Marathi News Today: लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती व महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उमेदवारी नाकारण्यात आलेल्या नेत्यांची नाराजी तर उमेदवारी मिळालेल्या नेत्यांचा विजयाचा निर्धार अशा गोष्टी घडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीत मनसे तर महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या समावेशावरूनही तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
Maharashtra News Live Updates 22 March 2024: महायुती आणि महाविकास आघाडीशी संबंधित महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एका क्लिकवर!
मुंबई : मालाड मालवणी येथे एका सार्वजनिक शौचालयाच्या गटारात तीन तरुण पडल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. मालवणी गेट क्रमांक ८ येथे घडलेल्या या घटनेतील तिघांना बाहेर कढण्यात यश आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यापैकी दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मोदींना औरंगजेब म्हणण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी औरंगजेबी कार्य केलेलं पाहावं. औरंगजेबानं सत्तेसाठी स्वत:च्या भावाला घराबाहेर काढलं होतं. महाराष्ट्रात सत्तेसाठी घरातल्या भावाला कुणी काढलं हे राज्याला माहिती आहे. त्यामुळे औरंगजेबी वृत्ती उद्धव ठाकरेची आहे – चंद्रशेखर बावनकुळे</p>
नागपूर : होळी आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नागपुरात गुरुवारी एका ७८ वर्षीय वृद्धेचा करोनाने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे. ही महिला मेडिकल रुग्णालयातील अतिदक्षता विभाग क्रमांक ५२ मध्ये दाखल असल्याने येथील इतर रुग्णांनाही संक्रमणाचा धोका आहे.
नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी जिल्ह्यातील ४८०० केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी आणि इतर मतदान अधिकारी अशा एकूण ३० हजार ५३७ जणांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून सत्ताधारी भाजपने ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते-पाटील यांना उमेदवारी नाकारून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुनःश्च संधी दिल्यामुळे मोहिते-पाटील कुटुंबीयांची नाराजी कायम आहे.
पुणे : काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र काँग्रेसकडून माजी उपमहापौर आबा बागूल लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आबा बागूल यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली.
पुणे : ऑनलाइन प्रवासी वाहतूक क्षेत्रातील ओला आणि उबर या कंपन्यांचे परवान्याचे अर्ज नामंजूर झाल्याने त्यांची सेवा अवैधपणे सुरू आहे. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी या कंपन्यांकडे ३० दिवसांची अवधी असताना त्यांच्या कॅबवर कारवाईची मोहीम प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) हाती घेतली. मात्र, आरटीओने अखेर ही मोहीम थांबवली असून, यासाठी प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे कारण पुढे केले आहे.
नागपूर : उपराजधानीत महाशिवरात्रीदरम्यान उपवासाचे खाद्यपदार्थ खाऊन सव्वाशेहून अधिक नागरिकांना विषबाधा झाली होती. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी शिंगाड्याचे शेव खाऊन दहा जणांना विषबाधा झाली. या सगळ्यांना नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात दाखल केले गेले. तर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
मुंबई : रेल्वेच्या भूखंडामुळे निविदा रद्द करण्याची पाळी आलेल्या धारावी पुनर्विकास प्राधिकरणाला अद्यापही या भूखंडाचा ताबा मिळालेला नाही. धारावी पुनर्विकासासाठी अदानी समूहाचा समावेश असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्प या विशेष हेतु कंपनीची स्थापना होऊनही अद्याप हा खुला भूखंड ताब्यात न मिळाल्याने प्रत्यक्ष प्रकल्पाला सुरुवात करता आलेली नाही, असे या कंपनीशी संबंधित सूत्रांनी सांगितले.
नागपूर : क्रिकेट सट्टेबाजांचे नंदनवन असलेल्या नागपूर शहराला अनेक क्रिकेट बुकींची पसंती आहे. आज, शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या कोट्यवधीच्या सट्टेबाजीसाठी नागपुरात मुंबई, दिल्लीतील सट्टेबाजांनी मुक्काम ठोकला आहे. त्यांच्या दिमतीला नागपुरातील कुख्यात सट्टेबाज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : येत्या रविवारी २४ मार्च रोजी साजरा होणाऱ्या होळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळून आल्यास याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे.
