बिहारमधील एनडीएमध्ये ४० जागांसाठी उमेदवार निश्चित झाले. मात्र या जगावाटपामुळे राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी (आरएलजीपी) प्रमुख पशुपती कुमार पारस नाराज झाले. जागावाटप करारामध्ये त्यांच्या पक्षाला एकही जागा न मिळाल्याने त्यांनी तडकाफडकी निर्णय घेत, केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि ते एनडीएमधूनदेखील बाहेर पडले. गेल्या आठवड्यात लोक जनशक्ती पार्टी (रामविलास पासवान) प्रमुख चिराग पासवान इंडिया आघाडीत जातील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यामुळे जागावाटपात भाजपा काका-पुतण्याला किती आणि कोणत्या जागा देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

“मी पूर्ण प्रामाणिकपणे एनडीएसाठी काम केले. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आभारी आहे. मात्र, आमच्यावर व आमच्या पक्षावर अन्याय झाला आहे. त्यामुळे मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे,” असे पारस यांनी मंगळवारी (१९ मार्च) पत्रकारांना सांगितले. मोदी यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री होते. भाजपासाठी चिराग पासवान महत्त्वाचे का आहेत? पशुपती कुमार पारस एनडीएमधून बाहेर पडल्याने भाजपा अडचणीत येणार का? बिहारमधील सार्वत्रिक निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल? जाणून घेऊ या.

काका-पुतण्या वाद काय?

ऑक्टोबर २०२० मध्ये लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी) चे संस्थापक रामविलास पासवान यांच्या निधनानंतर चिराग पासवान आणि त्यांचे काका पारस यांच्यात मतभेद निर्माण झाले. जून २०२१ मध्ये, एलजेपी दोन गटांमध्ये विभागली गेली. एक गट म्हणजे एलजेपी (रामविलास); ज्याचे नेतृत्व रामविलास यांचा मुलगा चिराग पासवान करत आहेत, तर दुसरा गट म्हणजे राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी (आरएलजेपी); ज्याचे नेतृत्व पशुपती कुमार पारस करत आहेत.

एलजेपी संस्थापक रामविलास पासवान यांचे धाकटे बंधु पारस सहापैकी पाच खासदारांना घेऊन पक्षातून बाहेर पडले होते. बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील हाजीपूर लोकसभा मतदारसंघावरून काका-पुतण्यामध्ये वाद सुरू आहे. दिवंगत रामविलास पासवान हे आठ वेळा या जागेवरून निवडून आले होते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, पशुपती पारस यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हाजीपूर मतदारसंघ जिंकून, राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) चा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. मात्र, जमुईचे खासदार चिराग यांना यंदा हाजीपूर मतदारसंघातून स्वतःचा उमेदवार उभा करायचा आहे. रामविलास पासवान यांचा वारसा पुढे नेण्यासाठी काका-पुतण्या दोघांनाही हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे.

भाजपासाठी चिराग पासवान महत्त्वाचे

चिराग पासवान २०२० मध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून बाहेर पडले होते. त्यावेळी त्यांनी बिहार विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली होती. २०२१ मध्ये, भाजपाने वारसा हक्काच्या लढाईत पारस यांची बाजू घेतली होती. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये एनडीए सोडल्यानंतर एलजेपी (रामविलास) साठी अनेक गोष्टी बदलल्या. जेडी(यू) प्रमुखांवर एलजेपीमध्ये फूट पाडल्याचा आरोप आहे. नितीश कुमार आणि चिराग यांच्यातही अनेक मतभेद आहेत. जेडी (यू) चे सर्वेसर्वा नितीश कुमार आणि रामविलास पासवान यांच्यातही फारसे चांगले संबंध नव्हते.

२०२० च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान, जेडी (यू) ने निवडणूक लढवलेल्या सर्व जागांवर चिराग यांच्या पक्षाने उमेदवार उभे केले. ‘इंडिया टुडे’च्या मते, मतांच्या विभाजनामुळे नितीश कुमार यांचा पक्ष २०१५ मध्ये ७१ जागांवरून ४३ जागांवर आला. या निवडणुकीत भाजपा ७४ जागा जिंकून पहिल्या स्थानी होती. एलजेपीमध्ये फूट पडली असली तरी बिहारमधील काही जागांवर चिराग पासवान यांचे प्रभुत्व आहे. बिहारमधील सहा टक्के पासवान मतदार त्यांच्यासोबत आहेत. पासवान हे बिहारमधील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येतील सर्वात महत्त्वाचा घटक आहेत.

पंतप्रधान मोदींचे ‘हनुमान’

एनडीए सोडल्यानंतरही चिराग यांनी भाजपाबरोबरचे संबंध बिघडू दिले नाहीत. त्यांनी एकदा स्वत:ला पंतप्रधान मोदींचे ‘हनुमान’ असेही संबोधले होते. जवळपास तीन वर्षांच्या कालावधीनंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे आणि ते पुन्हा एनडीएमध्ये परतले आहेत. तर भाजपाने चिराग यांना हव्या त्या जागा देत, पारस यांना डावलले आहे. “पासवान मतदारांमध्ये काका पशुपती कुमार पारस यांच्यापेक्षा चिराग पासवान यांचा प्रभाव जास्त आहे,” असे भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने गेल्या वर्षी ‘द हिंदू’ला सांगितले होते. परंतु, नितीश कुमार आणि चिराग यांच्यातील मतभेद लोकसभा निवडणुकीत ४०० हून अधिक जागा मिळवण्याच्या भाजपाच्या महत्त्वाकांक्षी ध्येयासाठी अडचण ठरणार नाही ना, हे भाजपाला सुनिश्चित करावे लागेल. कारण- नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएमध्ये सामील झाले आहेत.

भाजपा बिहारमधील लोकसभेच्या १७ जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर जेडी (यू) १६ जागांवर उमेदवार उभे करणार आहे, चिराग पासवान यांच्या एलजेपीला (रामविलास) हाजीपूरसह पाच जागा देण्यात आल्या आहेत. तर एनडीएतील हिंदुस्तानी अवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा प्रत्येकी एका जागेवरून निवडणूक लढवणार आहेत.

पारस यांच्या एक्झिटचा परिणाम निवडणुकांवर होणार का?

पारस एनडीएतून बाहेर पडल्याने बिहारमध्ये काका-पुतण्या आमने-सामने येण्याची शक्यता आहे. हाजीपूरसह समस्तीपूर, जमुई, वैशाली आणि खगरिया या जागांवरून चिराग यांचा पक्ष निवडणूक लढवणार आहे. पारस यांना भाजपाने डावलल्यामुळे या जागांवर एलजेपी विरुद्ध एलजेपी लढत होऊ शकते. पारस हाजीपूर मतदारसंघातून लढणार असल्यास, काका-पुतण्यात थेट लढत होईल . “तिन्ही पक्षाचे खासदार आपापल्या जागेवरून निवडणूक लढवतील,” असे पारस यांनी यापूर्वी सांगितले होते. पारस इंडिया आघाडीत सामील होऊ शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा: पासवान आणि मंडळींना सांभाळताना भाजपाची दमछाक

आरएलजेपीच्या एका राष्ट्रीय उपाध्यक्षाने ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सोमवारी (१८ मार्च) नवी दिल्लीतील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी भविष्यातील कृतीबाबत पारस यांची भेट घेतली. यात इंडिया आघाडीत सामील होण्याबाबतही चर्चा झाली.