मी आज पाच वाजता बेमुदत उपोषणाबाबत काय ती भूमिका मांडणार आहे. तर राज्यातलं साखळी उपोषण हे शांततेत सुरु ठेवायचं आहे. आम्हाला साखळी उपोषण करण्याचा अधिकार आहे. तसंच इतरांनी जे बेमुदत उपोषण सुरु केलं आहे ते थांबवलं आहे. मराठे मागे हटत नसतात. आपण मागे आलो कारण पोलिसांचा फौजफाटा इतका लावण्यात आला त्यातच त्याची (देवेंद्र फडणवीस) माघार दिसली. आपण यशस्वी झालो आहोत. मराठ्यांना अडचणींत आणू नका. आज आणि रात्रीही मला कुणाला अडचणींत येऊ नये म्हणून आम्ही त्यांनाच (देवेंद्र फडणवीस) हरवलं आहे असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठ्यांची नाराजी तुम्हाला परवडणार नाही

मराठ्यांची नाराजी तुम्हाला परवडणार नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा माझी विनंती आहे सग्या-सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. लोकांचा विचार करुन मी आत्ता आंतरवलीत आलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आहे की एखादा किल्ला जिंकायचा असेल तर सगळा विचार करुन घ्या. आता माझे मावळे, माझे मराठे किल्लाच जिंकणार आहेत असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

जनताच मालक आहे हे विसरु नका

१६ दिवस झाले त्यांना इथे कुणाला लक्ष द्यायला वेळ नाही. काल गुन्हे का दाखल करण्यात आले? एकाच्या हट्टापायी समाज अडचणींत येऊ नये. आम्ही वेळ-काळ ओळखूनच निघालं होतं. आज सरकार आहे म्हणून तु्म्ही इंटरनेट, पेट्रोल पंप बंद करता. पण लक्षात ठेवा जनताच मालक आहे असंही जरांगे यांनी म्हटलं आहे. समाजाला सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करा अशी मागणी पुन्हा एकदा जरांगेंनी केली आहे.

सागर बंगल्यावर बोलवलं आणि दरवाजे बंद करुन घेतले

सागर बंगल्यावर स्वागत करु म्हणाले होते ते तुम्ही करायला पाहिजे होतं. त्यामुळे तुम्ही मोठे झाला असतात असाही टोला मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. देवेंद्र फडणवीसांनी मला बोलवलं आणि घराचे दरवाजे बंद केले. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अविश्वास दाखवलेला नाही. मात्र त्याचं ऐकून (देवेंद्र फडणवीस) बोलत असाल तर आम्ही शांत बसणार नाही. तुम्हाला वाटत असेल की आता हे माघारी फिरले आहेत तर आपल्याला डाव खेळता येईल. आंतरवालीचा लाठीमार पुन्हा करण्याचा प्रयत्न करु नका. गोडी गुलाबीने सांगतो आहे सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. जर तुम्ही ऐकलं नाही तर तुमच्या विरोधातली नाराजीची लाट वाढत जाणार आहे असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “मनोज जरांगे पाटील शरद पवारांचा माणूस, प्रसिद्धीसाठी मराठा मुलांचा…”, आता कुणी केले गंभीर आरोप?

मनोज जरांगे माघारी फिरले

मुंबईला निघालेले मनोज जरांगे यांनी सगळ्या मराठा बांधवांना आपल्या आपल्या गावांमध्ये परतण्याचं आवाहन केलं आहे. आम्हाला कायद्याचं पालन करायचं आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. अंबडमध्ये संचारबंदी लावण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे फिरण्याचा निर्णय घेतला आहे. शहाणी भूमिका घेऊन परत जातो आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे यांनी भंबेरी गावातून आंतरवाली सराटीमध्ये परतले आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने शांत रहावं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. संचारबंदी लागल्याने आपल्याला मुंबईला जाता आलेलं नाही. राज्यभरातल्या सगळ्या मराठा बांधवांनी शांत राहिलं पाहिजे असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis invites me at sagar bungalow and closes the doors said manoj jarange patil scj
Show comments