-
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वरळी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. वरळीचा बालेकिल्ला नेमका कुणाचा? यावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये सुरू असलेले दावे-प्रतिदावे यासाठी कारणीभूत ठरले आहेत.
-
याची सुरुवात झाली ती भाजपानं वरळीतल्या जांबोरी मैदानात दहीहंडीचं आयोजन केल्यापासून. भाजपाकडून वरळीमध्ये शक्तीप्रदर्शन केलं जात असल्याचं बोललं जाऊ लागलं.
-
वरळी हा गेल्या काही वर्षात शिवसेनेचा गड झाला होता. २०१९च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी शिवसेनेत दाखल झालेल्या सचिन अहिर यांनी हा मतदारसंघ आदित्य ठाकरेंसाठी सोडला आणि आदित्य ठाकरे तिथून विधानसभेवर निवडून गेले.
-
मात्र, आदित्य ठाकरे भाजपाच्या मतांवर निवडून गेल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
-
मुळातच गड कुणाचा आणि कुणी ठरवला? आणि गडावर ठरणं आणि ठरवणं हे शेलारमामांशिवाय कोण करू शकतं? त्यामुळे गड वगैरे आम्ही मानत नाही. स्वत: आदित्य ठाकरे हेदेखील भाजपाच्या मतांवर निवडून आले आहेत. युतीमध्ये ते जिंकून आले आहेत, असा दावा आशिष शेलार यांनी केला.
-
“जांभोरी मैदान तो झांकी है, अभी बहोत कुछ बाकी है. मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या कामाला आम्ही आधीच लागलो आहोत. टप्प्याटप्प्याने आम्ही काम करत आहोत. पुढे असे अजून बरेच टप्पे यायचे आहेत”, असंही ते म्हणाले.
-
याबाबत आशिष शेलार यांनी काही ट्वीट्स देखील केले आहेत. भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड.. आमचा गड म्हणून मिरवायचे…आता बघा कसे सगळे गडगडायला लागलेय..भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत, असा टोला त्यांनी ट्वीटमधून लगावला.
-
लवकरच मुंबईकरच वरळीतून कोसळणाऱ्या थरांचा थरार निवडणूकीत ‘करुन दाखवतील’. आमचं ठरलंय, असा सूचक इशारा देखील त्यांनी ट्वीटमधून दिला.
-
ज्या वरळीत सेनेच्या(?) खासदार, आमदार, माजी मंत्री, माजी महापौर आणि नगरसेवक असे नेत्यांचे थरावर थर आहेत, तिथे म्हणे पक्षाला द्यायच्या १०० रूपयांच्या शपथपत्राला ‘बळ’ अपुरं पडतंय, अशा खोचक शब्दांत आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.
-
एकीकडे आशिष शेलार सातत्याने वरळीबाबत टीका-टिप्पणी करत असताना दुसरीकडे शिवसेनेकडून सचिन अहिर यांनी शेलार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
-
आशिष शेलार यांनी त्यांचे किमान ५० टक्के पदाधिकारी तरी वरळीमध्ये करावे. गेल्या वेळी ते महानगरपालिकेत स्वतंत्रपणे निवडणूक लढले होते. वरळीत त्यांना खातंही उघडता आलं नाही, असं सचिन अहिर म्हणाले आहेत.
-
आशिष शेलार यांना एवढंच वाटत असेल की वरळीतली हंडी ते फोडणार, तर माझं त्यांना नम्रपणे सांगणं आहे की आपला मतदारसंघ बदली करा. वरळीतून लढा. वरळीकर जनता काय असते, ते लोक तुम्हाला दाखवतील, असं खुलं आव्हानच सचिन अहिर यांनी दिलं आहे.
-
आशिष शेलार म्हणत होते की वरळीतले आमदार आमच्या मतांनी निवडून आले आहेत. मग ते कुणाच्या मतांनी आमदार झाले? त्यांचे लोकसभेचे खासदार कुणाच्या मतांनी निवडून आले? ज्या मतदारसंघातून ते निवडून येतात, तो त्याआधी कुणाचा बालेकिल्ला होता?, असा सवाल देखील अहिर यांनी उपस्थित केला आहे.
-
आमच्या जिवावर मांडीला मांडी लावून तेही निवडून आले आहेत. आता वेळ बदलली म्हणून भाषा बदलण्याचं काम काही लोक करत आहेत, असंही सचिन अहिर म्हणाले.
-
दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर आज गिरगावात बोलताना आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपा वरळीत शक्तीप्रदर्शन करत असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
-
मला आनंद आहे. त्यांनी येऊन वरळी बघावं. वरळी सगळ्यांना आवडायला लागलं आहे. वरळी ए-प्लस झालं आहे. तरीदेखील मी सांगितलं त्याप्रमाणे या बालिशपणात आम्ही जाणार नाही. ज्यांना कुणाला कुठेही हा उत्सव साजरा करायचा असेल, तिथे करू द्या, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
-
मला वाटतं स्थानिक नागरिकांनी याविरोधात काही पत्र देखील दिली आहेत. आपण जे काही करू, ते आनंदाने करू. उगीच कुणालातरी डिवचणं हा सगळा पोरकटपणा झाला. यात मला जायचं नाही, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.

Vedam Bold Poster: अभिनेत्रीच्या ‘मादक’ होर्डिंगमुळे झाले ४० अपघात; अखेर पोलिसांनी हटवलं ‘बोल्ड’ पोस्टर