किरगिझस्तानमध्ये १७-१८ मेच्या मध्यरात्री हिंसाचार उसळला. एका व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ झाली. किरगिझस्तानमधील भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आले, त्यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानकडून किरगिझस्तानला राजनैतिक इशारा देण्यात आला. त्याच निमित्ताने याचा भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांवर नेमका काय परिणाम झाला आहे, यावर संबंधित देशांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आणि किरगिझस्तानमधील स्थलांतरित कोणत्या समस्यांना तोंड देत आहेत याचा घेतलेला हा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमके काय घडले?

१७ आणि १८ मेच्या रात्री किरगिझस्तानची राजधानी बिश्केकमध्ये हिंसाचार उसळला होता. ज्यात तीन परदेशी नागरिकांसह २८ जण जखमी झाले. हा हिंसाचार आणि गोंधळ परदेशी विद्यार्थी आणि स्थलांतरितांच्या विरोधात असल्याचे दिसून आले आणि प्रामुख्याने यात भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थी भरडले गेले. त्याच पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून महत्त्वपूर्ण राजनैतिक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. १३ मे रोजी झालेल्या भांडणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा गोंधळ निर्माण झाला. या व्हिडिओत इजिप्तशियन वैद्यकीय विद्यार्थी हे किरगिझ विद्यार्थ्यांशी भांडताना दिसत आहेत. या व्हिडीओमुळे किरगिझ विद्यार्थ्यांचा मोठा समूह रस्त्यावर उतरला. त्यांनी परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. या हल्ल्याचाही व्हिडीओही प्रसारित झाला. परंतु स्थानिक पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील संकट टळले.

अधिक वाचा: विश्लेषण: कॉफी आणि जातीव्यवस्था याचा नेमका काय संबंध होता?

भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांवर परिणाम

हिंसाचारात भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आले होते. बिश्केकमधील पाकिस्तानी वैद्यकीय विद्यार्थी मोहम्मद इहतिशाम लतीफ यांनी RFE/RL सोबत त्याचा त्रासदायक अनुभव शेअर केला. तो म्हणाला “येथे परिस्थिती वाईट आहे. इजिप्शियन विद्यार्थ्यांनी येथील स्थानिकांशी हाणामारी केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. स्थानिक लोक आता विरोध करत आहेत आणि ते भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थ्यांना मारहाण करत आहेत…. विद्यार्थी वसतिगृहापर्यंत आणि घरापर्यंत स्थानिकांनी त्यांचा पाठलाग केला… वसतिगृहाचे दार तोडले. मी कालपासून इतर विद्यार्थ्यांसह विद्यापीठात बंद आहे आणि आज मी माझी परिस्थिती तुमच्याशी शेअर करत आहे.”

विद्यार्थी किरगिझस्तानची निवड का करतात?

उच्च दर्जाच्या वैद्यकीय प्रशिक्षणामुळे दक्षिण आशियातील विद्यार्थ्यांसाठी किरगिझस्तान हे एक विद्यार्थीप्रिय आवडते ठिकाण ठरले आहे. मायग्रेशन डेटा पोर्टलनुसार, किरगिझस्तानने २०२१ मध्ये पाच मध्य आशियाई देशांपैकी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी (६१,४१८) स्वीकारले. किरगिझस्तानमध्ये सुमारे १४ हजार ५०० भारतीय आणि १० हजार पाकिस्तानी विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. परवडणारे राहणीमान, भारतीय खाद्यपदार्थांची उपलब्धता, अनुकूल विद्यार्थी- शिक्षक गुणोत्तर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी यासारख्या घटकांमुळे या देशाला प्राधान्य दिले गेले.

भारत आणि पाकिस्तानच्या प्रतिक्रिया

हिंसाचाराला प्रत्युत्तर म्हणून, भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयांनी बिश्केकमधील त्यांच्या विद्यार्थ्यांना सूचनावजा इशारे जारी केले. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी विद्यार्थ्यांना दूतावासाशी नियमित संपर्क ठेवण्याचे आवाहन केले, “[मी] बिश्केकमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या परिस्थितीवर लक्ष देऊन आहे. सध्या परिस्थिती शांत असल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना दूतावासाच्या नियमित संपर्कात राहण्याचा सल्ला देतो” असे ते म्हणाले. किरगिझ प्रजासत्ताकामधील भारतीय दूतावासानेही एक निवेदन जारी केले आहे. त्यात सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे. तसेच कुठल्याही प्रकारच्या गंभीर दुखापतीची घटना घडलेली नाही, असेही म्हटले आहे.

किरगिझ सरकारचा प्रतिसाद

किरगिझ सरकारने या हिंसाचाराच्या चौकशीची घोषणा केली आणि दोषींना शिक्षा करण्याचे वचन दिले. परंतु, सरकारने बेकायदेशीर स्थलांतरितांवर काही आरोप ठेवल्याचेही दिसून आले. किरगिझ अधिकाऱ्यांनी दावा केला की, ते “बेकायदेशीर स्थलांतर दडपण्यासाठी आणि किर्गिस्तानमधून अवांच्छित व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी निर्णायक उपाययोजना करत आहेत.”

अधिक वाचा: ३० वर्षांपूर्वीच झालं दोघांचही निधन, तरीही आज होतंय लग्न; काय आहे भारतातील भूतविवाहाची प्राचीन परंपरा?

किरगिझस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे (यूकेएमके) प्रमुख काम्चीबेक ताशीव यांनी सांगितले की, १८ ते २५ वयोगटातील ५००-७०० स्थानिक नागरिक किरगिझस्तानमध्ये काम करणाऱ्या स्थलांतरितांच्या वाढत्या संख्येच्या निषेधार्थ एकत्र आले होते. ताशीव यांनी देशात होणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतराविषयी माहिती दिली आहे. विशेषत: पाकिस्तान आणि बांगलादेशमधून होणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतराचा त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, सरकारी अधिकारी दररोज असंख्य बेकायदेशीर स्थलांतरितांना ओळखतात आणि त्यांची हकालपट्टी करतात.

किरगिझस्तानमधील स्थलांतरितांचे प्रश्न

बिश्केकमधील हिंसाचार किरगिझस्तानमधील स्थलांतरितांच्या ओघाशी संबंधित तणाव दर्शवतो. हा देश दक्षिण आशिया आणि रशियामधील मोठ्या संख्येने स्थलांतरितांशी झगडत आहे, त्यामुळे स्थानिक जनतेत निराशा वाढत आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकडून किरगिझस्तानला पसंती मिळत आहे, विशेषत: वैद्यकीय प्रशिक्षणासाठी या देशाला पसंती मिळत आहे. त्यामुळे या देशातील सांस्कृतिक आणि सामाजिक गतिशीलता वाढली आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमुळे आर्थिक योगदान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यासारखे फायदे असूनही स्थानिकांना यामुळे अनेक समस्या भेडसावत आहेत. स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. त्यांच्यात सामाजिक एकात्मतेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळेच अधूनमधून परदेशी विद्यार्थी, स्थलांतरित हा मुद्दा अशांतता निर्माण करतो. ही परिस्थिती झेनोफोबिक दर्शवणारी असली तरी बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेर काढण्यावर किरगिझ सरकारचे लक्ष हे या तणावाचे निराकरण करण्याचा प्रयत्न ही दर्शवतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack on kyrgyzstan hostels housing indian pakistani students svs