कृषीसाठी हवामान आणि त्यामधील पाऊस हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. कृषी विज्ञानानुसार बहुतेक पिके, फळपिके यांचे उत्पन्न ठराविक हवामानातच साधले जाते. तसेच विशिष्ट हवामानामुळे काही कीडरोगांचे प्रमाणही अचानक वाढते.
हवामानाबाबतची निरीक्षणे व नोंदी प्राचीन भारतीय ग्रंथांमध्येही सापडतात. तिसऱ्या शतकातील ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ या ग्रंथामध्ये शेतीउपयुक्त असणाऱ्या पावसाच्या नोंदी व मापन केलेले आढळते. पाचव्या शतकात पाणिनीने ‘गोष्पद’ या एककामध्ये पर्जन्याचे मोजमाप केलेले आढळते. त्या वेळी पाऊस मोजण्यासाठी ठराविक आकाराचे कुंड बांधले जात. त्यामध्ये जमा झालेले पाणी  ‘द्रोण’ या साधनाने मोजल्याचे कौटिल्याच्या नोंदींमध्ये आढळते. कौटिलीय अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये झुडुपे वाढलेल्या पडीक जमिनीवर १६ द्रोण (सुमारे ६३४ मिमी) महाराष्ट्रातील भूभागात साडेतेरा द्रोण (सुमारे ५३५ मिमी) आणि उज्जन (तत्कालीन अवंतीनगरी) परिसरात २३ द्रोण (सुमारे ९११ मिमी) एवढा पाऊस पडत होता असे नमूद केले आहे.  सहाव्या शतकामध्ये वराहमिहिराने ‘बृहद्संहिता’ या ग्रंथामध्ये हवामान आणि पावसाची भाकिते छंदोबद्ध पद्धतीने लिहिलेली आढळतात.
सतराव्या शतकामध्ये जगातील पहिला तापमापक गॅलेलिओ गॅलिली या शास्त्रज्ञाने तर टॉरिसीली या शास्त्रज्ञाने हवेचा दाबमापक तयार केला. त्यानंतरच्या शतकात, सन १७१९मध्ये तत्कालीन जयपूर संस्थानचे महाराज सवाई राजा जयसिंह यांनी उज्जन येथे वराहमिहीर यांच्या सिद्धांतानुसार जंतरमंतर या वेधशाळेची उभारणी केली. त्यांनीच पुढे जयपूर, दिल्ली, मथुरा, वाराणसी येथेही वेधशाळा उभारल्या. आजही या वेधशाळांमधून सम्राटयंत्र, भित्तीयंत्र, दिगंश यंत्र, शंकू यंत्र, नाडीवलय यंत्र यांद्वारे अत्यंत आश्चर्यकारक वैज्ञानिक माहिती मिळते.
 पुढे भारतातील पहिली आधुनिक वेधशाळा १७९३ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चेन्नई येथे उभारली. १८२३ मध्ये मुंबई येथे, १८२९ मध्ये कोलकाता येथे आणि १८३६ मध्ये तिरुवअनंतपूरम येथे स्थापन झालेल्या वेधशाळांमधून हवामानविषयक नोंदी घेण्यास सुरुवात झाली. हवामान संशोधनामध्ये प्रगती झाली ती १८७५ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय हवामान खात्यामुळे. सध्या अद्ययावत व प्रगत (रडार, कृत्रिम उपग्रह, सुदूर संदेशवहन इ.) तंत्रज्ञानामुळे हवामानाबाबत अचूक नोंदी घेणे शक्य झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजचे महाराष्ट्रसारस्वत  २२ जून
१८५६  संस्कृत व मराठी भाषा आणि व्याकरणाचे अभ्यासक रामचंद्र भिकाजी जोशी यांचा जन्म. व्याकरणाची शिशुबोध, बालबोध व प्रौढबोध पुस्तके त्यांनी लिहिली आणि ‘मराठी भाषेची घटना’, ‘मराठी शब्दसिद्धी’ असे ग्रंथही लिहिले.
१९०८  महानुभाव साहित्याचे गाढे अभ्यासक आणि मराठी भाषा उच्चशिक्षणातही वापरली जावी यासाठी पाठपुरावा करणारे विष्णु भिकाजी कोलते यांचा जन्म. त्यांनी संपादित केलेल्या आठ जुन्या ग्रंथांपैकी पाच महानुभाव ग्रंथ आहेत.  टीपा, शब्दार्थ, संदर्भ यांनी हे ग्रंथ समृद्ध करण्याचे काम कोलते यांनी केले. नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी काम केलेले कोलते अर्वाचीन साहित्याचाही सैद्धान्तिक विचार करीत. महानुभाव तत्त्वज्ञान, आचारधर्म, संशोधन अशा तीन पुस्तकांसह प्राचीन वाङ्मयावर, तसेच विदर्भावर आणि ‘मराठी अस्मितेचा शोध’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले होते. १९९८ साली ते निवर्तले.
१९३५  ‘माझी अक्षरगाथा’, ‘चित्राक्षरं’ आणि ‘कमलाक्षरं’ या तीन पुस्तकांद्वारे मराठी अक्षरांना आपण दिलेली वळणे ग्रंथबद्ध करणारे अक्षरकार कमल शेडगे यांचा जन्म. गेल्या अर्धशतकात नाटक-चित्रपट जाहिराती, तसेच मुखपृष्ठे यांना शेडगे यांच्या अक्षरांमुळे दृश्यार्थ लाभला. संजय वझरेकर

वॉर अँड पीस मुखरोग: भाग-५
रुग्णालयीन उपचार- ४) घटसर्प- तज्ज्ञांच्या देखरेखीखाली जीवरक्षणाचे विनाविलंब उपचार करावेत, ५) जिभेवरील किटण-जीभ साफ करण्याकरिता इरिमेदादि तेल, शोधन तेल, मध यांचा वापर करावा. रोगी बलवान असल्यास, कफाचा त्रास असल्यास विरेचनाचे औषध घ्यावे. कृमींची शंका असल्यास कृमिघ्नबस्ती घ्यावा. पोटात वायू, अन्न कुजणे अशी लक्षणे असल्यास निरुहबस्ती घ्यावा, ६) पडजिभेचे विकार- कफामुळे पडजीभ वारंवार पडून खोकला येत असल्यास, रोगी बलवान, तरुण असल्यास, ज्येष्ठमध व गेळफळाच्या काढय़ाचा उलटीकरिता उपयोग करावा, ७) पांढरे ठिपके- रोगी बलवान असल्यास, कफ झाला असल्यास योग्य वेळी वमनकर्म करवावे, ८) शोष- मन, बोलणे, शरीर याकरिता पूर्ण विश्रांती मिळेल अशी रुग्णालयीन व्यवस्था असावी. गरजेनुसार झोपेकरिता निद्राकरवटी रात्रौ सहा गोळ्या किंवा जटामांसी चूर्णाचा फांट घ्यावा.
कान, नाक, घसा, दात या विकारांच्या आयुर्वेदीय चिकित्सेकडे वैद्यांचे लक्ष थोडे कमी आहे असे दिसते. या विकारांकरिता रुग्ण व वैद्य लोक डॉक्टरी उपायांचा वापर बहुतांशी करीत असतात. आमच्या लहान अनुभवाप्रमाणे इ.एन.टी. व दंत विकाराकरिता आयुर्वेदात खूपच प्रभावी, तत्काळ गुण देणारी औषधे आहेत. त्यातील इरिमेदादि तेल हे एक प्रमुख औषध आहे. या सिद्ध तेलात खैरसालीचा मोठय़ा प्रमाणावर वापर आहे, याशिवाय मंजिष्ठ, लोध्र, ज्येष्ठ मध, कायफळ, लाख, वडाची साल, नागरमोथा, वेलची, कापूर, अगरू, पद्मकाष्ठ, लवंग, जायफळ, कंकोळ, रक्तचंदन, गेरू, दालचिनी, नागकेशर, धायटी फूल व तीळ तेल अशी घटक द्रव्ये आहेत. इरिमेदादि तेलामुळे तोंडात फोड, मुखदरुगधी, दात हलणे, रक्त येणे, दंतशूल, घशात घाण वास, दंतकृमी, दातात मांस वृद्धी इत्यादी मुखरोगांकरिता उपयुक्त. त्याकरिता तेलाचे प्रतिसारण, गरम पाण्यातून गुळण्या उपयुक्त. हिरडय़ा, जीभ, ओठ, टाळू यांच्या जखमा, लाली याकरिता इरिमेदादि तेल दि बेस्ट औषध. – वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      अंघोळ