नागपूर : एस.टी. को-ऑपरेटिव्ह बँक अडचणीत सापडली आहे. गेल्या दीड वर्षात बँकेतील सुमारे ५०० कोटींच्या ठेवी काढल्याने येथील सभासदांच्या कर्ज पुरवठ्याला स्थगिती देण्यात आली आहे.
मुंबई : राज्य सरकारने मरिन ड्राइव्हसमोरील विल्सन महाविद्यालयाच्या आखत्यारितील विल्सन जिमखान्याचा एक लाख चौरस फुटांचा भूखंड ३० वर्षांच्या भाडेकरारावर जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला (जिओ) देण्याचा निर्णय अलीकडेच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
नागपूर: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा सुरू आहे. परीक्षा सुरळीत सुरू असली तरी एका प्रश्नपत्रिकेतील चकीवरून वाद उठला आहे. विज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेत एका संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना अतिरिक्त गुण देण्याबाबत आमदार कपिल पाटील यांनी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि बोर्डाला पत्र लिहिले आहे.
नागपूर : पुरुषांना लग्नासाठी बाध्य करून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या एका महिलेचा उलगडा झाला आहे. संबंधित महिलेने ‘हनी ट्रॅप’ करत छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देत एका ट्रॅव्हल्स व्यापाऱ्याशी जबरदस्तीने लग्न करत १७ लाख उकळण्यात आले. तिचे हे आठवे लग्न होते.
नाशिक : भ्रामक योजनांद्वारे हजारो गुंतवणूकदारांना २०० कोटींहून अधिकचा गंडा घालणाऱ्या केबीसी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण, त्याची पत्नी आरती यांसह अन्य संशयितांची ८४.२४ कोटींची बेनामी, स्थावर व जंगम मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे.
मुंबई : दक्षिण मुंबईच्या एका टोकाला असलेल्या गिरणगावातील शिवडी, भायखळा, लालबाग, परळ परिसरातील कापड गिरण्यांचा प्रश्न अद्यापही पूर्णपणे सुटलेला नाही. काही गिरण्यांचा विकास झाला आणि तेथे बांधलेल्या घरांत गिरणी कामगार राहत आहेत.
पिंपरी : हॉटेलमधील कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी मोशी येथे स्वच्छ भारत योजनेतून बायोगॅस प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. हॉटेलमधून गोळा होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती करण्यात येणार आहे.
मुंबई : मिठी नदी सुधार आणि प्रदूषण नियंत्रण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या पात्र प्रकल्पप्राधितांकडे महापालिकेच्या धोरणानुसार, एकतर पर्यायी सदनिका किंवा आर्थिक भरपाई स्वीकारण्याचा असे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. ते नाकारण्याचा अथवा नदी काठी अनिश्चित राहण्याचा पर्याय त्यांच्याकडे नाही, असे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.
नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे, येथून भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दोन वेळा दोन लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले. २०२४ मध्येही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. गडकरींना‘ विकास पुरूष’ म्हणून ओळखले जाते. नागपूरचा चेहरा-मोहरा त्यांनी बदलला, त्यांच्या विरोधात काँग्रेसला उमेदवार मिळत नाही, अशी टीका भाजपकडून केली जाते.
वर्धा : हिंदूंच्या प्रश्नावर सर्वत्र रान उठविणारे नेते म्हणून विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांचा परिचय आहे. आजही देशात हिंदू असुरक्षित असल्याचा दावा त्यांनी केला. वर्ध्यात एका बैठकीसाठी ते आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन अधिकृत उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी तीव्र इच्छुक असलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांना तलवार म्यान करावी लागण्याची चिन्हे आहेत.
