइकल’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘प्रतिज्ञा’ या मालिकेमुळे अनुपम घराघरात पोहचले.
-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील ‘नट्टू काका’ हे पात्र साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या वर्षभरापासून ते कर्करोगाची झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली असून त्यांनी रविवारी (३ ऑक्टोबर) अखेरचा श्वास घेतला.
-
कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख होती. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक