महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा सोमवारी पार पडला. महाराष्ट्रातली लोकसभा निवडणूक झाली आहे. तर देशात आणखी दोन टप्पे बाकी आहेत. २५ मे रोजी सहाव्या टप्प्यात निवडणूक होणार आहे तर १ जून रोजी देशात लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा असेल. अशात महाराष्ट्रात कमी मतदान झालं अशी एक चर्चा सुरु झाली आहे. मतदानाची टक्केवारीही तेच सांगते आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेमुळेच हे सगळं झालं आहे लोकांना मतदान करायचं होतं मात्र कुठे नावंच नाही, कुठे मतदान केंद्रच दूर अशा घटना घडल्या असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

१५०० लोकांची एक यादी अशा याद्या तयार करण्यात आल्या आहेत. ५०० ते ७५० लोकांपेक्षा जास्त मतदारांची यादी नसावी. जेणेकरुन ते एका मशीनवर मतदान करु शकतात. यावेळेस निवडणूक आयोगाने काय केलं आहे माहीत नाही? समजा १५०० पैकी साठ टक्के लोक मतदानाला उतरले तर ९०० लोक झाले. त्यांचं मतदान एका मशीनवर आणि एका खोलीत कसं होणार? एक मत द्यायचं असेल तर दीड मिनिटांचा अवधी जातो. पण तीन ते चार मिनिटं जातात. तिथे काम करणारी माणसंच आहेत. त्यांच्या कामांना मर्यादा आहेतच. कुठेही पंखे नाहीत, खोल्या अतिशय अडगळ असलेल्या शाळांमध्ये घेण्यात आल्या. १५०० लोकांसाठी एक मशीन आधी दोन मशीन दिल्या जात होत्या. यावेळी सगळीकडे एकच मशीन. त्यामुळे मतदान पूर्णच झालं नाही. मतदान करायला लोकांना चार-चार तास लागत होते ही वस्तुस्थिती आहे. असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला.

हे पण वाचा- “सगळ्यांना पाडता मग मुलाला का निवडून आणलं नाही?”, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना खोचक टोला, म्हणाले, “एवढा माज…”

चार-चार तास मतदारांना उभं रहावं लागलं

पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले, “प्रचंड उन्हाळा आहे, चार तास मतदार कसे उभे राहतील? याचा विचार केला गेला नाही. आमच्याकडे १२ लोक रांगेतच बेशुद्ध पडले. हॉस्पिटलला न्या, उपचार करा हे सगळं फक्त मी कळवा, मुंब्रा या ठिकाणांबद्दलच बोलतो आहे. हे प्रकार राज्यात सगळीकडे झाले. मला आधी सांगा १५०० लोकांची यादी करणारा महाभाग नेमका कोण आहे? हे निवडणूक आयोगाने तपासलं पाहिजे. आणखी एक प्रकार घडलाय तो म्हणजे समजा एक इमारत आहे आणि तिथे एका कुटुंबात पाचजण असतील तर पाचही जणांचं मतदान वेगवेगळ्या केंद्रांवर. याचा अर्थ काहीही लक्ष देण्यात आलेलं नाही. एकाच कुटुंबातले लोक आहेत. तर त्यांचं नाव वेगवेगळ्या शाळांमध्ये कसं? हेदेखील सगळीकडे झालं. ईव्हीएम मशीन मंदावल्या कशा हे तर न उलगडणारं कोडं आहे. या मशीन जाणीवपूर्वक मंद केल्या गेल्या होत्या असं आमचं मत आहे. त्यामुळे मतदार कंटाळले.” असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातलं मतदान कमी व्हावं म्हणून

“निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातलं मतदान कमी व्हावं यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. १५०० च्या याद्या हा एक पुरावा आणि नियोजन नसलेल्या केंद्रांवर लोकांची मतदानाची सोय करण्यात आली. ईव्हीएम स्लो करण्यात आली. दोन मिनिटाला एक मत पडलं तरीही १२ तासांमध्ये ६२० ते ७०० लोकांचं मतदान. यादी १५०० ची आणि मतदान निम्मंही नाही. हे सगळं जाणीवपूर्वक करण्यात आलं. “असाही आरोप आव्हाडांनी केला.

आसाममध्ये ७८ टक्के, बंगालमध्ये ८१ टक्के मतदान झालं. पण महाराष्ट्रात इतकं कमी मतदान करताना लोकांच्या काय झालंय ते लक्षातच आलेलं नाही. मतदान केंद्रांवर पाणी नव्हतं, पंखे नव्हते, काही ठिकाणी मशीन बंद पडल्या. मतदारांची गैरसोय कशी होईल हे पाहिलं गेलं. मी कळवा मुंब्रा येथील आमदार म्हणून मी खुली तक्रार करतो आहे की हे निवडणूक आयोगाचं सपशेल अपयश आहे. असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.