उद्या भाजपा राज ठाकरेंना छत्रपती शिवाजी महाराजांचेही वारसदार ठरवतील. बाळासाहेब ठाकरेंचा वारसा काय आहे हे भाजपाला सांगण्याइतके आम्ही अजून खाली घसरलेलो नाही. जे आपल्या स्वार्थासाठी, राजकीय फायद्यासाठी बाळासाहेबांचा पक्ष फोडतात, महाराष्ट्र तोडण्याची स्वप्नं पाहातात, त्यांच्याकडून वारसा कुणाचा हे आम्ही का शिकायचं? शरद पवार हयात असताना त्यांच्या वारस सुप्रिया सुळे नसून मोदींनी भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप केलेले अजित पवार आहेत असं म्हणतात. ही भाजपाची अक्कल आहे. त्यामुळे ते अशी विधानं करत आहेत – संजय राऊत</p>
उद्या ते कुणालाही अटक करू शकतात. मोदी-अमित शाहांना ज्यांच्यापासून हरण्याची भीती वाटते, त्या सगळ्यांना हे अटक करू शकतात. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांना लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, लाल-बाल-पाल, वीर सावरकर या सगळ्यांची भीती वाटत होती. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगात टाकलं किंवा फासावर लटकवलं. मोदींचं सरकार त्याच पद्धतीने चाललंय – संजय राऊत</p>
तुम्ही लोकांनी निवडून दिलेल्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना अटक करताय. विद्यमान मंत्र्यांना अटक करताय. देशातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार तुमचं आहे. ज्यांना अटक करायला हवी, त्यांना तुम्ही मंत्री करता, उपमुख्यमंत्री करता आणि विरोधी पक्षाच्या लोकांना अटक करता. याला हुकुमशाही म्हणतात. त्याच हुकुमशाहीविरोधात आम्ही लढतो आहोत – संजय राऊत</p>
मद्य घोटाळाप्रकरणी केजरीवाल आत्ता तुरुंगात गेले आहेत. त्यांच्याआधी मनीष सिसोदिया, संजय सिंह, के कविता यांचीही नावं आहेत. पण भाजपाला मिळालेले निवडणूक रोखे तपासा. याच घोटाळ्यातील प्रमुख ठेकेदारांनी भाजपाला निधी दिला आहे की नाही ते समोर येऊन त्यांनी सांगावं. गुन्ह्याचा पैसा जर तुमच्या खात्यात आला असेल, तर सगळ्यात आधी आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा भाजपाच्या अध्यक्षांवर व्हायला हवा. पण निवडणूक रोख्यांवरून उडणाऱ्या धुरळ्यावरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवाल यांना अटक केली आहे – संजय राऊत</p>
एकेकाळी नरेंद्र मोदी, भाजपाही भ्रष्टाचारासाठी केजरीवाल यांच्याविरुद्ध लढत होता. केजरीवाल यांची अटक पूर्णपणे घटनाबाह्य व राजकीय सूडबुद्धीने केलेली आहे. भाजपावर निवडणूक रोखे घोटाळा शेकलेला आहे. हजारो कोटी रुपये खंडणी, हफ्तावसुली, दहशतीच्या माध्यमातून गुन्हेगारांकडून गोळा केले. भाजपा स्वत:ला हिंदुत्ववादी समजते. गोवंश हत्या बंदीसाठी मोठं आंदोलन त्यांनी केलं. मॉब लिंचिंग केलं. कुणाकडे मांस सापडलं तर हे गायीचं मांस असल्याचं म्हणत लोकांना मारतात. पण भाजपा कत्तलखान्यांकडूनही देणग्या घेते. जिथे गायीचं मांस कापून निर्यात केलं जातं, त्यांच्याकडूनही देणग्या घेतल्या आहेत. हे यांचं हिंदुत्व आहे. ते लोकांना फसवत आहेत. समोर येऊन कोणत्या कंपन्या आहेत ते सांगा नाहीतर मी सांगतो – संजय राऊत</p>