हा शब्द ‘अंग ओले’ करणे असा आला आहे, पण मनाचे काय असा प्रश्न आहे. सकाळी अंघोळ करताना त्या दिवसाचा जो आढावा घेतला जातो, त्यात ‘मोबदला’ ही गोष्ट प्रामुख्याने असते हे न नाकारलेले बरे. मी आज जे करणार आहे त्याचा किती मोबदला मला मिळेल किंवा किती मोबदला मला द्यावा लागेल हेच विचार घोंघावत असतात. मोबदला नुसता पैशाचा नसतो तर तो भावनिक किंवा सामाजिक असू शकतो. पगार महिन्यातून एकदाच मिळत असेल पण त्याच्या मोबदल्यात जे काम केले जाते त्यातल्या प्रक्रियांमध्येही राग-द्वेष, न्याय-अन्याय, हिरमोड आणि उल्हास दडलेले असतात. प्रत्येक गोष्टीत आपली काहीतरी अपेक्षा असते. जे असते आवडलेले। ते जर मिळाले। तर ते भोगण्यासाठी। मन आतुरते।। उलट जर प्रतिकूल। काही घडले। तर त्वरित टाकून पळावे। अशी भावना होते।।
वरच्या ओबडधोबड रचना ज्ञानेश्वरांची क्षमा मागत मी केल्या आहेत. ज्ञानेश्वर आणखीही कितीतरी सांगतात.. मासे पाहून बगळा। किंवा दरिद्रय़ाला दिसताच ठेवा। स्त्रीला बघून कामवेडा। सरसावतात सगळे ॥
स्वर्गलोकीच्या उर्वशी। ऐकून त्यांच्याविषयी। माणसे लावतात आकाशी। यज्ञाच्या शिडय़ा ॥
पारवा मारतो भरारी। चढतो नभाचिया पोटी। पण पारिवी बघून लोटतो। आंग सगळे.॥
हल्लीच्या पारव्या उर्वशीसारख्याच स्त्रिया किंवा इतर कामवेडय़ा त्याही सरसावू लागल्या आहेत (More the Merrier!) यज्ञाच्या शिडय़ा हा वाक्प्रचार जरा बोचराच आहे. यज्ञकर्म मुळात काहीतरी अपेक्षेने केले जात होते, असा टोमणा इथे फार गमतीने मारण्यात आला आहे. वेद म्हणतील ढीग। तुला जचेल तेवढेच शीक।। असा उल्लेख गीतेलाच धरून ज्ञानेश्वरांनी यज्ञाच्या बाबतीत आधीच केला आहे. पण काहीच अपेक्षा ठेवूनच माणूस काम, कार्य करणार हा सर्वसाधारण नियम आहे आणि हा नियम उत्क्रांतीच्या ओघात आला आहे. जेव्हा माणूस निसर्गात उगवलेली फळे आणि जमिनीत दडलेली कंदमुळे खात होता, तेव्हा जगण्यासाठीचा संघर्ष कमी असणार. पण एका अर्थाने बुद्धी आडवी आली आणि माणूस अरण्ये सोडून पठारावर आला आणि त्याने शेती सुरू केली तेव्हापासून हे त्रासदायक काम्य किंवा अपेक्षायुक्त कर्म आणखीनच रुंदावले. त्यावरही ज्ञानेश्वर किती अचूक बोलतात ते बघण्याजोगे आहे. उदा.
गवत उगवते रानात। पण भात मात्र लावतात
नदी असते स्वाभाविक। पण विहीर खणावी लागते
शरीराचे अवयव। असतात नैसर्गिक। पण दागिने मात्र। घडवतात
पाणी अन्न आणि दागिने ही काम्य कर्मे त्रासदायकच, त्याबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Observatories of astrometric metrology system
Show comments