-
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरी प्रकरणात सर्वाधिक चर्चा झाली ती सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या “काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल” या डायलॉगची. तेव्हापासून शहाजीबापूंच्या बोलण्याची स्टाईल आणि त्यांचे संवात प्रचंड व्हायरल होत असतात.
-
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर देखील शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्या ‘स्टाईल’मध्ये शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला टोले लगावले आहेत.
-
मंगळवारी पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये झालेल्या एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना शहाजीबापू पाटील यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर अशा प्रकारे टोलेबाजी केली.
-
शिंदे गटातील आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा करणाऱ्या चंद्रकांत खैरेंना त्यांनी टोला लगावला. चंद्रकांत खैरे राहतात औरंगाबादला. ते म्हणतात १० ते १५ आमदार संपर्कात आहेत. म्हणजे नेमका आकडाही अजून नक्की झालेला नाही. काहीतरी ढगात गोळ्या मारून वातावरण भांबावून सोडण्यापलीकडे यांना उद्योग नाही, असं ते म्हणाले.
-
यांना काही येत नाही. यांना सगळं कळून चुकलं आहे. आता फक्त शेवटच्या गटांगळ्या मारण्याचं काम चालू आहे, अशा शब्दांत शहाजी बापूंनी खैरेंच्या विधानाचा समाचार घेतला.
-
यावेळी बोलताना शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनाही टोला लगावला. “मी शिवसेनेचा आमदार आहे. मी धनुष्यबाणावर निवडून आलो आहे. ते मला लक्ष्य करणार म्हणजे काय करणार? मी उद्धव ठाकरेंना, आदित्य ठाकरेंना सांगोल्यात दोन बंगले भाड्याने घेऊन देतो. त्यांनी तिथे राहावं. लोकांचं काम करावं आणि माझ्या मतदारसंघावर लक्ष ठेवावं”, असं ते म्हणाले.
-
“मला लक्ष्य करून फारतर काय होणार? मला पाडणार. पडायची प्रॅक्टिस या महाराष्ट्रात माझ्याशिवाय कुणाला आहे. ७-८ वेळा पडलोय धडाधड. राजकारण आहे म्हटल्यावर हे चालणारच. पडायचं असतं, पुन्हा उठायचं असतं”, अशी मिश्किल टिप्पणी यावेळी पाटील यांनी केली.
-
शिवसेनेनं त्यांच्या मतदारसंघातील लक्ष्मण हाकेंना पक्षात प्रवेश दिल्यावरून विचारताच त्यांनी टोला लगावला. “आरेरे.. काय नाव घेतलं रे सकाळी सकाळी गणपतीच्या देवळात..देवा.. आरे २७० मतं आहेत त्यांना.. दोन वेळा निवडणुकीला उभे राहिले आहेत. लक्ष्मण माझा मित्र आहे. पण ते महाविचित्र पात्र आहे”, असं पाटील म्हणाले.
-
“माझ्याकडे येऊन मला म्हणतो ‘बापू, मी धनगर आहे. मी उभा राहिलो तर तुम्हाला फायदा होईल’. मग गणपतरावच्या पुढे जाऊन त्यांना सांगणार ‘जे धनगर बापूंकडे जातील, त्यांनाच मी मतं मागणार’.. असल्या भानगडी करून राजकारण करणारा तो माणूस आहे. ते लक्ष देण्यासारखे नाहीत, असं पाटील म्हणाले.
-
दरम्यान, सभागृहात बोलायला परवानगीच दिली नसल्याचं पाटील म्हणाले. “या अधिवेशनात फक्त पुढचेच बोलत होते. बोलायचं तर काय बोलायचं? हात वर करावा लागतो. मग सभापती परवानगी देतात. आमचे हात वर करून करून दुखायला लागले. तरी आम्हाला कुणी बोलायला दिलं नाही. आम्ही तसेच आलो”, असं त्यांनी नमूद केलं.
-
माझ्या नातूचं बारसं २० तारखेला, २४ तारखेला माझ्या चुलत भावाची ७५वी आणि २५ तारखेला तालुक्यातल्या मोठ्या तरुणाचा वाढदिवस होता. त्यामुळे माझ्या तीन सलग तारखा तिकडंच गेल्या, असं स्पष्टीकरण शहाजीबापू पाटलांनी दिलं.
-
शिवाय घरी बायको आणि सूनही रडायला लागली होती की काय होतं एका दिवसानं अधिवेशनाचं? ९ वर्षांनी पोरगं झालं तरी बारश्याला तुम्ही थांबत नाहीत, असं म्हणायला लागले. त्यामुळे पुढच्या अधिवेशनात मला संधी मिळणार आहे. सगळे प्रश्न मी मांडणार आहे, असंही पाटील म्हणाले.
-
सुहास कांदे, संजय शिरसाट यांच्यात नाराजी नसल्याचं देखील ते म्हणाले. मला व्यक्तिगत असा अनुभव आलेला नाही. प्रत्येक आमदाराच्या काही अपेक्षा असू शकतात. गट स्थापन होताना या अपेक्षा नव्हत्या. पण नाराजी मनापासून असती, तर कांदेंचा मला फोन आला असता. शिरसाट यांना मंत्रीपदाची इच्छा आहे. पुढच्या विस्तारामध्ये ती नाराजी दूर होईल, असं ते म्हणाले.
-
दसरा मेळावा जवळ आल्यानंतर याचं धोरण मुख्यमंत्री जे ठरवतील, त्यानुसार हा मेळावा होईल. हा मेळावा शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचाच व्हावा. कारण शिंदेंची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेशी प्रामाणिक राहून काम करत आहे, अशी अपेक्षा शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केली.
-
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार प्रामाणिकपणे राबवले असते, तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती झाली नसती. फिरकूसुद्धा दिलं नसतं त्यांनी. भ*** घरी बसा म्हटलं असतं. कशाला चाललेत त्या काँग्रेसकडे भेटायला? बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेचा आधारच अडीच वर्षांपूर्वी उद्ध्वस्त झाला आणि अडचणी निर्माण झाल्या, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
-
ज्यांच्या सत्ता अचानक रातोरात गेल्या, ते वैतागले, भ्रमिष्ट झाले. ते काहीही बोलतात, गद्दार म्हणतात, खोकी काढतायत. खोकी, पेट्या, घोडा कुठल्या बापाला माहिती आहे? आम्हाला तर डाळिंबाची पेटी म्हणजे खोकी माहिती आहेत. ज्यांची संस्कृतीच राजकारणाची खोक्यावर अवलंबून आहे, अशी मनोवृत्तीच खोकं वगैरे बोलतात, असं ते म्हणाले.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल